कोल्हापूरच्या राजकारणातील पितामह

By admin | Published: March 10, 2015 11:48 PM2015-03-10T23:48:40+5:302015-03-11T00:33:07+5:30

खासदार सदाशिवराव मंडलिक यांची राजकीय कारकीर्द म्हणजे लढवय्या लोकनेता अशीच होती.

Father of Kolhapur politics | कोल्हापूरच्या राजकारणातील पितामह

कोल्हापूरच्या राजकारणातील पितामह

Next

खासदार सदाशिवराव मंडलिक यांची राजकीय कारकीर्द म्हणजे लढवय्या लोकनेता अशीच होती. ते खऱ्या अर्थाने जनतेच्या राजकारणातील लोकराजे होते. प्रचंड इच्छाक्ती, दुर्दम्य आशावाद, झोकून देऊन अखंड काम करण्याची तयारी आणि जनतेवर अफाट निष्ठा या जोरावर आजपर्यंत त्यांची वाटचाल राहिली.
कागल तालुक्यातील मुरगूड या गावी सदाशिवराव मंडलिक यांचा जन्म झाला. विद्यार्थीदशेतच त्यांनी कोल्हापूर जिल्हा विद्यार्थी संघटना, राजाराम कॉलेज, छत्रपती शाहू मराठा बोर्डिंगमध्ये जनरल सेक्रेटरी म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या राजकीय जीवनाची कारकीर्द कोल्हापूर जिल्हा विकास मंडळाचे सदस्य म्हणून सुरू झाली. त्यांनी या पदावर १९६०-६२ या काळात काम केले. या काळातच गोवा मुक्ती आंदोलनात भूमिगत चळवळीत त्यांनी सहभाग घेतला. गोव्यातील सुर्ला पोलीस ठाणे आपल्या सहकाऱ्यांसह जिंकून दोन दिवस ताब्यात ठेवले होते. गोवा मुक्ती आंदोलनातील या कार्याबद्दल बाकी सहकाऱ्यांनी स्वातंत्र्यसैनिक सनद स्वीकारली. मंडलिकांनी मात्र नम्रपणे ही सनद नाकारली. बहुजन समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, या धारणेतून मंडलिकांनी मुरगूडमध्ये १९६० मध्ये जय शिवराय एज्युकेशन सोसायटीची स्थापन केली. सामाजिक व शैक्षणिक कार्य करीत असताना कागल तालुक्यात सरंजामशाहीचे प्राबल्य होते. राजकारणात व सहकारात मक्तेदारी निर्माण झाली होती. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष दिले जात नव्हते. राजकारणात प्रवेश करताना मंडलिकांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून कागल विधानसभा संघातून १९६२ ला लढवली. त्यावेळी प्रस्थापित काँग्रेस उमेदवार शामराव भिवाजी पाटील यांच्या विरोधात कुणी उभे राहण्याचे धाडस दाखवत नव्हते. या निवडणुकीत मंडलिकांना पराभव स्वीकारावा लागला. परंतु मंडलिकांच्या रुपाने तालुक्यातील गोरगरीब जनतेचे, तरुणांचे नेतृत्व उदयाला आले.
पराभवाने खचून जाणे हा मंडलिकांचा पिंडच नव्हता. त्यामुळे सार्वजनिक जीवनात पुढेही ते नेटाने सक्रिय झाले. १९६५ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. १९६७ ला बिद्री-बोरवडे मतदारसंघातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. यावेळी त्यांनी विजयाची मुहूर्तमेढ रोवली. जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती असताना त्यांच्यावरील अविश्वासाचे प्रकरण चांगलेच गाजले. पहिला ठराव १९६९ ला दाखल केला गेला, पण तो बारगळला. त्यानंतर दोन वर्षांनी (१९७१) मंजूर झाला. यावेळी त्यांचे राजकीय भवितव्य अंधकायमय झाले होते, पण सर्वसामान्य जनतेच्या बळावर त्यांनी संकटांना चितपट केले.
