विजेचे बिल थकविल्याने तब्बल ८०,७४८ ग्राहकांचा पुरवठा खंडित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 07:58 AM2021-07-16T07:58:03+5:302021-07-16T07:59:55+5:30
महावितरणनं केली मोठी कारवाई. ९२३ कोटींवर पोहोचली थकबाकी.
![more than 80 thousand customers electricity connection cut off due to non payment of electricity bills | विजेचे बिल थकविल्याने तब्बल ८०,७४८ ग्राहकांचा पुरवठा खंडित more than 80 thousand customers electricity connection cut off due to non payment of electricity bills | विजेचे बिल थकविल्याने तब्बल ८०,७४८ ग्राहकांचा पुरवठा खंडित](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/electricity-bill-abd-1582884278_202011519823.jpeg)
विजेचे बिल थकविल्याने तब्बल ८०,७४८ ग्राहकांचा पुरवठा खंडित
मुंबई : भांडुप परिमंडळातील उच्चदाब व लघुदाब ग्राहकांची वीजबिलाची थकबाकी ९२३ कोटींवर पोहोचली असून, ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. महावितरणने भांडुप परिमंडळातील ८० हजार ७४८ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. थकबाकीच्या ओझ्यामुळे वीजखरेदीसह दैनंदिन देखभाल व इतर खर्चासाठी मोठ्या आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असून, नाइलाजास्तव महावितरणकडून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या कटू कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.
भांडुप परिमंडळात आजपर्यंत ८० हजार ७४८ घरगुती तसेच व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांच्या वीजबिलांपोटी ६१.८५ कोटींची थकबाकी असल्यामुळे त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये वाशी मंडळातील नेरूळ विभागात ३,८४३ ग्राहकांची थकबाकी ३.७९ कोटी, पनवेल शहर विभागातील १४,४०१ ग्राहकांची थकबाकी १३.४४ कोटी तर वाशी विभागातील ७,२३६ ग्राहकांची थकबाकी ७.६८ कोटी आहे. त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. ठाणे मंडळातील भांडुप विभागात ४,९८३ ग्राहकांची थकबाकी ३.६८ कोटी आहे.
मुलुंड विभागातील २,९८५ ग्राहकांची थकबाकी १.६८ कोटी, ठाणे १ विभागातील ३,२२८ ग्राहकांची थकबाकी १.७९ कोटी, ठाणे २ विभागातील ३,८२५ ग्राहकांची थकबाकी २.९७ कोटी तर वागळे इस्टेट विभागातील ७,०६७ ग्राहकांची थकबाकी ६.१५ कोटी एवढी आहे. पेण मंडळातील अलिबाग विभागात ५,७४५ ग्राहकांची थकबाकी ३.४४ कोटी, गोरेगाव विभागातील ६,३१८ ग्राहकांची थकबाकी ३.६३ कोटी, तर पनवेल ग्रामीण विभागातील १३,७६५ ग्राहकांची थकबाकी १०.१४ कोटी तसेच रोहा विभागातील ७,३५२ ग्राहकांची ३.४२ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
अन्यथा यापुढे अजून तीव्र कारवाई
ज्या ग्राहकांनी एप्रिल २०२० पासून वीजबिल भरले नाही, त्यांनी आपले चालू व थकीत वीजबिल भरावे; अन्यथा यापुढे कारवाई अजून तीव्र करण्याचा इशारा भांडुप परिमंडळाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिला आहे. तसेच वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.