महाराष्ट्राच्या राज्यपालांची मिझोरामला बदली
By admin | Published: August 24, 2014 03:59 AM2014-08-24T03:59:18+5:302014-08-24T13:46:05+5:30
महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायण यांची शनिवारी मध्यरात्री मिझोरामला बदली करण्यात आली.
Next
>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २४ - महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायण यांची शनिवारी मध्यरात्री मिझोरामला बदली करण्यात आली आहे. तर मिझोरामला बदली झाल्यास राजीनामा देईन असा इशाराच के. शंकरनारायणन यांनी दिल्याने केंद्र सरकार विरुद्ध राज्यपाल यांच्यात पुन्हा एकदा वाद निर्माण झाल्याचे दिसते.
के. शंकरनारायण यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा कालावधी २०१७ साली संपणार होता. परंतू मिझोरामच्या राज्यपाल कमला बेनिवाल यांना निलंबित केल्यापासून ही जागा रिकामी होती. राष्ट्रपती भवनने जारी केलेल्या सरकारी परिपत्रकात राज्यपाल के. शंकरनारायण यांची मिझोरामच्या राज्यपालपदी नियुक्ती केल्याचे जाहीर केले.
केंद्रात सत्ता आल्यापासून मोदी सरकारने युपीएच्या कार्यकाळातील राज्यपालांना हटवण्याची मोहीमच सुरु केली आहे. यूपीएच्या कार्यकाळात राज्यपालपदावर वर्णी लागलेल्या काँग्रेस नेत्यांना मोदींनी लक्ष्य केले. यात गुजरातच्या राज्यपाल कमला बेनिवाल यांची राज्यपालपदावरुन हकालपट्टीच करण्यात आली होती. महाराष्ट्राचे राज्यपाल के.शंकरनारायण यांना हटवण्यासाठीही प्रयत्न सुरु होते. मात्र राष्ट्रपतींच्या आदेशाशिवाय राज्यपालपद सोडणार नाही अशी कणखर भूमिका शंकरनारायण यांनी घेतली होती. अखेरीस शनिवारी रात्री उशीरा राष्ट्रपती भवनातून शंकरनारायण यांना थेट मिझोरामच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली.
राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. 'माझ्याकडे अद्याप बदलीचे लेखी आदेश आलेले नाहीत. मात्र प्रसारमाध्यमांमधील वृत्त खरे असल्यास मी पदाला चिकटून राहणार नाही. असा अपमान सहन करण्यापेक्षा मी राजीनामा देईन' असा इशाराच के. शंकरनारायणन यांनी दिला आहे. गुजरातचे राज्यपाल ओ.पी. कोहली यांच्याकडे महाराष्ट्राच्या अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भाजपती तीन वरिष्ठ नेत्यांचे नाव चर्चेत आहेत.