चाऱ्याच्या चिंतेत शेतकरी
By admin | Published: May 17, 2016 02:04 AM2016-05-17T02:04:23+5:302016-05-17T02:04:23+5:30
परिसरात गेल्या पाच- सहा वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला आहे.
वडापुरी : परिसरात गेल्या पाच- सहा वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला आहे. यामुळे पिण्याचे पाणी व चारा यांमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात हैराण झाला आहे. एकीकडे पिण्याचे पाणी उपलब्ध नाही, तर दुसरीकडे चारादेखील शिल्लक नसल्याचे चित्र आहे.
जनावरांच्या चाऱ्याच्या चिंतेत शेतकरी सापडला आहे. त्यामुळे पडीक पडलेल्या शेतात मुक्या जनावरांवर कोसकोस फिरून वाळलेला चारा खाण्याची वेळ आली आहे.
वडापुरी, अवसरी, काटी, पंधारवाडी, वरकुटे, अभंगवस्ती, राजगुरुवस्ती, विठ्ठलवाडी या परिसरात ज्वारी, गहू, मका, ऊस इत्यादी पिके मोठ्या प्रमाणत घेतली जातात. गेल्या पाच-सहा वर्षांपासून या भागात पुरेसा पाऊसच पडला नाही. त्यामुळे विहिरींना पाणीसुद्धा शिल्लक राहिले नाही. यामुळे मोठा दुष्काळ पाहावयास मिळाला. पाऊस पडला नसल्याने या वर्षी तर ९० टक्के शेतकऱ्यांनी शेतात पिकेच घेतली नाही. पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्यामुळे शेतातील बाटूकसुद्धा निघाले नाही. त्यामुळे यंदा पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
>जनावरे सोडली मोकळी
सध्या या परिसरातील शेतकरी चारा उपलब्ध नसल्याने पडीक असलेल्या शेतीमध्ये जनावरांना मोकळे सोडून देत आहेत. काही प्रमाणात वाळलेला चारा आहे तो तरी खाऊन पोट भरेल म्हणून जनावरांना मोकळे सोडत आहे.
पाऊस पडेपर्यंत पशुधन जगवावे कसे, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना
पडला आहे. चाऱ्याची मोठ्या प्रमाणात टंचाई असल्याने दूध धंदासुद्धा
कमी झाला आहे.