रामनवमीनिमित्त नागपूरात निघाली भव्य शोभायात्रा

By admin | Published: April 15, 2016 04:38 PM2016-04-15T16:38:58+5:302016-04-15T17:20:30+5:30

पोद्दारेश्‍वर राम मंदिराच्यावतीने काढण्यात आलेल्या शोभायात्रेला यंदा ५0 वर्षे पूर्ण होत आहेत. ही शोभायात्रा केवळ शोभायात्रा राहिली नसून नागपूर - विदर्भाचे सांस्कृतिक वैभव वाढविणारा लोकोत्सव आहे

Magnificent grand rally on the night of Ram Navami | रामनवमीनिमित्त नागपूरात निघाली भव्य शोभायात्रा

रामनवमीनिमित्त नागपूरात निघाली भव्य शोभायात्रा

Next
>५0 व्या वर्षात पदार्पण : पोद्दारेश्‍वर राम मंदिराचं भव्यदिव्य आयोजन
ऑनलाइन लोकमत
नागपूर : पोद्दारेश्‍वर राम मंदिराच्यावतीने काढण्यात येणार्‍या शोभायात्रेला यंदा ५0 वर्षे पूर्ण होत आहेत. ही शोभायात्रा केवळ शोभायात्रा राहिली नसून नागपूर - विदर्भाचे सांस्कृतिक वैभव वाढविणारा लोकोत्सव आहे. एखादा संदेश कितीही वेळा समाजात देण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा यशस्वी परिणाम होताना दिसत नाही पण कृती मात्र समाजाचे परिवर्तन करण्यात यशस्वी होते. रामजन्मोत्सव शोभायात्रा हा केवळ धार्मिक उत्सव राहिला नाही. ही शोभायात्रा केवळ विशिष्ट धर्माच्या लोकांची मक्तेदारीही उरलेली नाही. मानवी संस्कृतीच्या, तिच्या उदात्ततेचा आणि समृद्धतेचा परिचय देणारी ही शोभायात्रा प्रत्येक धर्मावलंबियांची आहे. माणुसकी, न्याय, समता आणि परस्परांमधील बंधुत्व वाढविणारा हा उत्सव सर्व धर्मियांचा झाला आहे. यात सर्वच धर्माचे लोक एकत्रितपणे सहभागी होतात आणि शोभायात्रा यशस्वी करतात. हा उत्सव नागपूरकरांचा झाला आहे. धार्मिक द्वेषाची बीजे अनेकदा काही लोक निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असले तरी शोभायात्रेत मात्र मुस्लिम, हिंदू, ख्रिश्‍चन, बौद्ध बांधवही माणुसकीच्या नात्याने सहभागी होतात. आपली सेवा देतात. यात सहभागी होणार्‍या भाविकांना सरबत, पाणी, प्रसाद आदींचे वितरण करतात. यामागे कुठलाही धर्म नसतो असते ती केवळ मानवी संवेदना. त्यामुळेच पोद्दारेश्‍वर राम मंदिरातून निघणारी ही शोभायात्रा सर्व वस्त्यांतून यशस्वीपणे मार्गक्रमण करते. मोमिनपुरा येथे मुस्लिम बांधव शोभायात्रेचे स्वागत करतात. शोभायात्रेचा मार्ग प्रशस्त व्हावा म्हणून त्यांचा प्रयत्न असतो. गेल्या ५0 वर्षात सातत्याने ही शोभायात्रा निघत असताना कधीही कुठलाही वाद झालेला नाही. यातूनच धार्मिक बंधूभावाची निर्मिती नागपुरात झालेली आहे.
भगवान राम हे र्मयादा पुरुषोत्तम आहे. त्यांना केवळ एका धर्मात बांधण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा मानवी बंधूभावाचे प्रतीक म्हणून त्यांची पूजा करण्यात येते. भगवान राम हे असुरांचा विनाश आणि सज्जनांचे रक्षण करणारे पुरुषोत्तम आहेत. आसुरी वृत्ती प्रत्येकच धर्मात असते पण अशा वृत्तींचा नाश करून मानवी संवेदनांना विकसित करण्याचा, माणुसकी जपण्याचा संदेश राम चरित्रातून मिळतो. त्यामुळे प्रत्येक धर्मातील संवेदनशील नागरिक सारे धार्मिक भेद विसरून यात सहभागी होतात आणि बंधूभाव निर्माण करतात. 
गेली ५0 वर्षे हे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. रामजन्मोत्सव पौराणिक काळापासून साजरा केला जातो पण हा उत्सव मठ, मंदिर आणि चार भिंतीआडच होत होता. सत्य आणि न्यायाचे प्रतीक म्हणून भगवान रामाची पूजा केली जाते. 
ही मूल्ये समाजात रुजावीत, कायम राहावीत आणि त्याची प्रतिष्ठापना व्हावी, मानवी जगण्याचा उद्देश नागरिकांना कळावा आणि मानवी जगणे अधिक समृद्ध व्हावे या उद्देशाने रामचरित्राचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोविण्यासाठी ५0 वर्षापूर्वी या शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला.
त्यावेळी अतिशय लहान प्रमाणात ही शोभायात्रा काढण्यात आली. रामचरित्राच्या वाचनातून त्यांचे चरित्र समजून घेण्याचा प्रयत्न सातत्याने होत आला आहे. पण सामान्य नागरिकांनी एखादी घटना प्रत्यक्ष पाहिली तर त्याचा त्यांच्या मनावर परिणाम होतो. त्यामुळे रामचरित्रातील घटना प्रत्यक्ष चित्ररथाच्या स्वरूपात सादर करण्याचा विचार समोर आला आणि त्यानंतर काही घटनांचे दृश्य चित्ररथ साकारण्यात आले. 
त्यावेळी या शोभायात्रेचे स्वरूप इतके मोठे होईल याची कल्पनाही नव्हती. पण सातत्यपूर्णतेने आज ही शोभायात्रा या शहराचा उत्सव झाला आहे. चित्ररथातून केवळ रामचरित्राचेच नव्हे तर समाजाला संदेश देणारे आणि समाज निकोप करणारे अनेक चित्ररथ आज साकारण्यात येतात. गणतंत्र परेडनंतर देशातील दुसरा मोठा उत्सव म्हणून या शोभायात्रेला आता मान्यता मिळालेली आहे. शोभायात्रेच्या सुवर्ण जयंती निमित्त पोद्दारेश्‍वर राम मंदिराच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने कस्तूरचंद पार्कवर हनुमान चालिसाच्या सामूहिक पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 
याशिवाय अनेक स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन मंदिर विश्‍वस्त मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. याशिवाय नागपुरातील अनेक व्यापारी प्रतिष्ठान, संस्था, संघटना यांचा महत्त्वपूर्ण सहभाग या शोभायात्रेत आहे.
 
