शेतकऱ्यांचा संप सुरू; दूध-भाजीपाला बंद!

By admin | Published: June 1, 2017 04:19 AM2017-06-01T04:19:41+5:302017-06-01T04:19:41+5:30

राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा होत नसल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी मध्यरात्री १२पासून संप सुरू केला आहे. बळीराजाने

Farmers start off; Milk-Vegetable Off! | शेतकऱ्यांचा संप सुरू; दूध-भाजीपाला बंद!

शेतकऱ्यांचा संप सुरू; दूध-भाजीपाला बंद!

Next

सुधीर लंके/  लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर/मुंबई : राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा होत नसल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी मध्यरात्री १२पासून संप सुरू केला आहे. बळीराजाने भाजीपाला व दुधाची विक्री बंद केली असून, शहरे व महानगरांकडे जाणारा शेतमालही सकाळपासून थांबविला जाणार आहे. बाजार समित्या व अनेक दूध संकलन केंद्रांनीही संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी ३ एप्रिलला ग्रामसभा घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी १ जूनपासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता. ‘किसान क्रांती’ समन्वय समितीने बुधवारी पुणतांब्यात संपाची घोषणा केली. ४०हून अधिक संघटना संपात उतरल्या असल्याचे समन्वय समितीचे धनंजय जाधव, धनंजय धोरडे, जयाजीराव सूर्यवंशी यांनी सांगितले. शरद जोशी व रघुनाथ पाटील प्रणीत शेतकरी संघटना, खा. राजू शेट्टी यांची स्वाभिमानी व संजीव भोर यांची ‘शिवप्रहार’ संघटना संपात उतरल्या आहेत. शहरांकडे शेतमाल जाणार नाही, असा प्रयत्न केला जाणार आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर दूध संघाने दूध संकलन बंद केले आहे. इतरही दूध उत्पादक संघ आंदोलनात उतरण्याच्या तयारीत आहेत.
बाजार समित्यांच्या फेडरेशनचे अध्यक्ष माजी आ. दिलीप मोहिते यांनीही बाजार समित्यांच्या वतीने संपाला पाठिंबा जाहीर केला. नेवासा बाजार समितीने बंद जाहीर केला आहे. पुण्यात डॉ. बाबा आढाव यांनी हमाल मापाडी संघटनेचा पाठिंबा जाहीर केला आहे. नगर जिल्ह्याच्या फर्टिलायझर असोसिएशननेही कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई, नवी मुंबईचे धान्य कोठार म्हणून मुंबई बाजार समितीची देशभर ओळख आहे. रोज दोन ते अडीच हजार वाहनांमधून कृषीमाल येतो. यामध्ये भाजी मार्केटमध्ये ४०० ते ५०० ट्रक, फळ मार्केटमध्ये २५० ते ३०० ट्रक, कांदा मार्केटमध्ये २०० ते ३५० वाहनांमधून माल येतो.
उर्वरित आवक धान्य व मसाला मार्केटमध्ये होत असते. शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या व्यवहारांवर फारसा परिणाम होणार नाही, असे बाजार समितीचे सचिव शिवाजी पहिनकर यांनी सांगितले. देशाच्या कानाकोपऱ्यातून माल येथे विक्रीसाठी येत असतो. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या संपाचा थेट परिणाम येथील व्यवसायावर होणार नाही. भाजी व फळ मार्केटमधील आवकही सुरळीत राहील, असे ते म्हणाले. फळ मार्केटचे व्यापारी संजय पानसरे यांनीही संपाचा परिणाम होणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. सद्यस्थितीमध्ये चिक्कू, सीताफळ, काही प्रमाणात आंबे वगळता इतर सर्व फळे परराज्यातून येत आहेत. यामुळे मार्केट सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले.
भाजी मार्केटमध्ये गुजरात व इतर ठिकाणांवरून भाजीपाला मोठ्या प्रमाणात येत आहे. गुरुवारी सर्वच व्यापाऱ्यांनी माल मागविला आहे. सातारा, सांगली परिसरात आंदोलनामुळे माल येण्यास विरोध झाल्यास थोडाफार परिणाम होईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

शिवसेनेचा पाठिंबा
उद्धव ठाकरे यांनी समन्वय समितीच्या नेत्यांना मुंबईला बोलविले होते. त्यानंतर माजी मंत्री बबनराव घोलप, खा. सदाशिव लोखंडे यांनी पुणतांब्यात येऊन पाठिंबा जाहीर केला.

महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त शेतमालाला हमीभाव व कर्जमुक्तीसाठी आंदोलन केले होते. पालकमंत्री गिरीश बापट यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद घडवून आणला होता. ११ आॅक्टोबरला बैठक घेणार होते. मात्र सरकार फसवे असल्याचे सिद्ध झाले आहे.
- डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते.

मुंबईवर फारसा परिणाम नाही

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देशाच्या बहुतांश राज्यातून आवक होते. यामुळे राज्यातील शेतकरी संपामुळे अन्नधान्याच्या व भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम होणार नाही.

कसा असेल संप?
शेतकऱ्यांनी शेतमाल व दूध बाजारात विक्रीसाठी न आणणे, हे संपाचे स्वरूप आहे. आंदोलन अहिंसक मार्गाने होईल. बाजार समित्यांनी बंद पाळून शहरांकडे शेतमाल पाठवू नये. दूध संकलन केंद्रांनी बंद पाळून दुधाचा पुरवठा बंद करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

भाज्या भडकल्या

नाशिकमध्ये बुधवारी भाजीपाला काही प्रमाणात महागला. विक्रेत्यांनी भाज्यांचे भाव वाढविल्याचे प्रकार समोर आले. दूधही हातोहात संपल्याचे दिसून आले.

संप किती दिवस चालेल हे सांगता येत नाही़ त्यामुळे भाजीपाला, दूध शहरात येणार नाही़ दिवस जातील, तशी संपाची तीव्रता वाढत जाईल़ कोणी मोडता घालण्याचा प्रयत्न केला तर ते बाहेर फेकले जातील़
- डॉ़ बुधाजीराव मुळीक, कृषीतज्ज्ञ

बाजार समिती शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आम्ही संपात आहोत. शुक्रवारपासून शहरांची दूध-भाजीपाल्याची मोठी कोंडी होईल.
- दिलीप बनकर, कृषी उत्पन्न
बाजार समिती, पिंपळगाव, नाशिक


कोकण, विदर्भ वगळता महाराष्ट्र आंदोलनात

कोकण व विदर्भातील काही जिल्हे वगळता सर्व महाराष्ट्र संपात उतरणार असल्याचा दावा समन्वय समितीने केला आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक समन्वयक व कोअर समिती गठीत केली आहे. विदर्भातील जिल्ह्यांशी संपर्क सुरू असल्याचे धनंजय धोरडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Farmers start off; Milk-Vegetable Off!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.