कॉम्प्युटर हॅक होत असेल तर ईव्हीएम का नाही? उदयनराजेंचे निवडणूक आयोगाला आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 16:03 IST2019-06-24T16:01:24+5:302019-06-24T16:03:34+5:30
उदयनराजे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी आपण एक खासदार म्हणून, देशाचा नागरिक म्हणून मत मांडतोय असे सांगितले.

कॉम्प्युटर हॅक होत असेल तर ईव्हीएम का नाही? उदयनराजेंचे निवडणूक आयोगाला आव्हान
मुंबई : राष्ट्रवादीचे साताऱ्यातील खासदार उदयन राजे यांनी आज खास पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएमवर पुन्हा संशय व्यक्त केला आहे. तसेच ईव्हीएम हॅक होऊ शकत नसल्याचा दावा कोणीही करत सुटलेत, मात्र, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरच यावर बोलू शकतो असे उदयनराजेंनी सांगितले.
उदयनराजे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी आपण एक खासदार म्हणून, देशाचा नागरिक म्हणून मत मांडतोय. लोकशाही कशी अबाधित राहायला हवी यासाठी पत्रकार परिषद घेतल्याचे त्यांनी सांगितले.
विभिन्न जाती धर्मातले लोक जर कोणत्या देशात वास्तव्य करत असतील तर ते या भारत देशात. यामुळे प्रत्येक नागिरकाला वाटते की हा देश कायम अबाधित राहिला पाहिजे. भारत आणि पाकचे विभाजन झाले यामुळे अनेक लोकांचे नातेवाईक त्या देशात राहतात. त्यावळी झालेला रक्तपात हा पुन्हा घडू नये, असे आपल्याला वाटत असल्याचे उदयनराजेंनी सांगितले.
यानंतर कोणतेही मशीन हे माणूसच बनवितो. कॉम्प्युटर हे सर्वात चांगले मशीन आहे, मात्र तेही हॅक होते. मग ईव्हीएम का हॅक होऊ शकत नाही असे सांगत साताऱ्यात आज बॅलेटपेपरवर मतदान घ्यावे सगळा खर्च मी करेन असे आव्हान उदयनराजेंनी दिले. तसेच साताऱ्यात एकूण झालेले मतदान आणि निकालातील मतांमध्ये तफावत आढळून आल्याचा आरोप त्यांनी केला.
सातारा लोकसभा मतदारसंघातील तफावत दाखविताना त्यांनी वाईमध्ये 344 मते अधिक, कोरेगावात 5 मते अधिक, उत्तर कराडमध्ये 148, द. कराडमध्ये 5, पाटणमध्ये 97 मते अधिक पडल्याचे दिसत आहे. तर साताऱ्यात 75 मते कमी पडल्याचे दिसून आले आहे. हे कसे होऊ शकते, असा सवालही उदयनराजेंनी व्यक्त केला.