किडनी विकारांचा धोका वाढतोय !
By Admin | Published: March 12, 2015 06:01 AM2015-03-12T06:01:34+5:302015-03-12T06:01:34+5:30
बदलणाऱ्या जीवनशैलीच्या ओघात तरुणाई व्यसनाधीन होते आहे. यामुळेच तरुणांमध्ये मधुमेह, रक्तदाबासारख्या आजारांबरोबरच
पूजा दामले, मुंबई
बदलणाऱ्या जीवनशैलीच्या ओघात तरुणाई व्यसनाधीन होते आहे. यामुळेच तरुणांमध्ये मधुमेह, रक्तदाबासारख्या आजारांबरोबरच किडनीचे आजार जडण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. किडनीच्या आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून सध्या १० पैकी एका व्यक्तीला किडनीचा त्रास आहे. पण २०२० पर्यंतही हे प्रमाण ७ पैकी १ असे होण्याचा धोका संभवत असल्याचे नेफ्रोलॉजिस्ट डॉ. ज्योत्स्ना झोपे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
किडनीचे कार्य म्हणजे रक्तातील अनावश्यक घटक गाळणे. पण या कार्यात ८५ ते ९०% बिघाड झाल्यानंतर अनेकांना त्रास जाणवू लागतो. त्या वेळी त्यांना डायलेसिस करण्याची आवश्यकता भासत असल्याचेही डॉ. झोपे यांनी सांगितले. भारतात दरवर्षी २ लाख नवीन रुग्णांना डायलेसिसची गरज भासते. पण त्या तुलनेत डायलेसिस मशिन उपलब्ध नाहीत. शहरांसारख्या ठिकाणी लोकांना डायलेसिसची सेवा उपलब्ध आहे. ग्रामीण भागात अनेकांना डायलेसिस घेण्यासाठी पाच - सहा तास प्रवास करून जावे लागते. तिथे गेल्यावरही त्यांना चांगल्याप्रकारे सुविधा मिळेलच, याची शाश्वती नाही. मुंबईत २०० डायलेसिस सेंटरमध्ये ७०० मशिन्स आहेत. तर रुग्णांची संख्या ४ हजारांच्या घरात असल्याने डायलेसिससाठी बराच वेळ रुग्णांना थांबावे लागते. अनेकदा रुग्ण डायलेसिस घेऊन रात्री दीड-दोन नंतर घरी जातात, असे नेफ्रोलॉजिस्ट डॉ. श्रीरंग बिछू यांनी सांगितले.