लोकसभेत गायकवाड प्रकरणी शिवसेनेचा रूद्रावतार

By Admin | Published: April 6, 2017 08:18 PM2017-04-06T20:18:41+5:302017-04-06T20:18:41+5:30

लोकसभेत रविंद्र गायकवाड प्रकरणी शिवसेनेने रूद्रावतार धारण केला. संसदेत दिवसभर शिवसेनेच्या आक्रमकतेचीच चर्चा सुरू होती.

In the Lok Sabha, Shiv Sena's Rudravarta in Gaikwad case | लोकसभेत गायकवाड प्रकरणी शिवसेनेचा रूद्रावतार

लोकसभेत गायकवाड प्रकरणी शिवसेनेचा रूद्रावतार

googlenewsNext

सुरेश भटेवरा
नवी दिल्ली, दि. 6 : लोकसभेत रविंद्र गायकवाड प्रकरणी शिवसेनेने रूद्रावतार धारण केला. संसदेत दिवसभर शिवसेनेच्या आक्रमकतेचीच चर्चा सुरू होती. शिवसेना आक्रमक असली तरी एअर इंडियाने गायकवाडांवरील प्रवासबंदी उठवलेली नाही तथापि सायंकाळपर्यंत गायकवाडांनी संसदेत व विमानात घडलेल्या प्रकरणाबाबत खेद व्यक्त करणारे पत्र हवाई वाहतूक मंत्र्यांकडे पाठवले, अशी माहिती सूत्रांकडून समजली. सदर प्रकरणावर सन्मानजनक पडदा टाकण्यासाठी एकीकडे सरकारची धावपळ सुरू आहे तर दुसरीकडे गायकवाडांवरील बंदी उठेपर्यंत एनडीएच्या बैठकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. आता शिवसेनेच्या आक्रमकतेपुढे सरकार किती झुकत,े याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
लोकसभेत संतप्त तणाव
लोकसभेत उस्मानाबादचे खासदार गायकवाड यांनी २३ मार्च रोजी घडलेल्या घटनाक्रमाबाबत आपली बाजू कथन केल्यानंतर हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी त्यांना उत्तर दिले. गायकवाड यांच्यावरील बंदी हटवण्याबाबत मात्र राजू यांनी कोणतेही आश्वासन दिले नाही. त्यावर संतापलेल्या शिवसेना खासदारांनी सभागृहात राजू यांना प्रथम घेराओ घातला. पाठोपाठ गायकवाड यांच्या विमान प्रवासावरील बंदी हटवली नाही तर मुंबई विमानतळावरून एकही विमान उडू देणार नाही, अशा घोषणा देत सारे शिवसेना खासदारअध्यक्षांच्या आसनासमोर आले. दरम्यान शेजारीच बसलेल्या अशोक राजू यांच्यावर अवजड उद्योग मंत्री अनंत गीते संतप्त आवेशात भडकले. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून लोकसभाध्यक्षा सुमित्राताई महाजन यांनी लोकसभेचे कामकाज तात्काळ तहकूब केले. सदर प्रकरणात एकुण तीन वेळा लोकसभेचे कामकाज तहकूब झाले.
रविंद्र गायकवाडांचे निवेदन
लोकसभेत घटनाक्रमाविषयी निवेदन करतांना रविंद्र गायकवाड म्हणाले, ‘पुणे विमानतळावरून २३ मार्च रोजी संसदेच्या अधिवेशनासाठी एअर इंडियाच्या विमानाने मी निघालो. बिझिनेस क्लास तिकीटाचे भाडे आकारले असतांना पूर्वसूचनेशिवाय मला इकॉनॉमी क्लासने प्रवास करायला लावला. कर्मचाऱ्यांकडे मी तक्रार पुस्तक मागीतले तर ते त्यांनी दिले नाही. दिल्ली विमानतळावर विमान उतरल्यावर माझ्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा तोपर्यंत मी विमानातून उतरणार नाही, असे मी सांगीतले. तेव्हा टाळाटाळ करीत ४५ मिनिटांनी एक अधिकारी आला (जो एअर इंडियाचा अधिकारी नाही असे नुकतेच मला समजले.) चढया आवाजाने ओरडत तो माझ्याशी बोलू लागला. तेव्हा मी म्हणालो, शांततेने मी तुमच्याशी बोलतो आहे तेव्हा तुम्ही देखील आवाज खाली करा. मग मी विचारले, तुम्ही कोण आहात? उत्तरादाखल तो म्हणाले, मै एअर इंडिया का बाप हूं। सिक्युरीटी अफसर हूं। मी म्हणालो, मै एमपी हूं। त्यावर पुन्हा मोठयाने ओरडत तो म्हणाला, एमपी हुआ तो क्या हुआ, तु नरेंद्र मोदी है क्या? माझी कॉलर पकडून त्याने मला ढकलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या वर्तणुकीचा संताप आल्यावर मी देखील त्याला ढकलले. त्याने मला शिवीगाळही केली त्याची व्हिडिओ क्लिप उपलब्ध आहे. सदर प्रकरणामुळे संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का बसला असेल तर त्याबद्दल मी संसदेची माफी मागतो मात्र त्या अधिकाऱ्याची माफी मी कदापि मागणार नाही.
