परवडणाऱ्या घरांसाठी शासन प्रयत्नशील
By admin | Published: July 28, 2014 04:09 AM2014-07-28T04:09:53+5:302014-07-28T04:09:53+5:30
मुंबई शहर आणि उपनगरातील घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढत असल्याने येथील कष्टकरी कामगार वर्ग मुंबईबाहेर फेकला जात आहे
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढत असल्याने येथील कष्टकरी कामगार वर्ग मुंबईबाहेर फेकला जात आहे. परवडणाऱ्या घरांसाठी गिरणी कामगारांच्या वतीने आंदोलनावर आंदोलने केली जात असतानाच सरकार मात्र ढीम्म बसले असले तरी ‘परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्न करतेय,’ असे म्हणत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागरिकांना दिलासा दिला आहे.
कुर्ला येथील प्रसूतिगृहाच्या उद्घाटनादरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी महापालिका प्रशासनावर स्तुतिसुमने उधळली. मुंबईकरांसाठी शासनाने अनेक योजना आणि प्रकल्प साकारले आहेत. मुंबईतील नागरिकांना उत्कृष्ट व अद्ययावत आरोग्य सेवा-सुविधा मिळाव्यात याकरिता महापालिकेच्या रुग्णालयांचे श्रेणीवर्धन महापालिकेने करावे, त्यास राज्य शासन नक्कीच पाठबळ देईल. मुंबई हे सुंदर, स्वच्छ शहर करण्याचे स्वप्न साकारण्यासाठी महापालिकेला राज्य सरकारचे पूर्ण पाठबळ आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले; शिवाय राज्यात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, सरकारी रुग्णालयांचे श्रेणीसंवर्धन यासह निरनिराळे उपक्रम आणि योजना अंमलात आणल्या. मुंबईकरांसाठी मेट्रो, मोनो, द्रुतगती महामार्ग, पूर्व मुक्तमार्ग उभारले आणि राज्याचे जवळपास ५० टक्के नागरीकरण झाल्याचेही चव्हाण यांनी नमूद केले आहे. (प्रतिनिधी)