यशवंत पंचायत राज अभियान स्पर्धा: सांगली जिल्ह्यातील 'ही' पंचायत समिती पुणे विभागात प्रथम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 13:13 IST2025-02-25T13:12:58+5:302025-02-25T13:13:34+5:30
विटा : महाराष्ट्र शासनाच्यावतीने घेण्यात आलेल्या यशवंत पंचायत राज अभियानात स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील खानापूर-विटा पंचायत समितीने पुणे विभागात प्रथम ...

यशवंत पंचायत राज अभियान स्पर्धा: सांगली जिल्ह्यातील 'ही' पंचायत समिती पुणे विभागात प्रथम
विटा : महाराष्ट्र शासनाच्यावतीने घेण्यात आलेल्या यशवंत पंचायत राज अभियानात स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील खानापूर-विटा पंचायत समितीने पुणे विभागात प्रथम क्रमांक पटकावला. खानापूर पंचायत समितीचा या स्पर्धेत विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक आल्याने ११ लाख रूपयांचे रोख बक्षीस व प्रशस्तीपत्र १२ मार्चला मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात मिळणार आहे. तर, शिराळा पंचायत समितीला दुसरा आणि सातारा जिल्ह्यातील खंडाळा पंचायत समितीला तिसरा क्रमांक मिळाला आहे.
राज्य सरकारने सन २०२४-२५ या वर्षात यशवंतराव चव्हाण पंचायत समिती अभियान राबविले. राज्यातील उत्कृष्ट जिल्हा परिषदा व पंचायत समिती पुरस्काराबाबत विभाग स्तरावरील पारितोषिक निवड समितीची पुणे येथे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली दि.२४ रोजी बैठक झाली. यात विभागीय स्तरावरील गुणाकंनानुसार यशवंत पंचायत राज अभियानामध्ये खानापूर पंचायत समितीला पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळाल्याचे विभागीय उपायुक्त विजय मुळीक यांनी जाहीर केले असल्याची माहिती खानापूरचे गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील यांनी दिली.
गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील म्हणाले, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने राज्यात यशवंत पंचायत राज अभियान राबविले जाते. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व कामकाजाचे मूल्यमापन होते. सन २०२३-२४ मध्ये खानापूर पंचायत समितीने या अभियानात सहभाग घेतला होता. गेल्या आठवड्यात पुणे विभागीय स्तरावरील कमिटी खानापूर पंचायत समितीच्या तपासणीसाठी आली होती. विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत चांगल्याप्रकारे कमिटीला माहिती दिली. यावेळी कमिटीने कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात निकाल जाहीर केला. त्यात पंचायत समितीला पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळाला आहे. आमदार सुहास बाबर यांचे ही यासाठी चांगले मार्गदर्शन मिळाले.
खानापूर पंचायत समिती पुणे विभागात पहिली आल्याबद्दल आमदार सुहास बाबर, जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर, माजी सभापती महावीर शिंदे यांच्यासह अनेकांनी पंचायत समितीतील अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.