मी प्राध्यापक आहे, नम्रता माझ्या स्वभावात आहे. मला शिवीगाळ व धक्काबुक्की करणाऱ्याच्या आरोपावरून माझ्याविरूध्द भादंवि कलम ३0८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ज्याचा अर्थ मी त्याच्या हत्येचा प्रयत्न केला असा होतो. सर्वांनाच कल्पना आहे की विमानात कोणताही प्रवासी शस्त्रासह प्रवास करू शकत नाही, तरीही हे विचित्र कलम माझ्याविरूध्द लावण्यात आले. लोकशाहीच्या या सर्वोच्च सदनात स्वत:ला निर्दोष सिध्द करण्यासाठी मी उभा नाही तर लाखो लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीबरोबर विमान कर्मचारी कसा दुर्व्यवहार करतात आणि उलटा खासदारालाच गुन्हेगार ठरवण्याचा कसा डाव रचतात, त्याची कहाणी सांगण्यासाठी उभा आहे. या घटनाक्रमाची संपूर्ण चौकशी करावी. दोषी अधिकारी तसेच विशेषत: एअर इंडियाचे सीएमडी ज्यांनी कोणत्याही चौकशीशिवाय सोशल मीडियावर माझ्यासह तमाम खासदारांची बदनामी केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे ’
लोकसभेत शिवसेना खासदारांच्या संतापाचा उद्रेक होण्यास मुख्यत्वे दोन कारणे घडली.घटनाक्रमासंबंधी गायकवाडांनी निवेदन केल्यानंतर हवाई वाहतूक मंत्री म्हणाले, ‘दररोज हजारो प्रवासी विमानाने प्रवास करतात. त्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करता येणे शक्य नाही. शिवसेनेला सदर प्रकरण शांततेने मिटवायचे असेल तर ते मिटवायची तयारी आहे. प्रकरण वाढवायचे असेल तर तो त्यांच्या इच्छेचा प्रश्न आहे’.
मंत्र्यांच्या निवेदनानंतर शिवसेना खासदारांच्या संतापाचा उद्रेक झाला. त्याच दरम्यान तृणमूलचे गटनेते कल्याण बॅनर्जी यांनी मंत्र्यांना विचारले की ‘एखाद्या व्यक्तिच्या प्रवासावर कोणत्या कायद्यानुसार सर्व एअरलाईन्स एकतर्फी बंदी घालू शकतात, याचा आपण खुलासा कराल काय?’ बॅनर्जींच्या या प्रश्नाला अन्य विरोधी खासदारांनीही साथ दिली. परिणामी संतप्त वातावरणात आणखीनच भर पडली मग अनंत गीते हवाई वाहतूक मंत्र्यांवर भडकले. त्यांचा संताप आवरून त्यांना पुन्हा आपल्या आसनावर बसवण्यासाठी स्मृती इराणी व गृहमंत्री राजनाथसिंगांना हस्तक्षेप करावा लागला. तर दुसरीकडे राज्यमंत्री अहलुवालिया हवाई वाहतूक मंत्र्यांना सभागृहाबाहेर घेउन गेले. दरम्यान शिवसेनेच्या आक्रमक आवेशामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी ३ वाजेपर्यंत तीनदा तहकूब झाले. अखेर या प्रकरणावर पडदा टाकतांना लोकसभेत राजनाथसिंग म्हणाले, अशा दुर्देवी घटना सभागृहात घडायला नकोत. गायकवाडांनी आपले म्हणणे मांडले आहे. दरम्यान अनंत गीते आणि अशोक गजपती राजू यांची आपसात चर्चा झाली आहे. शिवसेनेचे खासदार रविंद्र गायकवाड यांच्या विमान प्रवासावर एअर इंडियासह अन्य विमान कंपन्यांनी घातलेल्या बंदी प्रकरणातून सौहार्दपूर्ण रितीने लवकरच मार्ग काढला जाईल.
शिवसेनेची पत्रपरिषद
संसद भवनातील शिवसेनेच्या पत्रपरिषदेला गुरूवारी पत्रकारांची तुफान गर्दी उसळली. पत्रकारांना संबोधतांना सेनेचे राज्यसभेतील नेते संजय राऊ त म्हणाले,
‘रविंद्र गायकवाड यांच्या विमान प्रवासावरील बंदी त्वरित उठवली गेली नाही तर १0 तारखेला होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत शिवसेना सहभागी होणार नाही, हे शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरेंच्या आदेशानुसार मी आपणास सांगतो आहे.कोण सीएमडी? त्याची औकात ती काय? विजय मल्ल्या सारख्या आर्थिक गुन्हेगारांना देशातून पळून जाण्यासाठी ज्या विमान कंपन्या मदत करतात, गुन्हेगार, दहशतवादी बिनदिक्कतपणे विमानातून फिरतात. त्या एअरलाईन्स गायकवाडांवर बंदी कशी घालू शकतात? गायकवाड काय दहशतवादी आहेत, आम्हाला सभ्यपणा शिकवणाऱ्यांनी अगोदर स्वत: सभ्यपणे वागायला शिकावे. कोणाच्या दबावाखाली हे सारे घडते आहे, कोण शिवसेनेला जाणीवपूर्वक टार्गेट करतो आहे, त्यांना एकच गोष्ट आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की शिवसेना आंदोलनातून उभा राहिलेला पक्ष आहे. कोणताही अन्याय आम्ही सहन करणार नाही.’


 

Web Title: In the Lok Sabha, Shiv Sena's Rudravarta in Gaikwad case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.