आणखी किती दिवस एकमेकांच्या नावाने बोंबाबोंब?
By अतुल कुलकर्णी | Updated: March 17, 2025 10:28 IST2025-03-17T10:27:30+5:302025-03-17T10:28:24+5:30
...महाराष्ट्रात सध्या हे आणि असेच ज्वलंत विषय आहेत. हेच प्रश्न सोडवण्यासाठी सगळे नेते कंबर कसून कामाला लागले आहेत. अनेक नेते सभ्यतेच्या, सुसंस्कृततेच्या मर्यादा ओलांडून वाटेल ते, वाटेल त्याला बोलत सुटले आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई या शहरात ठिकठिकाणी खोदून ठेवले आहे.

आणखी किती दिवस एकमेकांच्या नावाने बोंबाबोंब?
अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई
मंत्री नीलेश राणे ‘हलाल’वरून बोलले, संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, संजय राऊत हा शरद पवार यांच्या घरची भांडी घासणारा माणूस आहे, असेही मंत्री राणे म्हणाले. काही लोकांना डबक्यातच राहून डराव डराव करायचे असते, अशा लोकांना मंत्री केले आहे. मुख्यमंत्र्यांनी अशा लोकांना इतिहासाचे धडे द्यावेत, असे सांगणारे संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, असेही विधान केले. त्यावर ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी, ‘काही लोक दिवसाच भांग मारून विधाने करतात. संजय राऊत यांनी होळीच्या दिवशी घेतलेली भांग उतरली नसेल,’ असे विधान केले. तिकडे शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी ‘यापुढे फोन आला तर हॅलो म्हणू नका, जय शिवराय म्हणा,’ असे आवाहन केले... महाराष्ट्रात सध्या हे आणि असेच ज्वलंत विषय आहेत. हेच प्रश्न सोडवण्यासाठी सगळे नेते कंबर कसून कामाला लागले आहेत. अनेक नेते सभ्यतेच्या, सुसंस्कृततेच्या मर्यादा ओलांडून वाटेल ते, वाटेल त्याला बोलत सुटले आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई या शहरात ठिकठिकाणी खोदून ठेवले आहे.
विकासाची कामे सुरू आहेत, या नावाखाली मुंबईकर, ठाणेकर रोज त्रास सहन करत या महानगरांमधून फिरताना दिसतात. मात्र या लोकांसाठी काही चांगले काम करावे, असे कोणालाच कसे वाटत नाही? या शहरांमध्ये चांगली उद्याने असावीत. लोकांनी त्या उद्यानांमध्ये आपल्या परिवारासह जावे. काही वेळ आनंदाने घालवावा, म्हणून या महानगरांसाठी आपण अमुक एखादी गोष्ट केली पाहिजे, असे सांगून त्यावर वाद घालणारे नेते स्वप्नातही का सापडत नाहीत? शहरामध्ये उत्तम दर्जाचे वाचनालय असावे, चांगली नाट्यगृहे उभी करावीत. त्यासाठी नाममात्र दरात नाट्यगृहे उपलब्ध करून द्यावीत; जेणेकरून मराठी नाटकांचे, संगीताचे कार्यक्रम होऊ शकतील. त्याकरिता सगळे नेते एकत्र बसून निर्णय घेत आहेत, असे चित्र या महानगरातील मतदारांना पाहायला मिळणारच नाही, याची शंभर टक्के खात्री सगळे नेते पटवून देत आहेत.
सगळ्यात जास्त आर्ट गॅलरीज एकाच शहरात असणारे मुंबई हे एकमेव शहर आहे. देशभरातील लोकांना जहाँगीर आर्ट गॅलरीमध्ये आपले प्रदर्शन व्हावे असे वाटते. त्यासह इतरही अनेक गॅलरीज या शहरात आहेत. सरकारने या सगळ्या गॅलरीज पंधरा दिवसांसाठी स्वतःच्या ताब्यात घेऊन महाराष्ट्रातील कलावंतांसाठी एखादा आर्ट फेस्टिव्हल भरवावा. तो पाहण्यासाठी जगभरातील लोकांना निमंत्रित करावे, असा विचार सतत एकमेकांच्या नावाने बोंबाबोंब करणाऱ्या नेत्यांच्या मनात कधी येईल...? जगभरातील लोक मुंबईत येतात. मात्र या शहराचा वापर फक्त प्लॅटफॉर्मसारखा करतात. मुंबई विमानतळावर उतरून लोक गोवा, वेरूळ, अजिंठासाठी तरी जातात किंवा गुजरात, राजस्थानला जातात. मुंबईत येणारा पर्यटक चार दिवस मुंबईत थांबला पाहिजे. त्याने मुंबईत काय-काय बघायला हवे, याचे नियोजन का होत नाही? पर्यटक मुंबईत राहिले तर इथल्या लोकांना काम मिळेल. हॉटेल, खाद्य उद्योग बहरेल; तसेच इथल्या छोट्या कारागिरांच्या कामालाही चांगली बाजारपेठ मिळवून देता येईल; पण हा विचार रोज एकमेकांचे कपडे धोबीघाटावर धुण्याच्या कामातून या नेत्यांच्या डोक्यात कधी येणार?
मुंबईत राहणाऱ्यांचे जीवन किमान सुसह्य कसे होईल? इथल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये कोणाचीही चिठ्ठी न नेता उपचार कसे मिळतील? फुटपाथ चालण्यासाठी आहे. अतिक्रमण करण्यासाठी नाही, हे त्याला कसे माहीत होईल? आधीच वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या वाहनचालकांच्या खिशावर चौकाचौकांत दबा धरून बसलेले वाहतूक पोलिस डल्ला तर मारणार नाहीत ना? केजी, नर्सरीमधील प्रवेश मंत्र्यांच्या शिफारशीशिवाय कसे मिळतील? जात, धर्म, पंथ विसरून लोक एकमेकांच्या आनंदात निर्मळ मनाने कधी सहभागी होतील..? या आणि अशा शेकडो प्रश्नांवर आपले नेते स्वतःचे राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून कधी तरी चर्चा करतील का..?
विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात एकाच विभागावर दिवसभर चर्चा करून त्या विभागामार्फत जनतेसाठी काय करता येईल, याचा सगळे पक्ष आपापले अभिनवेश बाजूला सारून कधी चर्चा करतील? अधिवेशन प्रथा-परंपरांवर चालते हे खरे असले तरी प्रथा-परंपरा निर्माण करण्याची क्षमता हे अधिवेशन चालवणाऱ्यांच्या हातात असते. कोणाला गाजर द्यायचे, कोणापुढे शेंगदाणे टाकायचे, तर कोणाला महाल बांधून देतो असे सांगायचे... हे किती दिवस चालेल? जनतेचे आता सरकार या यंत्रणेपासून काही अडत आहे, असे चित्रच उरलेले नाही. तुम्ही तुमचे भांडत बसा. आम्ही आमचे संसार कसेबसे चालवतो. तुमचे आणि आमचे एकमेकांशी काहीही घेणे-देणे नाही, या वृत्तीने लोक आता राजकारण्यांचा तिटकारा करू लागले आहेत. एका कार्यक्रमात रामदास फुटाणे यांचा उल्लेख ‘माजी आमदार’ असा केला नाही; ते ऐकून आपल्याला बरे वाटले, असे फुटाणे म्हणाले, तेव्हा वाजलेल्या टाळ्या राजकारण्यांविषयीच्या लोकभावनेला साद घालणाऱ्या होत्या हेच खरे...