"मराठ्यांनी आरक्षण मागायचं नाही, तर...! पण मराठ्यांना आपण कोण आहोत? हे कळत नाहीये, हे दुर्दैव" - भिडे गुरुजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 14:30 IST2025-03-04T14:28:43+5:302025-03-04T14:30:14+5:30
"सर्वच राज्यकर्त्यांनी सर्वप्रथम शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र, संभाजी महाराजांचं जीवन चरित्र, जिजा मातेचं जीवन चरित्र, शहाजी राज्यांचं जीवन चरित्र आणि मराठ्यांचा इतिहास बारकाईने वाचावा. या देशाला राष्ट्र म्हणून टिकवायचे असेल, तर सर्वप्रथम मराठ्यांचा इतिहास उभ्या देशात, दहावीपर्यंत, कुठल्याही भाषेतले लोक असोत, सक्तीचा करायला हवा."

"मराठ्यांनी आरक्षण मागायचं नाही, तर...! पण मराठ्यांना आपण कोण आहोत? हे कळत नाहीये, हे दुर्दैव" - भिडे गुरुजी
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे अर्थात भिडे गुरुजी यानी महाराष्ट्रातील मराठा समाज आणि मराठा आरक्षण या विषयावर भाष्य केले आहे. "मराठेसुद्धा स्वतःला संकुचित करून घेत आहेत. मराठ्यांनी आरक्षण मागायचं नाही. मराठ्यांनी देश चालवायचाय. सबंध देशाचा संसार चालवण्याची जबाबदारी असणारा समाज जर कुठला असेल, तर तो महाराष्ट्रात मराठा समाज आहे," असे भिडे गुरुजी यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते.
यावेळी, "महाराष्ट्र मेला, तरी राष्ट्र मेले। मराठ्यांविना, राष्ट्र गाडा न चाले।।" असे म्हणत संभाजी भिडे म्हणाले, "अरे, मराठेसुद्धा स्वतःला संकुचित करून घेत आहेत. आम्हाला आरक्षण हवे. मराठ्यांनी आरक्षण मागायचं नाही. मराठ्यांनी देश चालवायचाय. सबंध देशाचा संसार चालवण्याची जबाबदारी असणारा समाज जर कुठला असेल, तर तो महाराष्ट्रात मराठा समाज आहे. पण मराठ्यांना आपण कोण आहोत, हे कळत नाहीये, हे दुर्दैव आहे. मराठ्यांना आपण कोण आहोत? हे जर समजले, तर देशाचे कोट कल्याण व्हायला दोन दिवस लागणार नहीत."
यावेळी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात प्रश्न विचारला असता गुरुजी म्हणाले, ते प्रकरण आपण बाजूला ठेऊ. तो काही आपला विषय नाही.
मराठ्यांचा इतिहास उभ्या देशात, दहावीपर्यंत सक्तीचा करायला हवा -
पुढे बोलताना भिडे गुरुजी म्हणाले, "सर्वच राज्यकर्त्यांनी सर्वप्रथम शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र, संभाजी महाराजांचं जीवन चरित्र, जिजा मातेचं जीवन चरित्र, शहाजी राज्यांचं जीवन चरित्र आणि मराठ्यांचा इतिहास बारकाईने वाचावा. या देशाला राष्ट्र म्हणून टिकवायचे असेल, तर सर्वप्रथम मराठ्यांचा इतिहास उभ्या देशात, दहावीपर्यंत, कुठल्याही भाषेतले लोक असोत, सक्तीचा करायला हवा. संस्कृत शिकवायल हवी देश टिकवायचा असेल तर. या अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत. पण हे करण्यची इच्छा उत्पन्न होईल, असे महाराष्ट्राचे शासनही असायला हवे. शिवाजी-संभाजी-शहाजी आणि जीजामाता या व्यक्तीमत्वांमुळेच आज जो काही देश दिसतोय तो दिसतोय. महाराष्ट्र नाही, संपूर्ण देश."