मोबाइलमध्येच कृषिपंपाचा रिमोट कंट्रोल
By admin | Published: October 12, 2015 05:29 AM2015-10-12T05:29:45+5:302015-10-12T05:29:45+5:30
लोडशेडींगमुळे रात्री-अपरात्री येणाऱ्या विजेमुळे शेतकऱ्यांचे हाल होऊ नयेत म्हणून पुण्याच्या एका युवकाने नामी शक्कल लढवली आहे.
मनोहर कुंभेजकर, मुंबई
लोडशेडींगमुळे रात्री-अपरात्री येणाऱ्या विजेमुळे शेतकऱ्यांचे हाल होऊ नयेत म्हणून पुण्याच्या एका युवकाने नामी शक्कल लढवली आहे. शेतीला पाणी देणाऱ्या मोटरचा स्वीच मोबाइलवरून चालू बंद करणाऱ्या उपकरणाचा शोध पुण्याच्या शरद काळेने लावला आहे.
काळे यांनी सांगितले की, ‘शेतकऱ्यांना मध्यरात्री शेतात जाऊन मोटर सुरू करावी लागते. त्यात सर्पदंश, प्राण्यांचे हल्ले आणि शॉक लागून अनेक शेतकऱ्यांचे मृत्यू होतात. या त्रासापासून हे उपकरण शेतकऱ्यांची सुटका करेल. रात्री करावी लागणारी पायपीटही टळेल.’
शरद काळे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. या उपकरणात मोटर चालू बंद करण्यासह अन्यही काही फिचर्सचा समावेश आहे. हे उपकरण मोटरमध्ये बिघाड होण्यापूर्वी ती बंद करते आणि तशी माहिती फोन करून शेतकऱ्याला कळवते, असा दावाही काळे यांनी केला आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता यावे, म्हणून ‘महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित’ (एमएआयडीसी) ही संस्था काळे यांना मदत करणार आहे.