नववी-दहावीसाठी भाषांची तोंडी परीक्षा रद्द
By admin | Published: July 14, 2017 08:50 AM2017-07-14T08:50:46+5:302017-07-14T09:35:33+5:30
नववी आणि दहावीच्या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेच्या माध्यमातून शाळांकडून दिले जाणारे भरमसाठ मार्क आता बंद होणार आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14- नववी आणि दहावीच्या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेच्या माध्यमातून शाळांकडून दिले जाणारे भरमसाठ मार्क आता बंद होणार आहे. भाषांची तोंडी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाषा विषयांसाठीची २० मार्कांची तोंडी आणि ८० मार्कांची लेखी परीक्षा हा नियम बंद करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने गुरुवारी जाहीर केला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या या निर्णयामुळे यंदा नववीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयांची १०० मार्कांची प्रश्नपत्रिका सोडवावी लागणार आहे. दरम्यान, हे बदल यंदा फक्त नववीसाठी असून याची दक्षता शाळांनी घेण्याची सूचनाही करण्यात आली आहे. राज्य शिक्षण मंडळाचा हा निर्णय पुढील शैक्षणिक वर्षांपासून दहावीसाठीही लागू होणार आहे.
नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सध्या भाषा, द्वितीय भाषांच्या तोंडी परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना गुण देण्याची मुभा ही शाळांना देण्यात आलेली आहे. त्यामुळे शिक्षकांकडून अनेक विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेत पूर्ण मार्क दिले जात असल्याच्या तक्रारी होत्या. विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क मिळत असल्याने गेल्या काही वर्षांपासून नववी आणि दहावीच्या वार्षीक निकालही अपेक्षे पेक्षा जास्त लागलेला दिसून येतो आहे. यावरच बऱ्याच शिक्षणतज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक पुण्यात पार पडली होती. त्या बैठकीत परीक्षा पॅटर्न बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आणखी वाचा
सरकारवर जनतेच्या विश्वासाच्या बाबतीत भारत पहिल्या स्थानी
अकरावी प्रवेशाला एक दिवसाची मुदतवाढ
मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी सुट्टी द्यावी सेना नगरसेविकेची मागणी
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी यासंदर्भातील परिपत्रक जाहीर केलं. त्यानुसार आता भाषा विषयांची १०० गुणांची लेखी परीक्षा होणार आहे. तर संयुक्त भाषा विषयांसाठी ५० गुण प्रत्येकी असा नवा पॅटर्न ठरविण्यात आला आहे. भाषा विषयांची तोंडी परीक्षा यापुढे न घेण्याच्या सूचना शाळांना दिल्या आहेत.
राज्य शिक्षण मंडळाच्या या निर्णयाचं शिक्षक तज्ज्ञांकडून स्वागत करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी खरंतर तोंडी परीक्षेचा नियम होता पण त्याचा गैरवापर सुरू झाला होता. म्हणूनच त्यावर निर्बध घालण्याची गरज होती. म्हणूनच राज्य शिक्षण मंडळाने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे, असं मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
असा असेल नवा परीक्षा पॅटर्न
- संपूर्ण भाषा विषयांसाठी १०० मार्कांची प्रशपत्रिका असेल आणि संयुक्त भाषा विषयांसाठी प्रत्येकी ५० मार्काची प्रश्नपत्रिका असेल.
- गणित विषयला १०० मार्क आहेत त्यापैकी ८० मार्कांची लेखी परीक्षा आहे. त्या ८० मार्कांमध्ये ४० मार्क बीजगणित, ४० मार्क भूमितीसाठी. तर २० इंटर्नलचे मार्क
-विज्ञान-तंत्रज्ञान विषयाची २० मार्काची प्रॅक्टीकल होइल. ८० गुणांमध्ये भाग १ व भाग २ प्रत्येकी ४० मार्कांचा.
- सामाजिक शास्त्रं या विषयात इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल मिळून १०० गुण. इतिहास ४०, राज्यशास्त्र २० व भूगोल ४० अशी मार्कांची विभागणी.
- यापुढे श्रेणी विषयांची लेखी परीक्षा होणार नाही.