महाराष्ट्राच्या वारकरी शिक्षण संस्थेने गाठली शंभरी!
By Admin | Published: March 19, 2017 02:16 AM2017-03-19T02:16:19+5:302017-03-19T02:16:19+5:30
शताब्दी सोहळा: आळंदीकडे भाविकांची ओढ
ब्रह्मनंद जाधव
बुलडाणा, दि. १८- श्रीक्षेत्र आळंदी येथे जोग महाराज यांच्याद्वारे संस्थापित महाराष्ट्र राज्य वारकरी शिक्षण संस्थेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त वारकरी सांप्रदायाच्यावतीने २२ ते २९ मार्च रोजी होणार्या शताब्दी सोहळ्यासाठी आळंदीला राज्याच्या कानाकोपर्यातून भाविकांचा ओढा वाढणार असून, समाजप्रबोधनाचे कार्य करणारे राज्यभरातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक मंडळी या सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याची माहिती मूळचे बुलडाणा जिल्हय़ातील असणारे महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज जंवजाळ यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली.
महाराष्ट्रातील संतांचे विचार समाजात रुजविण्यासाठी तसेच कीर्तन, प्रवचन, गायक व वादक घडविण्यासाठी संत ज्ञानेश्वर माउलींच्या वास्तव्याने पावन झालेल्या श्रीक्षेत्र आळंदी येथे जोग महाराज यांनी महाराष्ट्र राज्य वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. समाजाकडून संचालित, सक्रिय अनौपचारिक संत साहित्याची शिकवण देणारी संस्था म्हणजे वारकरी शिक्षण संस्था. महाराष्ट्र राज्य वारकरी शिक्षण संस्थेला १00 वर्ष पूर्ण झाले आहेत. यादरम्यान या वारकरी शिक्षण संस्थेने महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाला कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक व वारकरी मंडळी तयार करून दिले. महाराष्ट्र राज्य वारकरी शिक्षण संस्थेचा शताब्दी महोत्सव श्रीक्षेत्र आळंदी येथे २२ ते २९ मार्चला आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील पहिली वारकरी शिक्षण संस्था
विष्णुबुवा जोग महाराज यांनी मारुतीबुवा गुरव आणि मारुतीबुवा ठोंबरे यांच्या आग्रहावरून चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा शके १८३९ म्हणजेच २४ मार्च १९१७ रोजी आळंदी देवाची येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराजवळ या वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. इ.स. १९१७ ते १९२0 या काळात विष्णुबुवा जोग हे या संस्थेचे अध्यक्ष होते. ही संस्था महाराष्ट्रातील पहिली वारकरी संस्था आहे. या संस्थेने आतापर्यंत हजारो कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक व वारकरी मंडळी घडविली. तसेच महाराष्ट्रातील खेडोपाडी शुद्ध वारकरी परंपरेचे भजन सुरू केले.
महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात कीर्तनकार, प्रवचनकार, गायक , वादक व वारकरी मंडळी घडविण्याचे कार्य महाराष्ट्र राज्य वारकरी शिक्षण संस्थेकडून गेल्या १00 वर्षांंपासून होत आहे. त्यानिमित्त आयोजित शताब्दी महोत्सवाला श्रीक्षेत्र आळंदी येथे वारकरी तसेच वारकरी सांप्रदायाप्रती जिव्हाळा असलेल्या सर्व भाविकांनी उपस्थित रहावे.
- प्रकाश महाराज जवंजाळ,
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ.