“इथे सरकारचं चुकलं हे निश्चित”; जालना घटनेचा राज ठाकरेंनी केला तीव्र निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 01:21 PM2023-09-02T13:21:55+5:302023-09-02T13:23:30+5:30

Maratha Reservation Agitation: मराठा समाजाला आरक्षण देणं खरंच शक्य आहे का? अशी प्रश्न विचारत राज ठाकरे यांनी अतिशय शब्दांत भूमिका मांडली.

mns chief raj thackeray reaction over jalna incident and maratha reservation and criticised state govt | “इथे सरकारचं चुकलं हे निश्चित”; जालना घटनेचा राज ठाकरेंनी केला तीव्र निषेध

“इथे सरकारचं चुकलं हे निश्चित”; जालना घटनेचा राज ठाकरेंनी केला तीव्र निषेध

googlenewsNext

Maratha Reservation Agitation: मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या आंदोलकांना बळजबरीनं रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल्यानंतर वाद होऊन पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. त्यामुळं भडकलेल्या आंदोलकांनी दगडफेक केली. त्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेत पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह आंदोलक जखमी झाले. या घटनेनंतर जमावानं चार बस पेटवल्या. या घटनेचा राज्यभरातून निषेध व्यक्त केला जात असून, ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत राज्य सरकारवर टीका केली. 

राज ठाकरे यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट करत, या घटनेवर सविस्तर भाष्य केलं आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार पण झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी ह्याचा निषेध नोंदवतो, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

इथे सरकारचं चुकलं हे निश्चित

ह्या घटनेवर मी कालपासून लक्ष ठेवून आहे, आणि ह्या घटनेवर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहत होतो. मुळात मराठा समाजाने आरक्षणासाठी जी आंदोलनं केली, त्या आंदोलनांचा इतिहास बघितला, तर मी माझ्या अनेक सभांमध्ये म्हणलं तसं की, ती आंदोलनं, मोर्चे ह्याचा आदर्श जगाने घ्यावा इतकी शांततेत आणि समंजसपणे झाली होती. अशी पार्श्वभूमी असताना जालन्यात काल काय असं घडणार होतं की प्रशासनाने असं टोकाचं पाऊल उचललं? पोलिसांच्या अहवालात माहिती येईलच, पण मी खात्रीने सांगतो की, पूर्व-इतिहास बघता आंदोलकांनी कोणतंच चुकीचं पाऊल नसतं टाकलं. त्यामुळे इथे सरकारचं चुकलं हे निश्चित, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. 

मराठा समाजाला आरक्षण देणं खरंच शक्य आहे का? 

राहता राहिला प्रश्न ह्या संवेदनशील विषयाचा, तर ह्याला आत्ताचे आणि आधीचे सगळेच जबाबदार आहेत. मराठा समाजाला आरक्षण देणं खरंच शक्य आहे का? ते न्यायालयात टिकेल का? बरं आरक्षण देऊन मराठा समाजातील मुलामुलींना देण्यासाठी किती सरकारी नोकऱ्या आहेत? त्या जोडीला ह्या समाजातील तरुण तरुणींना स्पर्धात्मक जगात घौडदौड करण्यासाठी कसं तयार करता येईल ह्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होत आहेत का? (इथे घोषणा केलेल्या योजनांबद्दल बोलायचं नाहीये तर प्रयत्नांबद्दल बोलायला हवं). मुळात हा प्रश्न फक्त मराठा समाजाच्या आरक्षणापुरता नाहीये, तर एकूणच मराठी तरुण-तरुणींच्या रोजगाराशी संबंधित आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

आता दोषारोप नकोत तर कृती अपेक्षित आहे

साध्या तलाठी भरतीसाठी जर लाखभर अर्ज येत असतील आणि भरती अवघ्या शेकड्यात होणार असेल, तर मराठी मुलांच्या मनात काय धुमसतंय ह्याचा विचार करावा लागेल. शिकलीसवरलेली मुलं नोकरीच्या शोधात वणवण फिरत आहेत, हे चित्रं चांगलं नाही. त्यामुळे उगाच भूलथापा देणं किंवा एकमेकांवर आरोप करून स्वतःची मान काढून घेणं ह्या दोन्ही गोष्टी आधीच्यांनी आणि आत्ताच्यानी करू नयेत. काल जे घडलं त्यात प्रशासनाची चूकच आहे पण ते ज्या कारणांनी घडलं, त्याला गेल्या २० वर्षांत महाराष्ट्राचं विस्कटलेलं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण जबाबदार आहे. ह्यावर दीर्घकालीन उपायांची गरज आहे. चकवा देऊन सरकार बनवणं आणि ते पाडून दुसरं सरकार आणणं, ह्यातून जे काही शौर्य दाखवायची खुमखुमी होती,  ती खुमखुमी आता मिटली असेल असं आम्ही मानतो. त्यामुळे आता दोषारोप नकोत तर कृती अपेक्षित आहे, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. 

दरम्यान, माझी तमाम मराठा समाजातील बांधवांना विनंती आहे की ह्या घटनेचे पडसाद उमटू देऊ नका. तुम्ही आंदोलनं आणि मोर्च्यांचा आदर्श घालून दिला आहेत,  तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. तुमचा राग समजू शकतो पण तुम्ही कोणाच्या राजकारणाला आणि भूलथापांना बळी पडणार नाही ह्याबद्दल मला आणि माझ्या पक्षाला खात्री आहे. मराठी माणसाच्या आक्रोशातून उभ्या राहणाऱ्या कुठल्याही आंदोलनाच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजपर्यंत उभी राहिली आहे आणि ह्यापुढे पण राहील, अशी ग्वाही राज ठाकरे यांनी एक्सवर (ट्विटर) दिली. 
 

Web Title: mns chief raj thackeray reaction over jalna incident and maratha reservation and criticised state govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.