मिरा-भार्इंदरला ५ एमएलडी पाणी द्या!
By admin | Published: May 19, 2016 04:11 AM2016-05-19T04:11:00+5:302016-05-19T04:11:00+5:30
मुंबई महापालिकेकडून १९६७ पासून मीरा-भार्इंदरला होत असलेला पाच एमएलडी पाणीपुरवठा चार वर्षापासून बंद आहे.
भार्इंदर : मुंबई महापालिकेकडून १९६७ पासून मीरा-भार्इंदरला होत असलेला पाच एमएलडी पाणीपुरवठा चार वर्षापासून बंद आहे. तो पूर्ववत होण्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील यांनी मुंबई पालिकेकडे पाठपुरावा करुनही त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यामुळे पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच साकडे घातले आहे.
ग्रामपंचायतीच्या काळात मुंबई पालिकेकडून मिरा-भार्इंदरच्या नागरिकांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अडीच एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येत होता. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नियंत्रणाखाली शहरातील औद्योगिक वसाहतींसह हायवे पट्यातील मोठ्या उद्योगांना प्रत्येकी एक आणि तबेले, हॉटेल यांना अर्धा असे एकूण पाच एमएलडी पाणीपुरवठा केला जात होता. महामार्गाखाली स्वतंत्र जलवाहिनी होती. चार वर्षापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रुंदीकरणासाठी रस्ते खोदले. त्यात जलवाहिनीचे मोठे नुकसान झाल्याने मुंबई पालिकेकडून होणारा पाणीपुरवठा रुंदीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत खंडित होणार असल्याची भावना स्थानिक प्रशासनाची झाली होती. रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतरही मुंबई पालिकेने शहराला होणारा पाणीपुरवठा सुरु न करता उलट नुकसान झालेली जलवाहिनी स्वखर्चातून दुरूस्त करण्याची सूचना मिरा-भार्इंदर पालिकेला केली. त्याप्रमाणे स्थानिक प्रशासनाने ही जलवाहिनी टाकण्यासाठी तब्बल ७० लाख खर्च केले. हे काम मार्च २०१५ मध्ये पूर्ण झाले. त्याची पाहणी दोन्ही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली. त्यानंतर पाणीपुरवठा सुरु होण्याची चिन्हे असतानाच मुंबई पालिकेने खो घातला आहे. हे पाणी शहराला मिळावे, यासाठी पाटील यांनी मुंबई पालिकेच्या जलअभियंत्यांना निवेदन दिले. महापौर गीता जैन यांनीही पत्रव्यवहार केला. परंतु,शहराला अद्याप पाच एमएलडी पाणीपुरवठा सुरु झालेला नाही. पाणीपुरवठा त्वरित सुरु करावा अन्यथा न्यायालयात दाद मागू, असा इशाराही पाटील यांनी दिला होता. (प्रतिनिधी)