मरेला मार

By Admin | Published: January 3, 2015 01:58 AM2015-01-03T01:58:53+5:302015-01-03T01:58:53+5:30

नेमेचि तुटणाऱ्या पेंटोग्राफमुळे मरे प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट झाला आणि त्यांनी मुंबईची जीवनवाहिनी तब्बल पाच तास रोखून ठेवली.

Kill Murray | मरेला मार

मरेला मार

googlenewsNext

मुंबई / ठाणे : नेमेचि तुटणाऱ्या पेंटोग्राफमुळे मरे प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट झाला आणि त्यांनी मुंबईची जीवनवाहिनी तब्बल पाच तास रोखून ठेवली. रेल्वे पोलिसांचा लाठीचार्ज आणि प्रवाशांची दगडफेक या साऱ्या गदारोळात रेल्वेच्या मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. प्रवाशांनी रेल्वे कर्मचाऱ्यांनाही वेठीस धरले. त्रास सहन करून थकलेल्या प्रवाशांनी मरेला चांगलाच मार दिला.


शेकडो महिला प्रवाशांच्या किंकाळ्या!
दिवा रेल्वे स्थानकात शुक्रवारी घडलेल्या दगडफेकीत जो तो स्वत:ला वाचवण्यासाठी धावपळ करत होता. त्यातच महिला प्रवासी तर प्रत्येक दगड पडल्याच्या आवाजानंतर जणू काही आपल्याच दिशेने दगड भिरकावण्यात आला असून, तो आपल्यावर पडेल, या भीतीपोटी किंकाळत होत्या. त्यामुळेही स्थानकात महिलांच्या ओरडण्यासह वाचवा, वाचवाचा टाहो होता. प्रत्यक्षदर्शी अ‍ॅड. आदेश भगत यांनी ही स्थिती सांगितली.
लाखोंना लेटमार्कसह दांड्या :
या घटनेमुळे लाखो चाकरमान्यांना लेटमार्कला सामोरे जावे लागले, तर अनेकांनी मध्येच अडकून पडल्यामुळे ट्रॅकमधून पदयात्रा करीत घराकडे मार्गक्रमण केले. त्यामुळे त्यांची कामाच्या ठिकाणी दांडीच झाली.

१मध्य रेल्वेवरील गोंधळाबाबत मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री व नेत्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती दिली. मात्र, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या सरबराईत गुंतलेल्या या नेत्यांनी चर्चा तरी कधी केली आणि त्यातून काय साधले हे गुुलदस्त्यातच आहे.

२मध्य रेल्वे खोळंबल्याने प्रवाशांत संतप्त प्रतिक्रिया उमटल्याचे वृत्त सकाळी झळकू लागले. तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गृहराज्य मंत्री डॉ. रणजीत पाटील यांना घटनास्थळी धाडल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली. शिवाय भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.

३ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व कल्याणचे खा. श्रीकांत शिंदे यांनीही रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंशी थेट चर्चा केल्याचे म्हटले. तर, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रेल्वेमंत्र्यांशी चर्चा केल्याचा दावा केला. शिवाय उपनगर जिल्हाधिकारी, बेस्ट महाव्यवस्थापक, ठाणे व कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांशी चर्चा करून प्रवाशांसाठी तातडीने जादा बसेस सोडण्याच्या सूचना दिल्याचे तावडे म्हणाले.

प्रवाशांचा ट्रान्स हार्बरमार्गे प्रवास
मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याचा परिणाम ट्रान्स हार्बर मार्गावरही जाणवला. दरम्यान मोटरमनने काही काळ आंदोलन केल्यामुळे ट्रान्स हार्बर सेवा ठप्प झाली, मात्र आंदोलन मागे घेताच सीएसटीला जाणाऱ्या अनेक प्रवाशांनी पर्यायी मार्ग म्हणून ट्रान्स हार्बर मार्गाची निवड केली. प्रवाशांच्या आंदोलनामुळे मध्य रेल्वे तीन ते चार तासांनंतरही सुरू न झाल्याने अनेक प्रवासी राज्य परिवहन, पालिका परिवहनच्या बस किंवा खाजगी वाहनांनी ठाणे ऐरोलीत दाखल झाले.

नाशिककरही अडकले
मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावरील लोकलच्या गोंधळामुळे राज्यराणी, पंचवटी, गोदावरी एक्स्प्रेस या कल्याण स्थानकाच्या आसपास अडकल्या. त्यामुळे नाशिककरांनी शुक्रवारी सुट्टी मारत कल्याणहून परतीचा मार्ग स्वीकारला. गोंधळामुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे ५-६ तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल झाले. वाहतूक कधी पूर्ववत होईल याची माहिती उपलब्ध होत नसल्याने बहुसंख्य प्रवासी रस्त्याच्या मार्गाने माघारी परतले.

