नयन जैन हत्याकांड : ‘इन्कार’ पाहून सुचली ट्रेनमधून पैसे फेकण्याची कल्पना!

By admin | Published: March 5, 2016 01:32 AM2016-03-05T01:32:31+5:302016-03-05T03:48:03+5:30

८०च्या दशकात गाजला होता, विनोद खन्ना आणि अमजद खान यांचा चित्रपट ‘इन्कार’. त्याची कथाही लहान मुलाच्या अपहरणाचीच होती. त्यात अपहरणकर्ता चालत्या ट्रेनमधून पैसे फेकण्याची मागणी करतो.

Nayan Jain massacre: The idea of ​​throwing money from the train by seeing 'denial'! | नयन जैन हत्याकांड : ‘इन्कार’ पाहून सुचली ट्रेनमधून पैसे फेकण्याची कल्पना!

नयन जैन हत्याकांड : ‘इन्कार’ पाहून सुचली ट्रेनमधून पैसे फेकण्याची कल्पना!

Next
>मुरलीधर भवार,  कल्याण 
८०च्या दशकात गाजला होता, विनोद खन्ना आणि अमजद खान यांचा चित्रपट ‘इन्कार’. त्याची कथाही लहान मुलाच्या अपहरणाचीच होती. त्यात अपहरणकर्ता चालत्या ट्रेनमधून पैसे फेकण्याची मागणी करतो. तसे ते फेकले जातात आणि पैसे घेऊन अपहरणकर्त्याचा माणूस पळून जातो... हा सीन नयनचे अपहरण करणाऱ्यांच्या डोक्यात होता. त्याच धर्तीवर त्यांनी ट्रेनमधून पैसे फेकण्याची मागणी केली होती. नयन कधी शाळेतून येतो, याची माहिती त्यांनी घेतली होती. त्याच्यावर पाळत होती. नयन शाळेतून येताच आधीची ओळख दाखवत डाव साधला आणि निष्पाप नयनचा जीव गेला... 
नयन स्कूल बसमधून उतरूनही घरात न आल्याने आई रश्मी हिने शोधाशोध केली. आईने त्याला बसमधून उतरताना खिडकीतून पाहिले ते शेवटचेच. जराशी चुकामूक झाली आणि नयन त्याच्या कुटुंबाला कायमचा पारखा झाला.
आईने बाजारपेठ परिसरात गजानन टॉवरच्या खाली शोधाशोध सुरु केली. तिला काहीच सुचत नव्हते. नयनचे वडिल संतोष यांना तिने कळवले. ‘नयन आला होता घराखाली. तो वरती का आला नाही, म्हणून खाली गेले तर तो एका बाईकवर बसून गेल्याचे लोक सांगतात,’ हे एकून संतोषही भांबावले. त्यांनी लगेच घरी धाव घेतली. शोधाशोध सुरू असतानाच नयनचे अपहरण करणाऱ्यांनी ३ वाजून ४० मिनिटांनी संतोषला फोन केला. ‘तुझ्या मुलाला आम्ही किडनॅप केलेले आहे. ११ वाजता १५ लाख रुपये तयार ठेव. नाही तर मुलाची डेडबॉडी मिळेल,’ अशी धमकी त्यांनी दिली. त्यानंतर संतोषने अपहरणकर्त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण फोन बंद होता. पुन्हा संतोषला मध्यरात्री दीड वाजता फोन आला, ‘पैसे तयार ठेव.’ त्यानंतर पुन्हा अपहरणकर्त्यांचा फोन बंद झाला. पुन्हा पहाटे पाच वाजता फोन आला, ‘पैसे घेऊन कल्याण ब्रीजवर पोच. कल्याण ब्रीजवर पोचल्यावर टिटवाळा गाडीत बस आणि शहाड स्टेशन आल्यावर कॉल कर,’ असे अपहरणकर्त्याने सांगितले. शहाड आल्यावर त्यांनी फोन करण्याचा प्रयत्न केला, पण अपहरकर्त्याचा फोन लागला नाही. तोवर टिटवाळा आले. पुन्हा फोन आला, ‘आता मुंबईच्या दिशेने जाणारी गाडी पकड. गाडीच्या शेवटच्या डब्यात बस. शहाड आले, की फोन कर. काळा शर्ट घातलेला आमचा माणूस दिसेल.’ या फोनच्या गोंधळात संतोष पुन्हा कल्याणला पोचले. त्यावेळी त्यांना पुन्हा अपहरणकर्त्याचा फोन आला, ‘तुला पैसे द्यायचे नाहीत का? तू आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतोयस...’
हे सुरू असताना संतोषच्या सोबत अपहरणकर्त्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांची ८० जणांची टीम होती. पुन्हा एकदा अपहरणकर्त्याने संतोष यांना टिटवाळा गाडी पकडण्यास सांगितले. ‘फोन चालूच ठेव. टिटवाळा स्टेशन येण्यापूर्वी समांतर रस्त्यावर १५ लाख रुपये फेक. ते मिळाले, की आमचा माणूस तुला हात दाखवेल.’ त्या सूचनेनुसार संतोष यांनी १५ लाखांची बॅग गाडीतून फेकली. ती उचलून अपहरकर्त्याने हात दाखवला आणि बाईक सुरू केली. मागावर असलेल्या पोलिसांनी संतोष यांना, घरी जाण्याचा सल्ला दिला. 
संतोष घरी आले. पोलिसांचा सकाळी ११ वाजता फोन आला. तोवर पोलिसांनी तीन आरोपींना पकडून पोलिस ठाण्यात आणले होते. त्यांच्या माहितीतून नयनचे बरेवाईट झाल्याचे उघड झाल्याने संतोष हबकले होते. अपहरणकर्त्या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस संतोष यांना घेऊन शिवळे येथे नदीकाठी गेले... आणि जे घडू नये, असे वाटत होते, तेच भीषण वास्तव समोर आले. तेथे सापडला चिमुकल्या नयनचा मृतदेह. अपहरकर्त्यांनी गुंगीचे औषध देऊन बेशुद्धावस्थेतील नयनला नदीच्या पाण्यात फेकून दिले होते... एक चिमुकला जीव प्रतिकारही न करता काळाच्या पडद्याआड गेला.
संतोष यांनी माहिती दिल्यावर पोलिसांनी अपहरणकर्त्यांना पकडण्यासाठी सापळा लावला होता. शिवसेनेचे अंकूश जोगदंड यांचे समर्थक असलेले ५० तरुणही पोलिसांच्या मदतीला होते. अपहरणकर्त्यांना संशय येऊ नये म्हणून अंकूश यांनी कार घेतली होती. त्या कारमध्ये पोलिस अधिकारी नासीर कुलकर्णी बसले होते. रेल्वेमार्गाला समांतर असलेल्या रस्त्यावर काळे कपडे घातलेला आणि तोंड बांधलेला एक तरूण बाईकवर होता. पैसे त्याने उचलले आणि पाठलाग सुरू झाला. तेवढ्यात आणखी पुढे गेल्यावर एक जण त्या बाईकवर मागे बसला. त्याच्या हातात पैशाची बॅग दिल्यावर मागे बसलेल्याने बॅगेत पैसे असल्याची खात्री केली... तेवढ्यात पाठलाग करणाऱ्या अंकूश यांच्या कारने बाईकला जोरात धडक दिली. तेव्हा पैशाची बॅग घेऊन मागे बसलेला खाली पडला आणि बाईक चालविणारा जंगलात पसार झाला. पोलिसांनी झडप घालून आधी खाली पडलेल्या पकडले. नंतर जंगलातून बाईक सोडून पळालेल्याला पकडण्यात यश आले....नयनऐवजी त्याच परिसरात राहणाऱ्या एका शेअर ब्रोकरच्या तीन वर्षाच्या मुलाला पळवून नेण्याचा तिघा अपहरणकर्त्यांचा इरादा होता. पण तो शेअर ब्रोकर जास्त पैसे देणार नाही. त्यामुळे त्यांनी त्या शेअर ब्रोकरच्या मुलाच्या अपहरणाचा प्लॅन रद्द करुन नयनला लक्ष्य केले... आणि निष्पाप नयनचा बळी गेला.
 
