आता दहावीच्या विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय चाचणी

By Admin | Published: November 13, 2015 12:33 AM2015-11-13T00:33:02+5:302015-11-13T00:33:02+5:30

दहावीनंतर नेमका कोणत्या शाखेत किंवा कोणत्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा, याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये मोठा संभ्रम असतो.

Now the psychological test of Class X students | आता दहावीच्या विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय चाचणी

आता दहावीच्या विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय चाचणी

googlenewsNext

सुहास सुपासे,  यवतमाळ
दहावीनंतर नेमका कोणत्या शाखेत किंवा कोणत्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा, याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये मोठा संभ्रम असतो. योग्यवेळी योग्य अभ्यासक्रमाला प्रवेश न घेतल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे पुढे नुकसान होते. ही बाब टाळण्यासाठी आता राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यावर्षीपासून इयत्ता दहावीतील सर्व विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय (कल चाचणी) चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार माध्यमिक स्तरावर व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशनाचे काम प्रभाविपणे होणे गरजेचे आहे. दहावीनंतर पुढील शिक्षणाच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासंदर्भात बरेच विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये गोंधळाची स्थिती असते. अशा परिस्थितीत त्यांना योग्य मार्गदर्शन हवे असते.
विद्यार्थ्यांचा पुढील शिक्षणाबाबत कल विचारात घेऊन त्यांना त्यांच्या आवडीनुसार व क्षमतेनुसार वेळीच शैक्षणिक क्षेत्र निवडीस मदत केल्यास त्यांच्या उपजत कलागुणांना वाव मिळतो.
राज्यात जवळपास २२ हजार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये आहेत. त्यामध्ये सुमारे ६५ लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यासाठी अंदाजे अडीच लाखांच्या घरात शिक्षक कार्यरत आहेत. व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था मुंबई या संस्थेतून व्यवसाय मार्गदर्शन पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व सध्या कार्यरत असलेल्या राज्यातील शिक्षक समुपदेशकांची एकूण संख्या ५३९ आहे.
एकूण शाळा, शिक्षक व विद्यार्थी संख्या विचारात घेता समुपदेशन करण्यासाठी पात्र असणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तींची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे समुपदेशनाचा लाभ फारच थोड्या विद्यार्थ्यांना होतो. सध्या मानसशास्त्रीय कसोट्या या पेपर व पेन्सिलच्या माध्यमातून घेतल्या जातात. परंतु विद्यार्थी संख्या लक्षात घेता ही पद्धत फारशी प्रभावी नाही.विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाकडे वाढता कल लक्षात घेता त्यांना या संदर्भात शास्त्रीयदृष्ट्या योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. यासाठी मानसशास्त्रीय कसोट्यांची उपयुक्तता विचारात घेऊन याचा लाभ उच्च शिक्षण किंवा व्यवसायासाठी मार्गदर्शन करण्यासाठी होऊ शकतो. त्यासाठी आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न राज्यातील सर्व माध्यमिक शाळांतील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय चाचणी घेण्यात येईल.
या माध्यमातून त्यांना उच्च शिक्षण अथवा व्यवसायासाठी योग्य क्षेत्राची निवड करण्यास सहाय्य करून आवश्यकतेनुसार वैयक्तिक मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येणार आहे.
इयत्ता दहावीतील प्रत्येक विद्यार्थ्याला व्यवसाय मार्गदर्शन सेवेद्वारा शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रांची निवड करण्यास मार्गदर्शन करणे तसेच विद्यार्थी व पालक यांना विविध शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्राची माहिती देऊन जाणीव जागृती करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. याद्वारा विद्यार्थ्याच्या कलानुसार त्याला उच्च शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी प्रवेश वा मदत याबाबत शासनाची कोणतीही हमी असणार नाही तसेच कल चाचणीचा निकाल व प्रवेशप्रक्रिया यांचा कोणताही संबंध असणार नाही, असेही शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले असून केवळ विद्यार्थ्यांचा कल विद्यार्थ्यास व पालकांना अवगत व्हावा, या मर्यादित हेतूने ही मानसशास्त्रीय चाचणी घेण्यात येणार आहे.

Web Title: Now the psychological test of Class X students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.