“१००% फटका बसेल, त्यांना थांबवणारे आम्ही कोण?”; ठाकरे गट स्वबळाचा नारा, शरद पवार गटाचे भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 14:41 IST2025-01-11T14:39:09+5:302025-01-11T14:41:13+5:30
NCP SP Group Leader Jitendra Awhad News: विधानसभेत झालेल्या पराभवानंतर एकत्रित राहायला हवे होते. हा निर्णय फार घाईने घेतला, असे दिसत आहे, असे मत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त करत नाराजी बोलून दाखवली.

“१००% फटका बसेल, त्यांना थांबवणारे आम्ही कोण?”; ठाकरे गट स्वबळाचा नारा, शरद पवार गटाचे भाष्य
NCP SP Group Leader Jitendra Awhad News: विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीत धुसफूस सुरु झाली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीसोबत लढणार नसल्याची माहिती समोर आली आहे. महापालिका निवडणुकांमध्ये आम्ही स्वबळावर लढणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले. मुंबई, ठाणे, नागपूर, पुण्यासह सगळीकडे स्वबाळवर लढणार असल्याचे संजय राऊत म्हणाले. एकदा आम्हाला आजमवून पाहायचे आहे, असा आक्रमक पवित्रा संजय राऊत यांनी घेतला आहे. याला ठाकरे गटातील नेत्यांकडून समर्थन मिळताना दिसत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही स्वबाळवर लढू. काय होईल ते होईल. एकदा आम्हाला आजमवायचेच आहे. नागपूरलासुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरेंनी तसे संकेत दिले आहेत. शिवसेना शहरप्रमुखांशी आम्ही चर्चा केली. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरबाबत आमचे ठरत आहे. कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो. महानगर पालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायतीमध्ये स्वबळावरुन लढून आपआपले पक्ष मजबूत करावेत, असे संजय राऊत म्हणालेत. यावर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाराजीचा सूर व्यक्त केला आहे.
१०० टक्के फटका बसेल, त्यांना थांबवणारे आम्ही कोण?
त्यांची इच्छा असेल स्वबळावर जायची तर त्यांना थांबवणारे आम्ही कोण आहोत. विधानसभेत झालेल्या पराभवानंतर एकत्रित राहायला हवे होते, असे माझे मत आहे. हा निर्णय फार घाईने घेतला, असे दिसत आहे. कार्यकर्त्यांचे मत काय आहे, हे आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे हा निर्णय योग्य आहे, असे वाटत नाही. त्यांचा पक्ष आहे. त्यांनी निर्णय घ्यावा. शेवटी ओढून कोणाला तरी सोबत घेऊन जाणे, हे आम्हाला पटणार नाही किंवा शोभणार नाही, असे आव्हाड म्हणाले.
दरम्यान, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळते असे नाही. आमच्याही पक्षातील कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. शेवटी मत विभागणीचा फटका कसा बसतो. लोकसभेला, विधानसभेला हा अनुभव घेतला आहे. हे जर विसरून असे राजकीय पाऊल टाकणार असेल तर त्यांच्यावर टीका करण्यात काहीच अर्थ नाही. जर वेगवेगळे लढले तर मविआतील तीनही पक्षांना त्याचा १०० टक्के फटका बसेल, असा दावा आव्हाडांनी केला.