लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२२: कोणता आयपीएस अधिकारी तुम्हाला वाटतोय सर्वात प्रॉमिसिंग?; Vote Now

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 01:51 PM2022-09-17T13:51:50+5:302022-09-17T13:59:54+5:30

महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा कृतज्ञ सन्मान म्हणजे, 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार.

Lokmat Maharashtrian of the Year 2022: Here are nominees for IPS Promising category | लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२२: कोणता आयपीएस अधिकारी तुम्हाला वाटतोय सर्वात प्रॉमिसिंग?; Vote Now

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२२: कोणता आयपीएस अधिकारी तुम्हाला वाटतोय सर्वात प्रॉमिसिंग?; Vote Now

googlenewsNext

महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा कृतज्ञ सन्मान म्हणजे, 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार. लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. यंदाचं या पुरस्कारांचं आठवं पुष्प. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. 'प्रशासन - आयपीएस - प्रॉमिसिंग' या श्रेणीत पाच जणांना नामांकन मिळालं आहे. त्यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांना मत देण्यासाठीची लिंक खाली दिली आहे. तुमची मतं आणि मान्यवर ज्युरींनी दिलेले गुण याद्वारे पुरस्कार विजेत्याची निवड होईल. 

अनिल पारसकर- डीसीपी, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई

 

बीडमध्ये गाजलेल्या बलात्कार आणि दुहेरी हत्याकांडातील आरोपींना अटक करून त्यांना कठोर शिक्षेपर्यंत पोहचविण्याचे कार्य करणारे आणि कोराना काळात ई-पास प्रणाली ज्यांच्या कल्पनेतून राज्यभर लागू करण्यात आली ते अधिकारी म्हणून पोलीस उपायुक्त अनिल पारसकर यांचे नाव घ्यावे लागेल. कोरोना काळात अनेक नागरिक आपल्या घरापासून लांब इतर शहरात अडकले होते. त्यांना पुन्हा घरी पोहोचवण्यासाठी सरकारकडून परवाना देण्यास सुरुवात केली. परवाना मिळवण्यासाठी नागरिक पोलीस स्टेशनबाहेर गर्दी करत असल्यामुळे पोलिसांवर ताण वाढला. त्यावेळी पारसकर रायगडमध्ये पोलीस अधीक्षक होते. त्यांच्या कल्पनेतून एक पोर्टल तयार झाले. या पोर्टलच्या माध्यमातून प्रवास परवाना देण्यास सुरुवात केल्यामुळे पोलीस प्रशासनाचे काम सुसह्य झाले होते. त्यांनी गोंदिया येथून सेवेला सुरुवात केली. तेथून अंबाजोगाई, बीड, रायगड येथे उल्लेखनीय, धडाकेबाज कामगिरी बजावत ते राज्य गुप्तवार्ता विभागात आले. त्यांच्या नेतृत्वात अनेक संवेदनशील गुन्ह्यांची उकल करण्यात आली. बारावी सायन्सला गणितात दोनदा नापास झाल्यावरही खचून न जाता जिद्द आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी पुढे यश मिळवले. विशेष म्हणजे बारावी उत्तीर्ण होणारे पारसकर हे त्यांच्या घरातील एकमेव होते. बारावीनंतर आयएएस होण्याचे स्वप्न घेऊन ते पुण्यात आले. आई-वडिलांनी त्यांच्या स्वप्नाला पाठबळ दिले. पुण्यात एसपी महाविद्यालयात बी.एस्सी.ला प्रवेश घेतला. बी.एस्सी.नंतर स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. यूपीएससीच्या तिसऱ्या प्रयत्नात पारसकर यांची २००८ मध्ये आयपीएससाठी निवड झाली. यूपीएससीच्या परीक्षेतील यशानंतर पारसकर हे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांसाठी प्रेरणास्त्रोत बनले आहे.

