गजानन पाटीलचा जामीन नामंजूर
By admin | Published: May 19, 2016 05:04 AM2016-05-19T05:04:46+5:302016-05-19T05:04:46+5:30
३० कोटी रुपयांची लाच मागणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील गजानन पाटील याचा बुधवारी विशेष एसीबी न्यायालयाने जामीन अर्ज नामंजूर केला.
मुंबई : एका संस्थेशी संबंधित जमिनीच्या व्यवहारासाठी ३० कोटी रुपयांची लाच मागणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील गजानन पाटील याचा बुधवारी विशेष एसीबी न्यायालयाने जामीन अर्ज नामंजूर केला.
राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा निकटवर्तीय असलेल्या गजानन पाटील याला मंगळवारी विशेष एसीबी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी झाली. या प्रकरणाचा तपास गेले आठ ते नऊ महिने सुरू आहे. तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य केले असून खोट्या केसमध्ये अडकवण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अटक करण्यात आले नाही, असा दावा पाटील याने कोर्टात अर्जाद्वारे केला. यावर सरकारी वकील जयसिंग देसाई यांनी आक्षेप घेतला. ‘गजानन पाटील याने तपास यंत्रणेला सहकार्य केले नाही. त्यामुळे तपास यंत्रणेला प्रगती साधता आली नाही. पाटीलविरुद्ध पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत.
तपास यंत्रणा त्याच्या मागावरच होती. जेव्हा त्याच्याविरुद्ध सबळ पुरावे हाती लागले आणि प्रकरण गंभीर असल्याचे जाणवले तेव्हा तपास यंत्रणेने त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. पुराव्यांची पडताळणी पाटीलकडे करण्याची गरज भासेल. त्यामुळे त्याची जामिनावर सुटका करू नये,’ असा युक्तिवाद अॅड. देसाई यांनी केला. सरकारचा युक्तिवाद ग्राह्य धरत विशेष एसीबी न्यायालयाने गजानन पाटीलची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)