कृष्णा किरवले यांची हत्या

By Admin | Published: March 4, 2017 01:06 AM2017-03-04T01:06:34+5:302017-03-04T01:06:34+5:30

धक्कादायक घटना : ज्येष्ठ आंबेडकरवादी लेखक, संशोधक हरपला

Krishna Kirvil murder | कृष्णा किरवले यांची हत्या

कृष्णा किरवले यांची हत्या

googlenewsNext

कोल्हापूर : महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, ज्येष्ठ साहित्यिक व शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख डॉ. कृष्णा रामभाऊ किरवले (वय ६३, रा. म्हाडा कॉलनीजवळ, राजेंद्रनगर, कोल्हापूर) यांची शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास गळा चिरून अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली.
ही घटना फर्निचरचे २५ हजार रुपये वेळेत न दिल्याच्या रागातून झाल्याचे स्पष्ट झाले असून, पोलिसांनी या प्रकरणी प्रीतम गणपती पाटील (वय ३०, रा. राजेंद्रनगर) यास तातडीने ताब्यात घेतले आहे. किरवले यांच्या हत्येमुळे दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. ही हत्या दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी या मालिकेतील असून, त्यामागे हिंदुत्ववाद्यांचे षड्यंत्र असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्या दिशेने पोलिसांनी तपास करावा, असा त्यांनी आग्रह धरला. त्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांना घेरावही घातला; परंतु हत्येचे कारण व संशयित आरोपीस ताब्यात घेतल्याचे समजल्यावर हे कार्यकर्ते शांत झाले.
या प्रकरणी विजयसिंह मोहनसिंह राजपूत (वय ३४ रा. राजेंद्रनगर) या आरोपीच्या मित्राच्याच तक्रारीवरून राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. घटनास्थळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलिस उपअधीक्षक हर्ष पोद्दार यांनी भेट दिली. या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.
किरवले यांची मुलगी अनघा ही पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात पीएच. डी. करते. शनिवारी पंचगंगा स्मशानमभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. किरवले हे मूळचे बीड जिल्ह्यातील टाकळी आचार्य (ता. परळी वैजनाथ) गावचे होते. नोकरीनिमित्ताने ते येथे सोळा वर्षांपूर्वी आले व या शहराच्या सामाजिक चळवळीचे महत्त्वाचे अंग बनून गेले. येथील निवासस्थानी ते पत्नी कल्पना यांच्यासमवेत राहत होते. त्या दुपारी घरीच होत्या. त्यावेळी संशयित प्रीतम पाटील हा पैसे मागण्यासाठी घरी आला. दुसऱ्या मजल्यावर त्याने किरवले यांच्याशी वाद घातला.
त्यानंतर धारदार शस्त्राने किरवले यांच्या डोक्यात वार झाल्यावर ते जोराने ओरडले म्हणून त्यांची पत्नी वर गेल्यावर त्यांनी किरवले यांना रक्ताने माखलेल्या शरीरासह आरोपीने हाताने दाबून धरल्याचे पाहिले. ते पाहून भीतीने त्या ओरडतच बाहेर धावत आल्या. तोपर्यंत आरोपीने दरवाजा बंद करून घेतला. पत्नीने जवळच राहत असलेल्या नातेवाइकांना हा प्रकार सांगितला. आजूबाजूचे लोक धावून गेले; परंतु तोपर्यंत किरवले यांच्या गळयावर केले होते. आरोपीचे शरीर रक्ताने माखले होते. त्याने जवळचा मित्र विजयसिंह मोहनसिंह राजपूत याला फोन करून आपण खून केल्याचे व लोक जमले आहेत तर तू लवकर ये असे सांगितले. तिथून तो पसार झाला.
डॉ. किरवले यांच्यावर हल्ला झाल्यानंतरही रक्ताने माखलेल्या शरीरासह जिवाच्या आकांताने पळत दुसऱ्या मजल्यावरून खाली आले. त्यामुळे जिना व घरही रक्ताने माखले होते. ते पाहताना अंगावर शहारे येत होते. शेवटी रक्तस्राव जास्त झाल्यावर पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये ते कोसळले व तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर रात्री शवविच्छेदन करण्यात आले. पोलिसांनी संशयिताचे वडील गणपती पाटील व त्याच्या पत्नीस चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
डॉ. किरवले यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात झाले. तिथेच १९८० ला ते एम.ए. झाले. पुढे १९८७ ला त्यांनी ‘दलित शाहिर व त्यांची शाहिरी’ या विषयावर पीएच. डी. केली. पुण्यातील गरवारे वाणिज्य महाविद्यालयातून १९८७ पासून सहायक प्राध्यापक म्हणून त्यांनी अध्यापनाचे काम सुरू केले. त्यानंतर पुणे विद्यापीठातही काम केले. पुढे २००२ ला ते शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागात रुजू झाले. मराठी विभागाचे ते दोन वेळा प्रमुख होते. विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचेही संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. दलित आणि ग्रामीण शब्दकोश निर्मितीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला. त्यांनी आंबेडकरी चळवळ, शाहिरी या विषयांवर दहा ग्रंथांचे लेखन केले आहे. या चळवळीचा भाष्यकार अशी त्यांची महाराष्ट्राला ओळख होती.

मित्राच्या मुलानेच केला घात..
डॉ. कृष्णा किरवले व संशयित आरोपी प्रीतम याचे वडील गणपती पाटील यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. ते राहायलाही शेजारी होते. या ओळखीतूनच प्रीतमच्या वडिलांनी फर्निचरचे काम केले होते. फर्निचरच्या पैशासाठी प्रीतमने गेल्या काही दिवसापासून तगादा लावला होता. तो आज किरवले यांची हत्या करण्याच्या हेतूनेच गेला होता, असे पोलिस तपासात पुढे आले आहे.

पैसे देऊन टाका
हत्या झाल्यानंतर नातेवाइकांनी पत्नी कल्पना यांना शेजारच्या घरातून हाताला धरून आणले. त्यावेळी त्या ‘पैसे देऊन टाका... आपणाला हे घर नको. येथून दुसरीकडे राहायला जाऊ असे मी त्यांना सांगत होते; पण त्यांनी ऐकले नाही.’ असे मोठमोठ्याने म्हणत होत्या. त्यानंतर त्या दुसऱ्या मजल्यावर गेल्या. खाली कार्यकर्ते घोषणा देताना पाहून त्यांनीही खिडकीत येऊन ‘डॉ. आंबेडकर यांचा विजय असो..’ अशा घोषणा दिल्या.


पंचगंगा स्मशानभूमीत आज अंत्यसंस्कार
डॉ. कृष्णा किरवले यांचे बंधू परमेश्वर किरवले हे औरंगाबादहून तर मुलगी अनघा ही पुण्यातून रात्री उशिरापर्यंत कोल्हापुरात आले. त्यानंतर किरवले यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून पार्थिव सीपीआरच्या शवागृहात ठेवण्यात आले. किरवले यांची अंत्ययात्रा आज, शनिवारी सकाळी अकरा वाजता दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्यापासून सुरू होणार आहे. ती बिंदू चौकात आल्यानंतर तिथे शोकसभा होईल. त्यानंतर शिवाजी चौकमार्गे अंत्ययात्रा पंचगंगा स्मशानभूमीत जाईल. तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यसंस्कारासाठी केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. गंगाधर पानतावणे यांच्यासह आंबेडकर चळवळीतील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Krishna Kirvil murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.