श्रीराम शोभायात्रेने दुमदुमले नागपूर
 
प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव नागपुरात जल्लोषात साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने पोद्दारेश्‍वर राम मंदिराच्यावतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते. या शोभायात्रेचे यंदा ५0 वे वर्ष असून, सातत्याने भव्य प्रमाणात आयोजित करण्यात येणार्‍या या शोभायात्रेचे स्वरूप दिवसेंदिवस अधिकच व्यापक होत चालले आहे. शोभायात्रा म्हणजे नागपूरची ओळख झाली आहे. भव्यता, सर्वधर्मसमभाव आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे शोभायात्रा हा नागपूरचा उत्सव झाला आहे.
 
दुपारी ४ वाजता शोभायात्रेला प्रारंभ झाला असून पोद्दारेश्‍वर राम मंदिरापासून राम जन्मोत्सव शोभायात्रा समितीच्यावतीने काढण्यात येणारी ही शोभायात्रा सुवर्णजयंतीनिमित्त यंदा विशेष आहे. यात यंदा ६0 चित्ररथ असून, रामायणातील अनेक प्रसंग यात साकारण्यात आले आहेत. एकूण १४ पथकांनी लोकनृत्याचे सादरीकरण केले, तर ३५0 संस्थांच्या १४ हजार कार्यकर्त्यांचा ताफा शोभायात्रेची व्यवस्था पाहत आहे. आज पहाटे ५ वाजता मंगलारती, अभ्यंगस्नान, कीर्तन आणि षोडशोपचार पूजन करण्यात आले. त्यानंतर जवळपास १२ कि.मी. ही शोभायात्रा नागपुरात फिरविण्यात आली. 
ही शोभायात्रा शहरातील सर्वधर्मसमभावाचे प्रतीक आहे. शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी राम जन्मोत्सव शोभायात्रेचे संयोजक रामकृष्ण पोद्दार, श्रीपाद रिसालदार, अध्यक्ष गोरक्षण सभा, भालचंद्र हरदास, सी. विजयराव, पुनित पोद्दार, सुहास बंडेवार, निरंजन रिसालदार, निरंजन देशकर, अदिती सुर्जीकर, आल्हाद सुर्जीकर, अनुराग देशपांडे, मंगेश पातूरकर, विष्णुपंत मुरले, देवेंद्र दहासहस्र आदींनी परिश्रम घेतले.
 
