न्याय मिळाला...

By Admin | Published: November 11, 2014 01:03 AM2014-11-11T01:03:28+5:302014-11-11T01:03:28+5:30

न्यायालयाच्या कक्षात घडलेल्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित जरीपटका कस्तुरबानगर येथील महिलांची अब्रू लुटणारा, खंडणी वसूल करणारा कुख्यात गुंड अक्कू यादव खून खटल्याचा निकाल सोमवारी जाहीर झाला.

Got justice | न्याय मिळाला...

न्याय मिळाला...

googlenewsNext

बहुचर्चित अक्कू यादव हत्याकांड : थराराचा अखेर
नागपूर : न्यायालयाच्या कक्षात घडलेल्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित जरीपटका कस्तुरबानगर येथील महिलांची अब्रू लुटणारा, खंडणी वसूल करणारा कुख्यात गुंड अक्कू यादव खून खटल्याचा निकाल सोमवारी जाहीर झाला. त्यामुळे दहा वर्षांपूर्वी घडलेल्या थराराचा अखेर झाला.
असा होता न्यायालयातील थरार
१३ आॅगस्ट रोजी अक्कूला पोलीस कॉन्स्टेबल दामोदर चौधरी आणि रवींद्र सूर्यवंशी यांनी न्यायालयात हजर करण्यासाठी आणले असता, २५-३० पुरुष आणि १०-१२ महिलांचा संतप्त जत्था त्याच्या दिशेने धावला होता. ‘अक्कू यादव को छोड दो, हमे उसको खतम करना है’, असे हा जमाव म्हणत होता. अक्कूला पोलिसांनी दगडी इमारतीच्या आत नेऊन चॅनल गेट बंद केले होते. त्याला न्यायालय क्रमांक ७ मध्ये नेण्यात आले होते. येथील न्यायाधीश अवकाशावर असल्याने त्याला दुसऱ्या न्यायालयात नेण्याची तयारी सुरू असतानाच संतप्त जमाव लाकडी दार तोडून न्यायालयात घुसला होता. आधी त्याच्या डोळ्यात मिरची पावडर झोकण्यात आली होती. त्यानंतर दगडाने ठेचून आणि तीक्ष्ण व धारदार शस्त्रांनी अनेक वार करून त्याचा जागीच मुडदा पाडला होता. ही घटना घडत असताना अक्कूचा दोरखंड हातात असलेले पोलीस पळून गेले होते. या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात भादंविच्या १२० (ब), १२१ (अ), १४३, १४७, १४८, ३४९, ३०२, ३५३, ३३२, ३२६, ४२७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अक्कूच्या कुटुंबाचा इतिहास
सत्यशोधन समितीच्या अहवालानुसार अक्कू यादवच्या कुटुंबात १५-१६ सदस्य असून सर्व पुरुष गुन्हेगार आहेत. जरीपटका, गणेशपेठ इत्यादी पोलीस ठाण्यांमध्ये त्यांची नावे गुन्हेगारांच्या यादीत नमूद आहेत. अक्कूचे पुतणे डंगऱ्या व अमर दोन्ही कुख्यात गुंड आहेत. अक्कूविरुद्ध हत्या, दरोडे, हप्ता वसुली, चोरी, लुटमार, छेडछाड इत्यादी प्रकारचे २४ गंभीर गुन्हे होते. अक्कूने जरीपटका पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या अनेक वस्त्यांमध्ये दहशत निर्माण केली होती. नागरिक अक्कूच्या दहशतीत जीवन जगत होते. अक्कू दिवस-रात्र न पाहता लोकांच्या घरात शिरून दारूसाठी पैसे मागत होता. घरकाम करणाऱ्या कौशल मानकरने समितीला अक्कूच्या दहशतीची माहिती दिली. घरकाम करणाऱ्या महिला रात्री घरी परत येताना अक्कू त्यांना आडवा होऊन पैसे मागत होता. पैसे दिले नाही तर मारहाण करीत होता. भाजीपाला विक्रेते, ठेलेवाले, लहान-मोठे दुकानदार सर्वच अक्कूमुळे त्रासले होते.
महिलांचे शोषण
अक्कूचा महिलांना सर्वाधिक त्रास होता. तरुण मुलींना तो नेहमी वाईट नजरेने पाहात होता. तरुणींचे महाविद्यालयात जाणे बंद झाले होते. कोणत्याही मुलीची एकट्याने घराबाहेर फिरण्याची हिंमत होत नव्हती. अक्कूच्या भीतीमुळे पालक आपल्या मुलींना बाहेरगावी पाठवीत होते. त्यांचे लग्नही बाहेरच उरकत होते. अक्कूचे मन आलेली महिला किंवा मुलगी शोषणाची बळी ठरत होती. अक्कूने पहाटे ३ वाजता एका २२ वर्षीय विवाहित स्त्रीवर अत्याचार केला होता. यानंतर ती स्त्री वस्ती सोडून निघून गेली.
बालाघाट येथील एक महिलाही अक्कूच्या वासनेची शिकार झाली होती. त्याने गर्भवती महिलेलाही सोडले नव्हते. महिलांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या, पण अक्कूचे काहीच बिघडले नाही.
