मुंबई- महाराष्ट्र आधीपासूनच महान, परप्रांतीयांची गरज नाही, मनसेचं मुख्यमंत्र्यांना उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 11:57 IST2017-11-30T10:43:57+5:302017-11-30T11:57:56+5:30
उत्तर भारतीय आणि इतर राज्यातून येणाऱ्या लोकांनी महाराष्ट्राच्या वैभवात भर घातली आहे. परप्रांतातून आलेल्या लोकांनी आपलं योगदान देऊन मुंबईला महान बनवलं, मुंबईचा गौरव वाढवला असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.

मुंबई- महाराष्ट्र आधीपासूनच महान, परप्रांतीयांची गरज नाही, मनसेचं मुख्यमंत्र्यांना उत्तर
मुंबई- उत्तर भारतीय आणि इतर राज्यातून येणाऱ्या लोकांनी महाराष्ट्राच्या वैभवात भर घातली आहे. परप्रांतातून आलेल्या लोकांनी आपलं योगदान देऊन मुंबईला महान बनवलं, मुंबईचा गौरव वाढवला असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जोरदार टीका केली आहे. 'मुंबई आणि महाराष्ट्र यापूर्वीही महान होता, आहे आणि राहील. महाराष्ट्राला महान बनविण्यासाठी आश्रित म्हणून येणाऱ्या परप्रांतीयांची गरज नाही,' असं उत्तर मनसेने दिलं आहे. मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे.
'महाराष्ट्र परप्रांतीयांमुळं महान होतो आहे, मुख्यमंत्र्यांचं हे म्हणणं हास्यास्पद आहे. परप्रांतातील लोक महाराष्ट्रात पोट भरण्यासाठी येतात. त्यांच्या राज्यात विकास न झाल्यामुळं ते येतात. आश्रित म्हणून येणारे हे लोक मुंबई, महाराष्ट्राला महान कसं बनवू शकतात,' असा सवाल मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी विचारला आहे.
'मुख्यमंत्र्यांची ही भूमिका म्हणजे परप्रांतीयांच्या मतांसाठी खटाटोप आहे. यामागे दुसरा-तिसरा काही हेतू नाही. यापूर्वी हे काँग्रेस करत होती. आता भाजपा करते आहे. 'पार्टी विथ द डिफरन्स' वगैरे काही नाही,' असं नितीन सरदेसाई यांनी म्हंटलं. 'सत्तेत असलेली लोक त्यांची जबाबदारी योग्य पद्धतीनं पार पाडत नाहीत म्हणून मनसेला मराठी माणसाचा, मराठी भाषेचा मुद्दा उचलावा लागतो,' असंही नितीन सरदेसाई यांनी म्हंटलं.