LMOTY 2025 : 'कृषी' क्षेत्रात कोणी केलीय उल्लेखनीय कामगिरी; कोण ठरणार महाराष्ट्रीयन ऑफ द इयर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 12:26 IST2025-02-27T12:25:08+5:302025-02-27T12:26:50+5:30
Lokmat Maharashtrian of the year Awards 2025 : मानाचा पुरस्कार सोहळा म्हणजे 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' अवॉर्ड्स.

LMOTY 2025 : 'कृषी' क्षेत्रात कोणी केलीय उल्लेखनीय कामगिरी; कोण ठरणार महाराष्ट्रीयन ऑफ द इयर?
महाराष्ट्रातील सर्वात मोठा अन् मानाचा पुरस्कार सोहळा म्हणजे 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' अवॉर्ड्स. लोकसेवा/समाजसेवा, कृषी, शिक्षण, क्रीडा, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, स्टार्ट अप या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. यावर्षी या पुरस्कारासाठीची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. त्यात, कृषी या कॅटेगरीसाठीची नामांकनं अशी....
अविनाश जोगदंड (आमखेडा -जि. वाशिम)
- अभियांत्रिकी पदवीधर असलेल्या अविनाश जोगदंड यांनी आमखेडा गावात स्वतःच्या १५० एकर शेतीपैकी ४५ एकरावर अन्न, विद्युत, शिक्षण, अर्थ आणि स्वास्थ्य स्वावलंबन या पंचसूत्रीचा अबलंब करत कृषी पर्यटन केंद्र साकारले. आमराई बहरवली.
- त्यांनी बायोगॅसवर आधारित वीज निर्मिती प्रकल्प उभारला. दरमहा २५ ते ३० हजार रुपयांची वीजनिर्मिती.
- पुणे येथे रामेलेक्स प्रा. लिमिटेड कंपनी स्थापन केली. १९८८ पासून वीज क्षेत्रात ते कार्यरत आहेत. या कंपनीतही कृषी विभाग सुरू करून यवतमाळ येथे २०० एकरवर कॉर्पोरेट फामिंग, इको टुरीझम, अपारंपरिक ऊर्जा या क्षेत्रात काम सुरू केले.
- इटलीत २०१४ मध्ये झालेल्या जागतिक कृषी पर्यटन परिषदेत भूमी कृषी पर्यटन केंद्राचा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव.
पुरुषोत्तम वायाळ (वाटूर - जि. जालना)
- परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयातून प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. निवृत्तीला ८ वर्षे बाकी असताना शेतीची आवड असल्याने स्वेच्छानिवृत्ती घेतली. १७ वर्षापासून शेतकऱ्यांसाठी जलसंधारण, जलजागृती, जलयुक्त शिवार, नदी पुनर्जीवित करण्यासाठी काम करत आहेत.
- २०२० मध्ये जलतारा प्रकल्प शोधला. पावसाचे पाणी शेतात जिरवून वाटूर येथील स्वतःची शेती बागायती केली. त्यानंतर जलतारा प्रकल्पाद्वारे परतूर तालुक्यातील २२१ गावे टँकरमुक्त केली. दीड लाख एकर शेती ओलिताखाली आली.
- तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलतारा प्रकल्प रोहयो अंतर्गत राज्यभरात राबविण्याचे आदेश दिले. राज्यातील २०० गावांचा परिसर जलयुक्त झाला आहे.
- जलयुक्त शिवार अभियानात २०१८ मध्ये जालना जिल्हा राज्यात प्रथम आला. त्यावेळी शासनाकडून प्रा. वायाळ यांना महात्मा फुले जलमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
राजेंद्र देशमुख (बार्शी -जि. सोलापूर)
- १२.५७हेक्टर क्षेत्रात शेतात ड्रॅगन फ्रूट. सीताफळ, द्राक्षे, अॅव्होकाडो, अॅपल बोर, पेरू, गोडचिंच, शेवगा खजूर पिकातून ५५ लाख उत्पन्न मिळविले.
- गुजरातमधील खजूर पिकाची माहिती घेऊन महाराष्ट्रात प्रथमच बियांपासून खजूर पिकांची लागवड करून यशस्वी उत्पादन घेतले.
- देशमुख यांना आता विविध कृषी विद्यापीठांत मार्गदर्शनासाठी बोलाविले जाते.
- सोलापूर जिल्हा परिषदेचा सोलापूर कृषिनिष्ठ २००१-०२ पुरस्कार.
सूर्यकांतराव देशमुख (झरी - जि. परभणी)
- सूर्यकांत देशमुख यांनी आपल्या शेतात १९८९ मध्ये विहीर खोदून पुनर्भरणाचा प्रयोग केला. त्यातून जलयुक्त शिवारचे गमक सापडले. १२ हजार एकर शिवार असलेल्या झरी गावातील १० ओढे, सलग २ किलोमीटरचा नाला यावर कोल्हापुरी बंधारा बांधून पाणी अडविले. त्यामुळे गावात भूजल पातळी वाढली.
- १०० ते १५० फूट खोल गेलेले पाणी १० ते २० फुटांवर आले. हा पॅटर्न यशस्वी झाल्यानंतर राज्य शासनाने जलयुक्त शिवार नावाने योजना राज्यभर राबविण्यास सुरुवात केली.
- राज्य शासनाचा १९८८ साली शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, राज्य शासनाचा २०१३ मध्ये कृषिभूषण पुरस्कार.
- गुजरातमधील नवसारी कृषी विद्यापीठाचा २०१४ मध्ये उद्यान रत्न पुरस्कार.
शिवाजीराव डोळे (अजंग-जि. नाशिक)
- निवृत्त जवान आणि शेतकऱ्यांना एकत्र आणून सहकारी तत्त्वावर व्यंकटेश्वरा को-ऑपरेटिव्ह अॅग्रो कंपनीची स्थापना केली. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील अजंग येथे ५२८ एकर क्षेत्रावर जैविक शेतीचा प्रयोग. संस्थेचे एक लाख १२ हजार सभासद.
- विषमुक्त शेतीवर भर. कृषी उत्पादने युरोपमध्ये निर्यात. रोजगार निर्मितीत यश
- शेतकऱ्यांना ना नफा ना तोटा तत्त्वावर खते, बियाणे उपलब्ध करून दिली.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रयोगाचा 'मन की बात' मध्ये गौरवाने उल्लेख केला. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी जानेवारी महिन्यात या प्रकल्पाला भेट दिली.
ज्यांना नामांकने मिळाली आहेत, त्यांना विजयी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://lmoty.lokmat.com/