असा होता युक्तिवाद
न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीने लिखित युक्तिवाद सादर करण्यात आला होता. लोक ज्या न्यायालयात न्याय मागण्यास येतात त्याच पवित्र न्यायमंदिरात खून करण्यात आला. न्यायव्यवस्थेवर हा हल्ला होय. न्यायव्यवस्थेत भीती निर्माण झाली पाहिजे, असा आरोपींचा हेतू दिसत आहे. अशा स्थितीत आरोपींना सोडता येईल काय, आरोपींना सोडल्यास जनतेचा न्यायावरील विश्वास संपुष्टात येईल. साक्षीदारांनी आरोपींना पाहिले आहे. ओळख परेड आणि न्यायालयातही त्यांना ओळखले आहे. यावरून त्यांच्या साक्षीवर अविश्वास व्यक्त करता येणार नाही. न्यायालयाच्या तुटलेल्या दारातून आतमधील दिसते, त्यामुळे आतमधील दृश्य दिसत नाही, असे बचाव पक्षाचे म्हणणे योग्य नाही, आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, असाही सरकार पक्षाचा युक्तिवाद होता.
२६ गुन्हे दाखल होते !
कस्तुरबानगर आणि परिसराला आपल्या गुन्हेगारी कृत्याने वेठीस धरणारा अक्कू हा १९९१ पासून गुन्हेगारीत सक्रिय होता. सामूहिक बलात्कार, खून, जबरीचोरी, दरोडा, घरफोडी आणि खंडणी वसुली, अशी २६ प्रकरणे त्याच्याविरुद्ध होती. १९९९ मध्ये त्याला झोपडपट्टी दादा व घातक व्यक्ती विघातक कृत्य (एमपीडीए) या कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्धही करण्यात आले होते. बलात्कार आणि छेडखानीची अनेक प्रकरणे त्याच्या दहशतीमुळे पोलिसांपर्यंत पोहोचतही नव्हती. तडीपार असतानाही तो कायदा मोडून मोहल्ल्यात यायचा आणि गुंडागर्दी करायचा. तक्रारीनंतरही पोलीस त्याला अटक करीत नव्हते.
निकाल ऐकण्यासाठी गर्दी
संतप्त जमावाने कुख्यात गुंड अक्कू यादवचा जिल्हा न्यायालयाच्या आवारातच खात्मा केल्यामुळे ही घटना संपूर्ण देशभर गाजली होती. बहुतेक नागरिकांनी कायद्याचा विचार बाजूला ठेवून या घटनेचे समर्थन केले होते. आरोपींना अनेकांचा पाठिंबा होता. अक्कू यादवची हत्या नव्हती, तर तो एक वध होता असे म्हणणारे आजही बरेचजण आहेत. या खटल्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यामुळे न्यायालयाबाहेर नागरिकांची गर्दी जमली होती.
पाच महिलांना तातडीने जामीन
घटनेच्या दिवशीच अंजनाबाई किसन बोरकर, लीला रघुनाथ सांगोळे, भागिरथाबाई हरिचंद्र अडकिणे, सविता जितेंद्र वंजारी आणि पिंकी अजय शंभरकर या पाच महिलांना अटक करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी न्यायालयाच्या आवारात जमलेल्या संतप्त नागरिकांनी या महिलांना सोडण्याची मागणी केल्याने न्यायालयाने त्यांना तातडीने जामिनावर सोडले होते. या प्रकरणात एकनाथ चव्हाण, उषा नारायणे, अ‍ॅड. विलास भांडे यांच्यासह २१ जणांना आरोपी करण्यात आले होते. त्यात सात महिलांचा समावेश होता. या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बबनराव पोराटे यांनी करून, न्यायालयात ७ डिसेंबर २००४ रोजी आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणातील तीन आरोपी एकनाथ चव्हाण, पंकज भगत आणि अजय मोहोड यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायद्यान्वये खटला सुरू असल्याने, अक्कू खुनाचा खटला तब्बल आठ वर्षे धूळ खात पडला होता. तदर्थ न्यायालयाचे न्यायाधीश पी. एम. दुनेदार यांच्या न्यायालयात या खटल्यास प्रारंभ झाला होता. त्यांच्या न्यायालयात २२ आॅक्टोबर २०१२ रोजी पहिला साक्षीदार तपासण्यात आला. पुढे त्यांची बदली झाल्याने हा खटला अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाकडे आला. या खटल्यात एकूण ८५ साक्षीदार होते, त्यापैकी १६ साक्षीदार तपासण्यात आले.

Web Title: Got justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.