सुषमा अंधारेंच्या पत्राला मनसेचं खरमरीत उत्तर; "परजीवी बांडगुळ अन् तुमच्यात..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 06:09 PM2023-04-21T18:09:20+5:302023-04-21T18:10:05+5:30

आपल्यापेक्षा अधिक हुशार कुणीच नाही, असा गंड तुम्हाला झाला असावा. तो हे उत्तर वाचून कदाचित दूर होईल असा टोला मनसेने लगावला आहे.

MNS's harsh reply to Sushma Andhare's letter about crticism on Raj Thackeray | सुषमा अंधारेंच्या पत्राला मनसेचं खरमरीत उत्तर; "परजीवी बांडगुळ अन् तुमच्यात..."

सुषमा अंधारेंच्या पत्राला मनसेचं खरमरीत उत्तर; "परजीवी बांडगुळ अन् तुमच्यात..."

googlenewsNext

मुंबई - खारघर दुर्घटनेवरून ठाकरे बंधू आमनेसामने आलेले आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे यांनी या दुर्घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. तर दुसरीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कोरोना काळातील हलगर्जीपणावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो, खारघर दुर्घटनेचे राजकारण करू नये असं विधान केले. त्यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंना पत्र पाठवून ८ खोचक सवाल विचारले होते. त्यावर आता मनसेने प्रत्युत्तर दिले आहे. 

मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी लिहिलेले पत्र वाचा जसंच्या तसं...

माननीय सुषमाताई, 
वास्तविक माननीय म्हणावे असे तुमच्यात काहीही नाही. वासरात लंगडी गाय शहाणी, या न्यायाने उद्धव सेनेच्या वासरांत तुम्ही आहात. बाकी परजीवी बांडगुळ आणि तुम्ही यांच्यात काहीही फरक नाही. तरीही शिष्टाचार म्हणून तुम्हाला माननीय म्हटले आहे. स्वतःस माननीय समजू नये. पत्रास कारण की, तुम्ही माननीय राजसाहेबांना लिहिलेले पत्र वाचले. आणि "नवा मुल्ला जोरात बांग देतो" या उक्तीची प्रचिती आली. 

हिंदू धर्माबद्दल आणि देव देवतांबद्दल तुम्ही या आधी उधळलेली मुक्ताफळे आम्ही ऐकली आहेत. ते तुमचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य असेलही. पण आमच्या श्रद्धांचा तो अपमान होता. माननीय बाळासाहेबांच्या बाबतीतही तसेच. माकडं एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारत असतात, मागच्या झाडावर आपण काय खाल्ले आहे, हे माकडाच्या लक्षात नसते. आपण माकड नाही, माणूस आहोत, याचे भान राजकारणातल्या व्यक्तीला असले पाहिजे. तुमच्याकडे ते आहे असे काही वाटत नाही. 

आज उद्धवजींच्या बाजूने तुम्ही बांगा मारत आहात आणि मीच कशी उद्धवनिष्ठ हे दाखवण्याचा तुमचा आटापिटा सुरु आहे. त्यासाठी आज तुम्ही राज साहेबांवर टीका केलीत. आपल्यापेक्षा अधिक हुशार कुणीच नाही, असा गंड तुम्हाला झाला असावा. तो हे उत्तर वाचून कदाचित दूर होईल. त्यामुळे तुमच्या प्रत्येक मुद्द्याची चिरफाड करायला घेत आहे. 

१) कोरोना ही महामारी उद्धवनिर्मित नाही हे आम्हालाही माहीत आहे. पण त्या महामारीत उद्धवनिर्मित कंत्राटदारांनी लोकांच्या जीवाशी आणि जनतेच्या पैशाशी खेळ केला हे तुम्हाला माहीत नसावे. त्याची माहिती आधी करून घ्या. सुजित पाटकर यांच्यावर काल पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ते कोण आहेत याची माहिती घेतलीत तर बरे होईल. 

२) हिंदू धर्म, हिंदू धर्मियांच्या श्रद्धा याबद्दल खालच्या भाषेत टीका करण्यात तुमची हयात गेली आहे. त्यामुळे "श्री परिवार", त्यांचे सामाजिक काम याबद्दल तुमच्या डोक्यात अंधार असणार याची आम्हाला खात्री आहे. कोट्यवधी नागरिकांची ज्या व्यक्तीवर श्रद्धा आहे, त्या व्यक्तीला जाहीर कार्यक्रमात पुरस्कार देणे घटनाबाह्य आहे, असे संविधानात लिहिलेले नाही. 

३) पुरस्कार मिळालेली कोणतीही व्यक्ती ही लोकप्रियच असते. अन्यथा तुम्हालाही एखादा पुरस्कार मिळाला असता. त्यामुळे मा. आप्पासाहेबांना पुरस्कार देऊन त्यांची लोकप्रियता सरकारसाठी वापरण्याचा आपला आरोप सगळ्याच सरकारांवर करता येईल. अगदी शरद पवारांच्या सुद्धा. 

४) पी एम केअर फंडाचे अंकेक्षण झाले आहे. आणि त्याचा अहवाल संसदेत ठेवण्यात आला आहे. आणि तुमच्या लाडक्या मुख्यमंत्री सहायता निधीतील पैसे पूर्ण खर्च झाले नाहीत, हा प्रकाश डोक्यात पाडून घ्या.

५) मंदिर आणि तुम्ही यांचा काहीही संबंध नाही. मंदिर या एका विषयावर फुलवाले, हारवाले, भिकारी, गायवाले, उदबत्तीवाले अशा हजारो लोकांची उपजीविका अवलंबून असते. तुमच्या लाडक्या उद्धवजींनी बार उघडले आणि मंदिरे बंद केली होती. त्यावेळी तुम्ही बहुतेक राष्ट्रवादीत होता. 

आणि हो, आज जे संविधान आणि कायदा तुम्हाला दिवसरात्र आठवतो आहे ना, तो तुमच्या उद्धवजींनी धाब्यावर बसवला होता. आणि संदीप देशपांडेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव रचला होता. पण आज तुम्हाला ते दिसणार नाही. उद्या पक्ष बदललात की याच मुद्यावर तुम्ही थयथयाट कराल याची आम्हाला खात्री आहे. 

राहता राहिला तुमच्या उद्धवजींचे कौतुक. ते तर WHO चे सल्लागार होते. त्यांच्या काळात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले. सर्वाधिक भ्रष्टाचार महाराष्ट्रात झाला. सर्वाधिक सरकारी मारहाणी महाराष्ट्रात झाल्या. उद्योजकांच्या घराखाली जिलेटीन महाराष्ट्रात ठेवले. जाऊदे. तुम्ही अडचणीत याल असे आणखी मुद्दे मांडत नाही. "दे राशन, करते भाषण" मधून वेळ मिळाला तर "रेन ड्रॉप्स पीआर" ही काय भानगड आहे, ते उद्धवजी आणि आदित्यजींना विचारून घ्या. कधीतरी उपयोगी पडेल.        

एक राहिलेच. खारघरच्या जखमींना भेटायला राजसाहेब गेले होते की नाही ते तुमचे खासदार राजन विचारेंना विचारून घ्या. ते उत्तर देतील.

तुर्तास तुमच्यासाठी एवढं पत्र पुरेसं आहे.
 

Web Title: MNS's harsh reply to Sushma Andhare's letter about crticism on Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.