मत देण्यासाठीइथे क्लिक करा

अंकित गोयल- जिल्हा पोलीस प्रमुख, गडचिरोली

नक्षलवाद्यांच्या चकमकींमध्ये २७ वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणारा नक्षल नेता मिलिंद तेलतुंबडेसह ५४ नक्षलवादी मारले गेले. दोन वर्षात ४४ जणांना अटक करण्यात यश आले. १२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यामुळेच गडचिरोलीत सेवा देणाऱ्या ४२ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्य पदक, ३ जणांना शौर्यचक्र तर २ जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक ऑगस्ट २०२२ मध्ये जाहीर करण्यात आले. एवढ्या संख्येने एका जिल्ह्यात एकावेळी शौर्य पदक जाहीर होणारा गडचिरोली हा पहिलाच जिल्हा ठरला. या कामगिरीत गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या कामगिरीचा मोठा वाटा आहे. २८ सप्टेंबर २०२० रोजी अंकित गोयल यांनी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार घेतला. वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी विशेष उपक्रम सुरू केला. इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीची पदवी घेऊन भारतीय पोलीस सेवेत १३ फेब्रुवारी २०१२ रोजी रुजू झालेले तरुण पोलीस अधिकारी अंकित गोयल यांच्याकडे अवघ्या आठ वर्षांच्या सेवेनंतर गडचिरोलीसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याची धुरा आली. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचे पुनर्वसन, १६ आत्मसमर्पितांचा सामूहिक विवाह, दुर्गम भागातील लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ''पोलीस दादालोरा खिडकी'', अर्थात ‘पोलीस दादाची खिडकी’ उपक्रम, २१ हजार नागरिकांना विविध योजनांचा लाभ, दोन हजार युवांना विविध क्षेत्रात रोजगार, असे अनेक उपक्रम त्यांनी केले.

मत देण्यासाठीइथे क्लिक करा

मनोज पाटील- जिल्हा पोलीस प्रमुख, अहमदनगर

 

माझ्या कार्यकाळात गुन्हे वाढले, असे सांगणारे पोलीस अधीक्षक आहेत मनोज पाटील. तक्रारदार आला की, त्याची तक्रार दाखलच करून घेतली जाईल, याची हमी नसते. ठाणे अंमलदार केवळ तक्रार अर्ज घेतात, अदखलपात्र गुन्हा नोंदवून बोळवण करतात. मनोज पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यात या प्रथा बंद केल्या. तक्रार अर्ज घ्यायचा नाही. थेट गुन्हा नोंदवायचा. अदखलपात्र गुन्हा नोंदवून एखादा गुन्हा बेदखलही करायचा नाही. गुन्हे दाखल होतील तेव्हाच गुन्हेगारांना चाप बसेल, असे त्यांचे म्हणणे आहे. यामुळे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण १५ टक्के वाढले. २०२० पर्यंत उशिराने दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण दरमहा २४८ होते. ते नंतर ३७ वर आले. अहमदनगर पोलिसांचे ई-टपाल सुरू केले. या प्रणालीत पोलीस स्टेशनला आलेल्या प्रत्येक टपालाचा ट्रॅक दिसतो. घरबसल्या नागरिक हे पाहू शकतात. या प्रणालीला २०२२ साली राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार मिळाला. काही आदिवासी जमातींवर गुन्हेगारीचा शिक्का मारण्यात आला. या तरुणांना रोजगार देण्यासाठी २०२२ साली मेळावा घेत १,०२३ तरुणांना रोजगार दिला. दोन वर्षांत प्रलंबित प्रकरणांची संख्या ५३ हजाराहून ९ हजारांवर आणली. खून, दरोडा, चोरी अशा गुन्ह्यांतील ४ हजार ७४० आरोपी फरार होते. विशेष मोहीम राबवत १ हजार ६२७ आरोपींना अटक केली. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत २ हजार १७४ प्रकरणे गहाळ होती. ही प्रकरणे रेकॉर्डवर आणून शोध घेतला. अपहरणाच्या प्रकरणांचा तपास लावण्यासाठी ‘ऑपरेशन मुस्कान’ राबवले.

मत देण्यासाठीइथे क्लिक करा

निलोत्पल- डीसीपी झोन २, मुंबई

 