पाच तास हाल
सीएसटी-कल्याणला डाऊन लोकल दु. १२.१६ला तर कल्याण-सीएसटी अप लोकल दुपारी १२.४०च्या सुमारास रवाना झाली, त्यानंतर हळूहळू दु. १२.४०ला अप जलद, त्यापाठोपाठ दु. १.१८ला डाऊन जलदची वाहतूक सुरू झाली. मात्र संध्याकाळपर्यंत वाहतूक मंदगतीने सुरू होती. हार्बर मार्गावरील वाहतूकही सुरू होती, तर ट्रान्स हार्बरची वाहतूक १० मिनिटे विलंबाने सुरू होती.

टपावरून प्रवास
या घटनेमुळे अनेकांनी डोंबिवलीत येत वाशीमार्गे ठिकठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी कल्याणला पायी जाण्यापेक्षा डोंबिवलीत येऊन प्रवास करणे पसंत केले. यामुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली. या गोंधळामुळे बसही ओव्हरलोड झाल्या होत्या. काहींनी बसमध्ये शिरण्यास जागा नसल्याने टपावर बसून प्रवास केला.

टॅक्सीचालकांची चंगळ
मध्य रेल्वेच्या मार्गावरील गोंधळाचा फटका चाकरमान्यांना बसला असला, तरी ठाणे ते मुंबई आणि मुंबई ते ठाणेदरम्यानच्या टॅक्सीचालकांनी या धावपळीचा चांगलाच फायदा उठवला. दादर ते मुलुंडचे टॅरिफ साधारणपणे २८० रुपये होते, तर वरळी ते ठाण्याचे टॅरिफ ३७० रुपयांपर्यंत जाते़ मात्र आज दादर ते मुलुंड सरसकट ५०० रुपये तर वरळी ते ठाणे ८०० रुपये आकारले. चाकरमान्यांना ही लूट निमूटपणे सहन करावी लागली. तर या प्रकारामुळे रिक्षावाहतुकीची चंगळ होती. अनपेक्षितपणे भाडे मिळाल्याने रिक्षाचालक १० ते २० रुपयांच्या ठिकाणी तब्बल १०० ते २०० रुपये भाडे आकारत होते.

घटनाक्रम
06:50 कल्याण - ठाकुर्ली अप स्लोवर लोकलचा पेंटाग्राफ अडकला.
07:26 पर्यंत ‘मरे’ने घेतला तत्काळ पॉवर ब्लॉक.
08:25 डाऊन/अपची जलद वाहतूक सुरू.
09:05 बदलापूरसह कल्याण या लोकल कारशेडला रवाना. तरीही अप धीम्या मार्गावर वाहतूक सुरू नाही.
10:40 दिवा स्थानकात प्रवाशांचा उद्रेक, दगडफेकीसह तोडफोड, लोकल वाहतूक ठप्प.
12:00 मोटरमनचे आंदोलन, सुरक्षाकवचाची मागणी.
12:16 वाहतूक सुरू, डाऊन धीम्या मार्गावरून लोकल धावली.
12:40 अप धीमा-जलद मार्ग सुरू.
01:18 डाऊन जलदची वाहतूक सुरू.

बेस्ट, केडीएमटी, एसटी सरसावली
मध्य व हार्बर रेल्वे ठप्प झाल्यामुळे फलाटांवर अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी बेस्ट धाऊन आली़ मुंबईतील नऊ बसमार्गांवर दुपारी १२़३०नंतर १९ जादा बसगाड्या सोडण्यात आल्या़ महत्त्वाची बस स्थानके, बस थांबे व गर्दीच्या ठिकाणी या बससेवा धावत होत्या़ मध्य रेल्वे रुळावर आली तरी सेवा सुरळीत होईपर्यंत बेस्ट सेवा सुरू राहिली़ मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर आणि अंधेरी बस आगारांतून या गाड्या सोडण्यात येत होत्या़
केडीएमसीनेही ठाणे, पनवेल, बदलापूर मार्गावर खास बस सोडल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक सुधीर राऊत यांनी दिली. सकाळी ९च्या सुमारास थेट मुंबईसाठी २ बसेस, ठाण्यासाठी ४ कल्याण-डोंबिवली येथून सोडण्यात आल्या. एसटीच्या कल्याण आगारातूनही ठाणे, मुंबईसाठी खास बसेसची सोय करण्यात आली.

 

Web Title: Kill Murray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.