"कितीही जळाला तरी..."; फुलं उधळण्यावरून टीका करणाऱ्यांचा जरांगेंनी घेतला समाचार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 12:10 PM2023-11-29T12:10:51+5:302023-11-29T12:11:46+5:30

आज समाज ताकदीनं एकत्र येतोय, दुसरं काम सोडून मराठा समाज एकजूट दाखवतोय. त्याचा आनंद वाटतो असं जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Patil targeted by Praful Patel, Chhagan Bhujbal over Maratha reservation | "कितीही जळाला तरी..."; फुलं उधळण्यावरून टीका करणाऱ्यांचा जरांगेंनी घेतला समाचार

"कितीही जळाला तरी..."; फुलं उधळण्यावरून टीका करणाऱ्यांचा जरांगेंनी घेतला समाचार

छत्रपती संभाजीनगर - गेली ७० वर्ष गोरगरिब मराठ्यांच्या लेकरांनी आरक्षणाची वाट पाहिली. आता कुठेतरी राज्यात ३२ लाख लोकांना आरक्षण मिळाले आहे. सातत्याने कुणबी नोंदी आढळतायेत. त्यामुळे मराठा समाजात आनंद आहे. मी समाजाला मायबाप मानलंय, त्यामुळे तेदेखील लेकरांप्रमाणे माझे स्वागत करतायेत. ज्याला वाटतंय त्याला आम्ही नाही म्हटलं तरी आमच्यावर फुले उधळतोय. हे आमच्यातले प्रेम आहे. ज्यांच्यावर फुले उधळली जात नाहीत तो कितीही जळाला तरी आमचा समाज एकमेकांवर माया लावतो.आम्ही एकमेकांच्या लेकरांसाठी लढतोय म्हणून समाज जीव लावतो. तुम्ही राजकीय फायद्यासाठी लढताय तुमच्यावर कोण फुले उधळतील असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी टीकाकारांना लगावला आहे. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आज समाज ताकदीनं एकत्र येतोय, दुसरं काम सोडून मराठा समाज एकजूट दाखवतोय. त्याचा आनंद वाटतो. दौऱ्यावेळी मी वेळेत पोहचू शकत नाही, ज्या रस्त्याने जाणार त्या मार्गावरील गावातील लोकं स्वागतासाठी उभं राहतात. त्यांना भेटणे आवश्यक आहे. मराठा समाज एकजूट होणार नाही असं बोलले जात होते.परंतु आज समाज एकत्र आला. गोरगरिबांच्या लेकरांसाठी लढतोय त्यामुळे समाज एकत्र येतो. हॉस्पिटलमधून आज डिस्चार्ज मिळाला असून अंतरवाली सराटीला जाईन. उपचारानंतर तब्येत चांगली झालीय. त्यामुळे १ डिसेंबरपासून महाराष्ट्र दौरा सुरू होईल. १२ डिसेंबरपर्यंत हा दौरा चालेल. जालना इथं मोठा कार्यक्रम १ तारखेला होणार आहे. मराठा समाज प्रचंड संख्येने एकजूट झालाय. त्यामुळे गर्दी, गाठीभेटी यामुळे रात्रंदिवस जागल्याने त्रास होतोय, पण डॉक्टरांनी आता तपासले आहे. त्यामुळे पुन्हा समाजाच्या दर्शनसाठी चाललोय असं त्यांनी सांगितले. 

तुमच्या लोकांना थांबवा, मग सल्ला ऐकतो

मराठा समाजाला सरकारने गांभीर्याने घेतले आहे. आम्ही थंड होत नाही. जे आमच्या हक्काचे आहे ते आम्हाला द्या. त्यामुळे टिकवणारे आरक्षण देण्याची कसरत तुम्हाला करावी लागणार नाही. त्याशिवाय तुमचे जे लोक आहेत त्यांना सबुरीनं घ्यायला सांगा. त्यांना थांबवा. ते बोलले नाही तर आम्ही बोलत नाही. तुमच्या लोकांना थांबवा, तुमचा सल्ला ऐकतो असं प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी प्रफुल पटेल यांना दिले.

भुजबळांचे नाव न घेता टीका

पदाला चिटकून बसणारे हे लोक आहेत. गरळ ओकणारे आहेत. त्यामुळे राजीनामा देण्यासाठी मोठे मन लागते.राजकारण्यांना सल्ले कोण देणार, त्यांचे ते बघतील. कायद्याच्या पद्यावर बसून जातीय तेढ निर्माण करायचे, त्याचा गैरवापर करायचा यांना फार महत्व देण्याची गरज नाही. राजीनाम दिला तरी आम्हाला त्याचा फायदा काय? भावना नीट नसल्याने माणसाला सल्ले का द्यायचे आणि आपण इतके मोठे नाही सल्ला द्यायला.जुनाट लोकांना आपण सल्ला देत नाही अशा शब्दात जरांगेंनी नाव न घेता भुजबळांवर पुन्हा निशाणा साधला. 

शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा

शेतकरी आणि त्याची जात बघणार नाही. परंतु आज अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालंय, त्यांना तातडीने सरकारने मदत द्यायला हवी. शेतकऱ्यांना वाचवणारे कुणी नाही.वर्षभर कष्ट करून हातातोंडाला आलेला घास जातो. त्याच्या डोळ्यातील अश्रू पुसायला कुणी नसते. त्यामुळे सरकारने तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. 

Web Title: Manoj Jarange Patil targeted by Praful Patel, Chhagan Bhujbal over Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.