 
नयनच्या मारेकऱ्यांना फाशी द्या!
कल्याण : नयन जैन या सात वर्षांच्या मुलाच्या हत्येचे तीव्र पडसाद शुक्रवारी शहरात उमटले. हत्येच्या निषेधार्थ काढलेल्या मूक मोर्चात मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी झाले होते. या वेळी त्यांनी संतप्त भावना व्यक्त करताना नयनच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. 
नयन राहत असलेल्या बाजारपेठ परिसरातील गजानन टॉवर येथून तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी झालेल्यांनी तहसीलदार किरण सुरवसे यांंना निवेदन दिले. या वेळी सुरवसे यांनी सांगितले की, नागरिकांच्या भावना लक्षात घेता हे निवेदन तत्काळ जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांना पाठवले जाईल. त्यांच्यामार्फत सरकारला जनतेच्या भावना कळविल्या जातील. मोर्चात नयनची आई रश्मी, वडील संतोष, नातेवाईक, शेजारी यांच्याबरोबरच जैन समाज, व्यापारी, मुस्लीम व नागरिक, शिवसेना शहरप्रमुख विश्वनाथ भोईर, महानगरप्रमुख विजय साळवी, नगरसेवक जयवंत भोईर, काशीब तानकी, माजी नगरसेवक रवी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश हनुमंते सहभागी झाले होते. नागरिकांच्या भावना लक्षात घेता पोलिसांनी मोर्चादरम्यान प्रचंड बंदोबस्त ठेवला होता. (प्रतिनिधी)
> येथील व्यापारी संतोष जैन यांचा सात वर्षांचा मुलगा नयन याची १५ लाखांच्या खंडणीसाठी हत्या करणाऱ्या राजेंद्र मोरे, विजय दुबे आणि देशराज कुशवाह या तिन्ही आरोपींना रेल्वे न्यायालयाने १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 
त्यांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती नागरिकांना असल्याने त्यांनी तेथे गर्दी केली. मात्र, तेथे आरोपींवर हल्ला होईल, ही शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी खबरदारी म्हणून त्यांना रेल्वे न्यायालयात हजर केले, तर कल्याणकरांनी आज प्रचंड मूक मोर्चा काढून या घटनेचा निषेध करून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली.
> राजकीय पक्षांचे मौन
नयन जैनच्या हत्येच्या निषेधार्थ शिवसेना मोर्चात सहभागी झाली होती. मात्र, अन्य पक्षांचा एखादा पदाधिकारी वगळता कोणीही मोर्चात दिसले नाही. त्यामुळे इतक्या मोठ्या घटनेविषयी इतर राजकीय पक्षांनी मौन बाळगल्याचे दिसून आले.

Web Title: Nayan Jain massacre: The idea of ​​throwing money from the train by seeing 'denial'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.