भारतानं कधीच भूमिका बदलली नाही; देवेंद्र फडणवीसांचं शरद पवारांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 08:42 AM2023-10-19T08:42:08+5:302023-10-19T08:43:26+5:30

शरद पवार यांनीही दहशतवादी हल्ल्याचा निषेध करायला हवे. कारण, दहशतवादी हल्ल्याच्या यातना मुंबईने अधिक सोसल्या आहेत असं फडणवीस म्हणाले.

India never changed its stance; Devendra Fadnavis' reply to Sharad Pawar over statement on Israel Palestine Conflict | भारतानं कधीच भूमिका बदलली नाही; देवेंद्र फडणवीसांचं शरद पवारांना प्रत्युत्तर

भारतानं कधीच भूमिका बदलली नाही; देवेंद्र फडणवीसांचं शरद पवारांना प्रत्युत्तर

मुंबई - इस्त्रायल-पॅलेस्टाईन वादात भारताने आपली भूमिका कधीच बदलली नाही. मात्र, त्याचवेळी भारताने दहशतवाद, मग तो कुठल्याही स्वरुपात आणि कुणाच्याही विरोधात असो, त्याला कायमच कडाडून विरोध केला आहे. इस्त्रायलमध्ये जेव्हा निष्पाप लोक मारले जातात, तेव्हा संपूर्ण जगाने त्याची कडाडून निंदा केली. तसाच निषेध भारतानेही केला असं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना दिले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार यांनीही दहशतवादी हल्ल्याचा निषेध करायला हवे. कारण, दहशतवादी हल्ल्याच्या यातना मुंबईने अधिक सोसल्या आहेत. विशेषत: २६/११ च्या वेळी मुंबईने अनेक नागरिक गमावले. त्यामुळे केवळ मतांच्या राजकारणाचा विचार करु नका, तर दहशतवादाचा तीव्र शब्दात धिक्कार करा अशी शरद पवार यांना विनंती आहे असा खोचक सल्ला त्यांनी दिला आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

या युद्धात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायल पाठिंबा दर्शविला आहे. नरेंद्र मोदींनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर बोलून भारत इस्रायलच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे, असा संदेश दिला आहे. परंतु, देशातील काही संघटना आणि विरोधी पक्षांनी पॅलेस्टाईनची बाजू घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पॅलेस्टाईनच्या बाजूने भूमिका मांडली.

दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) कार्यकर्त्यांना म्हणाले, ज्या भागात युद्ध सुरू आहे ती जमीन ही पॅलेस्टिनी लोकांची आहे. तिथं अतिक्रमण झालं आणि इस्रायल देश उदयाला आला. मला त्याच्या खोलात जायचं नाही. परंतु, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंपासून, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी या सर्वांची पॅलेस्टाईनला मदत करण्याची भूमिका होती. दुर्दैवाने आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी (नरेंद्र मोदी) इस्रायलची बाजू घेतली आहे. ते करत असताना त्या जमिनीचे मूळ मालक असलेल्या पॅलेस्टाईनकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आहे. त्यांची भूमिका काहीही असो, परंतु, आपली म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्वच्छ असली पाहिजे असं त्यांनी म्हटलं. शरद पवारांच्या या विधानावरून भाजपानं पलटवार सुरू केला आहे.

Web Title: India never changed its stance; Devendra Fadnavis' reply to Sharad Pawar over statement on Israel Palestine Conflict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.