पश्चिम नागपुरात ४३ वर्षांची परंपरा
 
पश्चिम नागपूर नागरिक संघाच्यावतीने दरवर्षी रामनगर येथील राम मंदिरातून भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात येते. यंदा या शोभायात्रेचेही ४३ वे वर्ष असून, या शोभायात्रेचे स्वरूपही आता भव्य झाले आहे. प्रारंभीच्या काळात केवळ प्रभू रामचंद्रांची पालखी भाविकांच्या दर्शनासाठी काढण्यात येत होती. त्यावेळी भाविक या पालखीचे स्वागत आणि पूजन करायचे. त्यानंतर याचे स्वरूप बदलत गेले आणि सध्या पश्‍चिम नागपुरातील ही मोठी शोभायात्रा झाली आहे. 
पालखीच्या स्वरूपात ही शोभायात्रा चार वर्षे काढण्यात आली, त्यानंतर याचे स्वरूप बदलले. बैलगाडीला सजावटकार बांगड्यांनी आणि काचेच्या तुकड्यांनी सजवायचे. या बैलगाडीत नंतर पालखी नेण्यात यायची. २00४ सालापासून मात्र या शोभायात्रेचे स्वरूप बदलले आणि भव्य झाले. २00९ साली तर शोभायात्रेत १५३ पथके, घोडे, बँड पथक, लेझीम पथक आदींचा सहभाग होता, तर १0१ ट्रकवर विविध चित्ररथ साकारण्यात आले होते. 
संघाच्या नव्या कार्यकारिणीने यानंतर शोभायात्रेला व्यापक स्वरूप देतानाच त्याचा मार्गही अधिक लांब केला. आता ही शोभायात्रा पश्‍चिम नागपुरातील सर्व भागातून फिरविण्यात येते आणि विविध संस्थांच्यावतीने शोभायात्रेचे स्वागत करण्यात येते. यंदा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्य रथाचे पूजन करण्यात येणार असून याप्रसंगी पालकमंत्री बावनकुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मंत्री विलास मुत्तेमवार, मुळक, आ. अनिल सोले, आनंद परचुरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रामभक्त रामाची पालखी ७ कि.मी. अनवाणी पायाने खांद्यावर वाहतात. ही शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी पश्‍चिम नागपूर नागरिक संघाचे अध्यक्ष जयंत आपटे, सचिव राजू काळेले, कोषाध्यक्ष प्रवीण महाजन आणि विश्‍वस्त मंडळ परिश्रम घेत आहेत. 
 
भोसला राजघराण्याची ऐतिहासिक शोभायात्रा
 
रामनवमीच्या मुहूर्तावर नागपूरकर भोसले राजघराण्याची ऐतिहासिक शोभायात्रा काढण्यात येते. या शोभायात्रेला ३00 वर्षे पूर्ण झाली आहेत. १७२५ साली श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले प्रथम यांना प्रभु रामचंद्राचे दर्शन झाले. भगवान रामाच्या मूर्ती शूर नदीत असल्याचा दृष्टांत त्यांना मिळाला. 
या मूर्तींची स्थापना रामटेकच्या गडमंदिरात केल्यास आपले राज्य स्थापित घ् पोद्दारेश्‍वर मंदिराच्या वतीने आयोजित भव्यदिव्य शोभायात्रेसाठी देवदेवतांच्या मूर्तीने रथ सजविण्यात आले आहेत.

Web Title: Magnificent grand rally on the night of Ram Navami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.