नाराजीच्या चर्चेतच एकनाथ शिंदेंनी दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 18:08 IST2025-01-21T18:03:47+5:302025-01-21T18:08:21+5:30
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी जाहीर झालेली निवडणूक आता महत्त्वाच्या वळणावर आली आहे

नाराजीच्या चर्चेतच एकनाथ शिंदेंनी दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत घेतला मोठा निर्णय
मुंबई - महाराष्ट्रात सध्या एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या बातम्या चर्चेत आहेत. रायगड, नाशिक पालकमंत्रिपदावरून शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या २ जिल्ह्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. अशातच शिवसेनेचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना पत्र लिहून त्यांच्या पक्षाचं भाजपाला समर्थन असल्याचं जाहीर केले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एकनाथ शिंदे यांनी पत्रात लिहिलंय की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारधारेवर आमचा शिवसेना पक्ष पुढे जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीएचा घटक पक्ष आणि सदस्य असल्याचा अभिमान आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष म्हणून आम्ही येत्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. मी शिवसेनेच्या राज्य पदाधिकारी यांना भाजपा प्रदेश कार्यालयासोबत संवाद साधून निवडणूक प्रचारात सक्रीय सहभाग घेण्याचे आदेश दिलेत असं त्यांनी सांगितले आहे.
Maharashtra Deputy CM and Shiv Sena chief Eknath Shinde, announces his party's support for all Delhi BJP candidates. pic.twitter.com/3qrtQfsJNf
— ANI (@ANI) January 21, 2025
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी जाहीर झालेली निवडणूक आता महत्त्वाच्या वळणावर आली आहे. सत्ताधारी आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी २१ दलबदलूंना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या भाजपने आप, काँग्रेस आणि बसपामधून आलेल्या ९ दलबदलूंना उमेदवारी दिली आहे. मागील निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसच्या तिकीटवर लढणाऱ्या आठ उमेदवारांचा पराभव झाला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढणार
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत एकला चलोची भूमिका घेत शुक्रवारी ३० उमेदवारांची घोषणा केली. भाजपाने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, जदयू, आणि लोजपा या रालोआतील घटक पक्षांना एकएक जागा देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, शिवसेनेने माघार घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीने स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. दिल्ली विधानसभा निवडणुकीत एनडीएचा घटक पक्ष असलेल्या रामदास आठवले यांचा आरपीआय पक्षही स्वबळावर निवडणूक लढवत आहे.