शासन आदेशानुसार राज्यातील सरपंचाचे मानधन वाढवा, आमदार चंद्रदीप नरके यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 17:03 IST2025-02-03T17:02:33+5:302025-02-03T17:03:10+5:30
कोपार्डे ( कोल्हापूर ): राज्यातील सरपंच व उप सरपंच वाढीव मानधनाच्या प्रतीक्षेत असून शासनाने यापूर्वी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे त्यांचे मानधन ...

शासन आदेशानुसार राज्यातील सरपंचाचे मानधन वाढवा, आमदार चंद्रदीप नरके यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कोपार्डे (कोल्हापूर): राज्यातील सरपंच व उपसरपंच वाढीव मानधनाच्या प्रतीक्षेत असून शासनाने यापूर्वी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे त्यांचे मानधन त्वरित वाढवावे, अशी मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनातील गेल्या काही महिन्यांपूर्वी शासनाने सरपंच, उपसरपंचांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु पुढे कार्यवाही झालेली नाही. अनेक वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित असणारा सरपंच, उपसरपंच यांच्या मानधन वाढीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तत्कालीन सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या २३ सप्टेंबर २०२४ च्या बैठकीत यासंदर्भात निर्णय झाला.मात्र, अद्यापपर्यंत सरपंच व उपसरपंचांना वाढीव मानधन प्राप्त झालेले नाही.नवीन वर्षात तरी प्रशासनाकडून सरपंच, उपसरपंच यांना वाढीव मानधन मिळेल, अशी त्यांना अपेक्षा आहे.
शासन दरबारी हा विषय लावून धरल्याने त्यामध्ये शासनाने दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या २ हजारांपर्यंत आहे, त्या सरपंचाचे मानधन ३ वरून ६ हजार तर उपसरपंचाचे मानधन हे १ वरून २ हजार करण्याचा निर्णय झाला आहे. ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या २ ते ८ हजारांदरम्यान आहे, त्या सरपंचाचे मानधन ४ वरून ८ हजार तर उपसरपंचाचे मानधन १५०० वरून ३ हजार रुपये इतके करण्याचा निर्णय झाला आहे.ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या ८ हजारपेक्षा जास्त आहे, त्या सरपंचाचे मानधन ५ वरून १० हजार, तर उपसरपंचाचे मानधन २ वरून ४ हजार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
मानधनासाठी ७५ टक्के निधी शासनाकडून आणि २५ टक्के निधी संबंधित ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून दिला जातो. मात्र, वाढीव मानधनाचा निधी शासनाकडून उपलब्ध झाला नसल्याने सरपंच व उपसरपंच वाढीव मानधनापासून वंचित आहेत असे या निवेदनात नमूद केले आहे.