“दोन्ही समाजात कटुता अन् वाद निर्माण होऊ नये अशी आमची भूमिका”: जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 03:41 PM2023-11-07T15:41:18+5:302023-11-07T15:41:47+5:30

Jayant Patil News: मराठा आरक्षणावरून महायुतीतच महाभारत सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

ncp sharad pawar jayant patil reaction over shinde group shambhuraj desai and ajit pawar group chhagan bhujbal statement on reservation | “दोन्ही समाजात कटुता अन् वाद निर्माण होऊ नये अशी आमची भूमिका”: जयंत पाटील

“दोन्ही समाजात कटुता अन् वाद निर्माण होऊ नये अशी आमची भूमिका”: जयंत पाटील

Jayant Patil News: एकीकडे आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून, सरकारला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. मराठा आरक्षणासह धनगर आरक्षणाची मागणीही जोर धरू लागली आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. मराठा आरक्षणावरून महायुतीतच महाभारत सुरू असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी टीका केली आहे. 

छगन भुजबळ यांची अशी भडक विधाने करायची जुनी सवय आहे. काही वेगळे वाटत असेल तर भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ मागून घ्यावी, भेटून चर्चा करावी. ओबीसी आरक्षण काढून दुसऱ्यांना दिले जाणार नाही. अशी शक्यता नाही. मात्र, आपले आरक्षण काढून दुसऱ्यांना दिले जाणार आहे, असे भासवायचे. तुमचे जाणारे आरक्षण मी थांबवले, असे सांगायचे, मोठेपणा घ्यायचा, असे आता वाटू लागले आहे. छगन भुजबळ यांना वास्तविक ही सगळी परिस्थिती आणि प्रक्रिया माहिती आहे. तरीही संभ्रम निर्माण करण्याचे काम केले जात आहे, हे १०० टक्के चुकीचे आहे, या शब्दांत शंभुराज देसाई यांनी हल्लाबोल केला. यानंतर आता यावरून प्रतिक्रिया उमटत आहेत. 

कटुता निर्माण होऊ नये याची काळजी घेण्याची जबाबदारी सरकारची

हा दोन्ही बाजू सांभाळण्याचा प्रकार दिसतोय. काही लोकांनी या बाजूचे बोलायचे आणि काहींनी दूसऱ्या बाजूचे बोलायचे असे काही आहे का हे तपासले पाहिजे. या बाबतीत सरकारने एकमत केले पाहिजे. मुख्यमंत्री एक बोलतायत, उपमुख्यमंत्री दुसरे बोलत आहेत आणि आता मंत्री वेगळे बोलत आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांचे एकमत करावे. आमची यावर भाष्य करण्यची इच्छा नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. दोन्ही समाजात वाद होऊ नये अशी आमची भूमिका आहे. यांना आरक्षण मिळत असेल तर दुसरीकडे कटुता निर्माण होऊ नये याची काळजी घेण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान, छगन भुजबळ यांनी सरसकट मराठा प्रमाणपत्राला विरोध दर्शवला आहे. आपल्यावर अन्याय होत असेल तर आपल्याला बोलायला पाहिजे, जर आपण गप्प बसलो तर आपल्याला कोणीही मदत करायला येणार नाही. त्यामुळे आता थोडी दहशत माजवायची आणि जे पाहिजे करुन घ्यायचे, समोरच्या दरवाज्यातून प्रवेश मिळत नाही म्हणून मागच्या दरवाज्यातून प्रवेश मिळवायचे काम सुरू आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले. 


 

Web Title: ncp sharad pawar jayant patil reaction over shinde group shambhuraj desai and ajit pawar group chhagan bhujbal statement on reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.