मनोज जरांगेंनी केलेले ‘ते’ विधान अपमानजनक; मंगेश साबळेंनी व्यक्त केलं दु:ख
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 04:27 PM2023-10-27T16:27:51+5:302023-10-27T16:28:32+5:30
समाजासाठी मी वेगळे काय करतोय, कुणी आत्महत्या करतंय, पुलावर लटकतंय, मी वेगळे काही न करता मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करतोय असं मंगेश साबळेंनी म्हटलं.
छत्रपती संभाजीनगर - मनोज जरांगे पाटील यांची रेकॉर्डब्रेक सभेसाठी मी १०० गाड्या घेऊन तालुक्यातून माणसं नेली होती. स्टेजवर मी होतो, तरीही जरांगे पाटील बोलतात, मी याला ओळखत नाही. हा मराठ्याचा आहे का तपासावे लागेल हे अपमानजनक वाटले. मनाला लागले अशी खंत मराठा आंदोलक मंगेश साबळे यांनी व्यक्त केली. साबळे यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड केली होती.
मंगेश साबळे म्हणाले की, समाजासाठी मी वेगळे काय करतोय, कुणी आत्महत्या करतंय, पुलावर लटकतंय, मी वेगळे काही न करता मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करतोय. मला फासावर लटकवलं जाऊ शकते. मी यासाठी तयार आहे. माझ्याबद्दल असं विधान मनोज जरांगे करतील वाटलं नव्हते. मराठा आरक्षण मिळावे यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू. प्रत्येकजण आपापल्या मार्गाने आंदोलन करतोय. मी साधारण कार्यकर्ता आहे. स्टंटबाज नाही. प्राणांतिक उपोषणाला बसून आंदोलन करणार आहेत. आम्ही आत्महत्या करणार नाही. लढून मरा असं आवाहन मंगेश साबळे यांनी केले.
तसेच मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने मन दुखावले गेले. घरावर तुळसीपत्र ठेऊन मी समाजासाठी काम करतोय. माझे आई-बाप मराठा आहे. १४ तारखेला सभा झाली त्यानंतर २ दिवसांत जीआर निघाला असता. तेव्हा जरांगेंनी ४० दिवसांनंतर आरक्षण मिळाले नाही तर हा कोट्यवधींचा मोर्चा मुंबई मंत्रालयावर काढू असं का म्हटलं नाही. या एकाही आमदार-खासदाराला रस्त्यावर फिरकू देऊ नका. १ कोटी समाज सभेला असताना मनोज जरांगे पाटलांकडून आशा होती, मराठा आरक्षण मिळेल. त्यावेळी जरांगे पाटलांनी सरकारची झोप का उडवली नाही. जे बोलायला पाहिजे होते ते बोलले नाहीत. आता पुन्हा उपोषणाला बसलेत. मनोज जरांगेंसाठी आम्ही सभा घेतल्यात, त्यांना मी देव मानतो. परंतु आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही असंही मंगेश साबळे यांनी म्हटलं.
दरम्यान यानंतर गुणरत्न सदावर्ते मराठा समाजाच्या नादी लागला, समाजाविषयी काही अपशब्द काढले तर गाठ आमच्याशी आहे. सदावर्ते जे प्रक्षोभक वक्तव्ये करतो त्याच्यामुळे मुले आत्महत्या करतोय. समाजाचे पोरं आत्महत्या करतायेत म्हणून आम्ही हे पाऊल उचलतोय. कळकळीची विनंती तरुणांनो आत्महत्या करू नका. लढून मरा असंही मंगेश साबळेंनी सांगितले.