सोन्याच्या कारखान्यातून ९० लाखांचे दागिने लंपास
By admin | Published: August 12, 2014 02:49 AM2014-08-12T02:49:10+5:302014-08-12T02:49:10+5:30
बंद कारखान्याचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी ९० लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना शनिवारी भायखळा येथे घडली.
मुंबई : बंद कारखान्याचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी ९० लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना शनिवारी भायखळा येथे घडली. याबाबत काळाचौकी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
भायखळ्याच्या हरिहंत टॉवरमध्ये राहणारे अरविंद नाईक यांचा याच परिसरातसोन्याचे दागिने तयार करण्याचा कारखाना आहे. शनिवारी रात्री या कारखान्यातील कामगार काम संपवून घरी गेले. त्यानंतर नाईकदेखील कारखाना बंद करून घरी परतले. रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ते पुन्हा कारखान्यात आले. काही दागिने व्यापाऱ्यांकडे डिलेव्हरी करायचे असल्याने त्यांनी कपाट उघडले. मात्र कपाटातील सर्व दागिने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ही बाब तत्काळ काळाचौकी पोलिसांना सांगितली. त्यानुसार घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पंचनामा करून कारखान्यातील आणि कारखान्याबाहेर असलेले सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेतले. चोरट्यांनी कुठल्याही प्रकारची तोडफोड न करताच दागिने लंपास केले आहेत. त्यामुळे चोरट्यांनी बनावट चावीचा वापर केल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. ही चोरी ओळखीच्याच व्यक्तींनी केल्याचा संशयही व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)