सोन्याच्या दागिन्याच्या खरेदी-विक्रीच्या होलसेल व्यवसायाच्या बहाण्याने मुंबईतील सराफांचे कोट्यवधी रुपये घेऊन पसार झालेल्या एस. कुमार ज्वेलर्स अँड डायमंड कंपनीचा मालक श्रीकुमार पिल्लईलाहीला जेरबंद करणारे अधिकारी म्हणून नीलोप्तल यांचा उल्लेख होतो. मालेगाव, नागपूरसारख्या संवेदनशील भागात सेवा बजावल्यानंतर नीलोत्पल यांच्याकडे मुंबई गुन्हे डिटेक्शन १ ची जबाबदारी दिली. अंगडिया खंडणी प्रकरणात यापूर्वीच परिमंडळ २ चे डीसीपी सौरभ त्रिपाठी यांना निलंबित केल्यानंतर डीसीपी योगेशकुमार यांच्याकडे झोन २ चा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्वर ओक बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांच्या हल्ल्यानंतर तडकाफडकी डीसीपी योगेशकुमार यांचा अतिरिक्त कार्यभार काढून घेत नीलोत्पल यांची झोन दोनचे पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्त केली. परिमंडळ २ चा पदभार सांभाळल्यानंतर त्यांनी अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल केली आहे. बिहारच्या भागलपूरचे रहिवासी असलेले नीलोत्पल यांनी भागलपूरमध्येच शिक्षण पूर्ण केले. मेकॅनिकल इंजिनिअरिंगनंतर हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये प्रोजेक्ट इंजिनिअर म्हणून चांगल्या पगाराची नोकरी लागली. नोकरीबरोबर अभ्यासाला पुरेसा वेळ देणे शक्य नसल्याने विशाखापट्टणम येथे तीन वर्षे सेवा बजावल्यानंतर २०११ मध्ये राजीनामा देत यूपीएसीच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी त्यांनी दिल्ली गाठली. चांगल्या पगाराची नोकरी सोडून घेतलेला निर्णय कुटुंबीयांना मान्य नव्हता. परीक्षेसाठी सोशल मीडियापासून ब्रेक घेतला. मित्र दुरावले. हातात पुरेसे पैसेही नसल्याने काटकसर करत परीक्षा दिली आणि २०१४ च्या बॅचचे आयपीएस झाले.

मत देण्यासाठीइथे क्लिक करा

शैलेश बलकवडे- जिल्हा पोलीस प्रमुख, कोल्हापूर

गुंडांच्या १६ टोळ्यांना मोक्कांतर्गत कारवाईखाली गजाआड डांबून गुन्हेगारी मोडीत काढणारे व त्यातून गुन्हेगारीचे प्रमाण कमी करणारे पोलीस अधीक्षक म्हणून शैलेश बलकवडे यांचे नाव घेतले जाते. नागरिक जेव्हा धाडसाने तक्रारींसाठी पुढे येऊन तक्रारी करू लागले आणि दोन वर्षांत त्यांनी अडीचशेहून अधिकजणांना मोक्कांतर्गत कारवाईखाली गजाआड डांबले, आपोआपच गुन्हेगारी मोडीत निघाली. त्यांनी कोरोना कालावधीत मिशन संवेदना उपक्रमांतर्गत रोज किमान २००० मजूर, गरीब, फिरस्तेपर्यंत भोजन पोहोच केले. त्यांच्या कामगिरीची दखल घेत केंद्र शासनाने २०२०-२१ बेस्ट इंटिलिजन्स या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडून दुर्गम भागातील नागरिकांच्या उन्नतीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले. १० नक्षलवादी कॅम्प उद्ध्वस्त केले, पोलीस चकमकीत २० नक्षलींना यमसदनी धाडले, ४५ नक्षलींनी शस्त्रासहीत आत्मसमर्पण केले. नक्षलविरोधात त्यांनी आक्रमक अभियान राबवले. नक्षलमध्ये गेलेल्या बहुतांश आदिवासी तरुण-तरुणींचे मतपरिवर्तन करून मूळ प्रवाहात आणले. भयमुक्त वातावरण निर्मितीमुळे गडचिरोली पोलीस दलाप्रती विश्वासाची व सौहार्दाची भावना निर्माण होण्यास मदत मिळाली. त्यांच्या यशस्वी कामगिरीमुळे गडचिरोली जिल्ह्याची वाटचाल नक्षलवादमुक्तीकडे होण्यास बळ मिळाले. अहमदनगर, नागपूर शहर येथेही सेवा बजावली आहे. नागपूर शहर, ग्रामीणमध्ये पोलीस अधीक्षकपदाची धुरा सांभाळली. २०२० ते २१ मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील त्यांची नक्षलवाद्यांविरोधी कामगिरी ऐतिहासिक ठरली. नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडत दुर्गम भागातील नागरिकांच्या उन्नतीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले. १० नक्षलवादी कॅम्प उद्ध्वस्त केले, पोलीस चकमकीत २० नक्षलींना यमसदनी धाडले. ४५ नक्षलींनी शस्त्रासहीत आत्मसमर्पण केले.

मत देण्यासाठीइथे क्लिक करा

Web Title: Lokmat Maharashtrian of the Year 2022: Here are nominees for IPS Promising category

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.