Amol Mitkari : "जाहिर सभा, उत्तर सभा आता वाट 'पुरवणी' सभेची; प्रश्न राष्ट्रवादीचे अन् उत्तर BJP च्या C टीमचे"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 10:46 AM2022-04-13T10:46:56+5:302022-04-13T10:57:17+5:30
NCP Amol Mitkari And MNS Raj Thackeray : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी राज यांना खोचक टोला लगावला आहे.
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) आपल्या भाषणात नेहमी शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र असल्याचे सांगत असतात. ते कुणीही नाकारू शकत नाही. परंतु, शरद पवार कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताना दिसत नाही. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या आधी हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे. शरद पवार नास्तिक, देव मानत नाहीत, देवळात हात जोडतानाचा फोटो सापडणार नाही, या शब्दांत शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी (NCP Amol Mitkari) यांनी राज यांना खोचक टोला लगावला आहे.
"सभेत फक्त आणि फक्त मनोरंजन आणि प्रश्नच प्रश्न... वाऱ्याला लाथा मारणारी पुरवणी सभा झालीच पाहिजे" असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. ""जाहिर सभा", "उत्तर सभा" आता वाट "पुरवणी सभेची"... सभेत फक्त आणि फक्त मनोरंजन आणि प्रश्नच प्रश्न... वाऱ्याला लाथा मारणारी पुरवणी सभा झालीच पाहिजे. प्रश्न राष्ट्रवादीचे उत्तर BJP च्या C टीमचे" असं मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच "शिव शाहू फुले आंबेडकरांची" चळवळ अजून जिवंत आहे इतके लक्षात असू द्या असंही म्हटलं आहे.
"जहिर सभा" , "उत्तर सभा" आता वाट "पुरवणी सभेची" सभेत फक्त आणि फक्त मनोरंजन आणि प्रश्नच प्रश्न वाऱ्याला लाथा मारणारी पुरवणी सभा झालीच पाहिजे. पश्न राष्ट्रवादीचे उत्तर BJP च्या C टीमचे.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) April 12, 2022
"भडकाऊ भाषण देऊन महाराष्ट्राची शांतता भंग करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी "शिव शाहू फुले आंबेडकरांची" चळवळ अजून जिवंत आहे इतके लक्षात असू द्या. छत्रपती शिवाजी महाराज विरुद्ध फुले-शाहू-आंबेडकर अशी वेगळी मांडणी करण्याचा केविलवाणा प्रयत्न महाराष्ट्राने हाणून पाडलाय #विझलेला दिवा" असं देखील मिटकरी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. शरद पवार कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताना दिसणार नाहीत. छत्रपतींचे नाव घेतल्यावर मुस्लीम मते जातील ही शरद पवारांना भीती आहे, असा दावा करताना अफझल खान वीणा वर्ल्डचे तिकीट काढून महाराष्ट्र दर्शनाला आला होता का, अशी खोचक विचारणा राज ठाकरे यांनी केली.
भडकाऊ भाषण देऊन महाराष्ट्राची शांतता भंग करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी "शिव शाहू फुले आंबेडकरांची" चळवळ अजून जिवंत आहे इतके लक्षात असू द्या . छत्रपती शिवाजी महाराज विरुद्ध फुले-शाहू-आंबेडकर अशी वेगळी मांडणी करण्याचा केविलवाणा प्रयत्न महाराष्ट्राने हाणून पाडलाय#विझलेला दिवा .
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) April 12, 2022
शरद पवारांनी आपल्या पद्धतीने राजकारण केले. बाबासाहेब पुरंदरेंमुळे घराघरात शिवाजी महाराज पोहोचले हे कुणीही अमान्य करणार नाही. शिवाजी महाराजांवर अनेकांनी लिहिले आहे, असेही राज ठाकरे यांनी नमूद केले. शरद पवार यांच्याकडे घेण्यासारखे अनेक गुण आहेत. मात्र, स्वार्थी राजकारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीयद्वेष महाराष्ट्रात पसरला, असा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केला. प्रत्येक जातीचा माणूस शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी लढला. शिवरायांचा इतिहास घराघरात पोहोचणे महत्त्वाचे आहे. मात्र, तो कुणी लिहिला, यावरून राजकारण केले गेले. जाती-पातीत महाराष्ट्र अडकला गेला. महाराष्ट्राला कुणीही हरवू शकत नाही, मात्र राज्यातील जातीचे राजकारणच आपल्याला हरवेल, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच अनेक संघटना स्थापन झाल्या. महाराष्ट्रात जाती होत्याच पण राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद महाराष्ट्रात आला. जातीयद्वेष पसरला, असा मोठा आरोप राज ठाकरे यांनी केला.