जिल्हा परिषदेतील काँग्रेसमधील गटबाजीचे प्रत्यंतर १९७२ च्या विधानसभा निवडणुकीत आले. मंडलिकांचे तिकीट कापले गेले. त्यांनी बंडखोरी केली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामाचा या निवडणुकीत फायदा झाला. त्यांनी विजय संपादन करून राज्याच्या विधानसभेत पहिल्यांदा पाऊल टाकले. विधानसभेत काम करताना त्यांनी काळम्मावाडी, पाटगाव, चिकोत्रा इ. पाटबंधारे व जिल्ह्याच्या अन्य प्रश्नांवर आवाज उठवला. १९७८ व १९८० च्या विधानसभा निवडणुकीत विक्रमसिंह घाटगेंनी मंडलिकांना पराभूत केले. या काळात मंडलिकांना राजकीय वनवास भोगावा लागला.
यावेळी शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसची मोलाची साथ मंडलिकांना मिळाली होती. १९८६ ला औरंगाबाद येथे शरद पवार यांच्यासोबत इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश. १९९० ला तिसऱ्यांदा विधानसभेवर काँग्रेस (आय) पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून विजयी. कागल तालुक्याला सहा मार्च १९९३ रोजी पहिले मंत्रिपद मंडलिकांच्या रुपाने मिळाले. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश झाला. त्यावेळी मंडलिकांनी पाटबंधारे, पुनर्वसन, जलसंधारण, रोजगार हमी, उच्च व तंत्रशिक्षण आणि शालेय शिक्षण या खात्यांचा कारभार समर्थपणे सांभाळला. विधानसभेच्या १९९५च्या निवडणुकीत त्यांनी प्रचंड मताधिक्याने विजय संपादन केला. विधानसभेच्या प्रदीर्घ अनुभवानंतर १९९८ ला काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवली. यावेळी त्यांनी शिवसेनेचे रमेश देव यांना चितपट केले. वर्षभरातच केंद्रातील आघाडी सरकार कोसळल्यामुळे १९९९ ला पुन्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत तत्कालीन प्रतिस्पर्धी उमेदवार विक्रमसिंह घाटगे हे मंडलिकांच्या विरोधात होते. याही निवडणुकीत मंडलिकांनी बाजी मारली. २००४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या धनंजय महाडिक या नवख्या उमेदवाराने मंडलिकांना काटा लढत दिली, पण मुरब्बी मंडलिकांनी विजय संपादन केला. दरम्यानच्या काळात मंडलिक- मुश्रीफ या गुरू-शिष्यात वाद झाला. मंडलिकांनी स्थापन केलेल्या साखर कारखान्याची निवडणूक हसन मुश्रीफ यांनी लावली. या निवडणुकीत मंडलिकांचे पूर्ण पॅनेल विजयी झाले. त्यांची राजकीय कारकीर्द संघर्षमय झाली आहे. राजकारणातून त्यांना पदे मिळत गेल्यानंतर त्यांनी कधी जनतेशी नाळ तोडली नाही. ते नेहमी म्हणत माझा लढा हा कोणा व्यक्तीविरुद्ध नसून प्रवृत्तीविरोधात आहे. तत्वाशी कधीही फारकत न घेणारा हा राजकारणातील योगी तपस्वी होता.
सहकारच्या माध्यमातून अत्यंत धाडसाने व नव्यानेच हमीदवाडा साखर कारखाना त्यांनी उभारला की ज्या कारखान्याला संपत कमिटीचा लाभही मिळाला नाही. तरीसुद्धा त्यांनी हा कारखाना कर्जमुक्त केला. त्याचबरोबरच अनेक शाळा- हायस्कूल, आयटीआय, चॅरिटेबल ट्रस्ट, आदींचे छोटे का असेना परंतु चांगले जाळे त्यांनी निर्माण केले आहे आणि हे सर्व त्यांनी अक्षरश: शून्यातून निर्माण केले.


राज्यमंत्री म्हणून शपथविधी.. सदाशिवराव मंडलिक यांना १९९३ ला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे, शिक्षणासह सहा खात्यांच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी मिळाली. तत्कालीन राज्यपाल अलेक्झांडर यांनी त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली. शेजारी मुख्यमंत्री शरद पवार.

Web Title: Father of Kolhapur politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.