महाराष्ट्राला पाच वर्षांत मिळाले नाही एकही नवीन केंद्रीय विद्यालय, अनेक राज्यांत ६० विद्यालये झाली सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 16:16 IST2025-04-09T16:07:39+5:302025-04-09T16:16:43+5:30
Kendriya Vidyalaya latest News: स्थलांतरित होणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने ही विद्यालये सुरू केली जातात.

महाराष्ट्राला पाच वर्षांत मिळाले नाही एकही नवीन केंद्रीय विद्यालय, अनेक राज्यांत ६० विद्यालये झाली सुरू
-हरीश गुप्ता, नवी दिल्ली
केंद्रीय विद्यालय संघटनेने (केव्हीएस) नागरी, संरक्षण, उच्चशिक्षण संस्था, प्रकल्प क्षेत्रांतर्गत तब्बल ६० नवीन केंद्रीय विद्यालये (केव्हीएस) सुरू केली. देशातील ६० नवीन विद्यालयांपैकी महाराष्ट्रात एकही नाही, तर उत्तर प्रदेशात ८, पश्चिम बंगाल, पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेशात प्रत्येकी एक नवीन विद्यालय उघडले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गेल्या पाच वर्षात आंध्र प्रदेशात ३, ओडिशात ७ आणि राजस्थानमध्ये २ महाविद्यालये उघडली. पाच वर्षांचा कालावधी २०१९-२० ते चालू वर्ष २०२४-२५ पर्यंतचा आहे. सरकारने म्हटले आहे की, नवीन केंद्रीय विद्यालये उघडणे ही एक नियमित प्रक्रिया आहे.
वाचा >चक्क शिपायाने तपासले विद्यापीठाच्या परीक्षेचे पेपर, पाच हजार रुपयेही कमावले, त्यानंतर...
स्थलांतरित होणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने ही विद्यालये सुरू केली जातात. संरक्षण आणि निमलष्करी कर्मचारी, केंद्रीय स्वायत्त संस्था, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयू) आणि केंद्रीय उच्चशिक्षण संस्था (आयएचएल) यांचा यात समावेश आहे.
देशभरात १२५३ विद्यालये
नवीन विद्यालये उघडण्याचे प्रस्ताव केंद्र सरकार, राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश यांची मंत्रालये किंवा विभागांद्वारे दिले जाऊ शकतात. नवीन विद्यालये उघडण्यासाठी केवळ प्रस्ताव प्राप्त करणे ही पूर्वअट नाही.
नवीन विद्यालय उघडण्यासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावांची विविध स्तरांवर तपासणी, प्रक्रिया केली जाते. केंद्र सरकारची आवश्यक मान्यता मिळाल्यानंतरच नवीन विद्यालयांच्या स्थापनेसाठी आणि बांधकामासाठी निधीचे वाटप केले जाते. सध्या देशभरात १२५३ विद्यालये कार्यरत आहेत.