आमची राष्ट्रभक्ती खुपत असेल, तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा - संजय राऊत
By Admin | Published: October 13, 2015 06:49 PM2015-10-13T18:49:19+5:302015-10-13T18:49:19+5:30
आमची राष्ट्रभक्ती खुपत असेल तर त्यांनीच राजीनामा द्यावा असे सांगत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी युती ठेवायची का तोडायची याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच ढकलला.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - राजीनाम्याची मागणी आमच्याकडे का करता, जर आमची राष्ट्रभक्ती खुपत असेल तर त्यांनीच राजीनामा द्यावा असे सांगत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी युती ठेवायची का तोडायची याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच ढकलला. आम्ही जे काही केलं ते राष्ट्रभक्तीसाठी केलं, ज्या पाकड्यांनी तुकाराम ओंबळेंसारख्या मुंबई पोलीसांचे बळी घेतले त्याच मुंबई पोलीसांना काल पाकड्यांची सुरक्षा करावी लागली ही पोलीसांसाठी मानहानी असल्याचे राऊत म्हणाले.
जर भूमिका पटत नसेल तर शिवसेनेचे आमदार राजीनामा का देत नाहीत, या प्रश्नावर हा प्रश्न आम्हालाच का विचारला जातो, भाजपाला का विचारत नाही असा सवाल राऊतांनी विचारला.
जर, आम्ही करतो ते तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही राजीनामे द्या, हे दोघांचं संयुक्त सरकार आहे असं सांगत संजय राऊत यांनी सगळ्या प्रश्नांचा रोख देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वळवला आहे.
सुधींद्र कुलकर्णी यांना काळं फासणं, अत्यंत कडेकोट बंदोबस्तात पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम मुंबईत होणं या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे:
- शिवसेना पाकिस्तानविरोधात एकाकी लढा देत आहे, हा गुन्हा आहे का?
- पाकड्यांच्या रक्षणासाठी पोलिसांचे संरक्षण देणं हा शहीदांचा अपमान आहे.
- ज्या पोलिसांनी पाकड्यांविरोधात लढा दिला, तेच पोलिस काल कसुरींच्या संरक्षणासाठी माना खाली घालून उभे होते, ही शरमेची आणि चिंताजनक बाब आहे.
शिवसेनेमुळे महाराष्ट्राची काय बदनामी झाली असा सवाल संजय राऊत यांनी फडणवीसांना विचारला आहे.
06:37PM - पाकिस्तानविरोधात लढणा-यांचा, शिवसैनिकांचा सत्कार करणं योग्यंच.
- दरवेळेस आमच्या नेत्यांच्या राजीनाम्याविषयी प्रश्न का उपस्थित केला जातो? आमचा प्रखर राष्ट्रवादी बाणा कोणाला टोचत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा.
- पाकिस्तानविरोधात लढणारी प्रत्येक व्यक्ती ही जवानासमान असून शिवसैनिकही देशाचे जवानच आहेत.
- आम्ही काल जे केलं ते योग्यचं होता, कालच्या प्रसंगात सरकारने आमच्यासोबत असायला हवं होतं.