आता ही आग कुठपर्यंत जाईल, याचा काही नेम नाही; लिफ्टमधील भेटीनंतर शिंदे गटाची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 02:51 PM2024-06-27T14:51:33+5:302024-06-27T14:52:15+5:30
आज विधानभवनाच्या लिफ्टमध्ये एकाचवेळी फडणवीस आणि ठाकरे एकत्र आल्याने राज्यात नवीन समीकरणाची चर्चा सुरु झाली आहे.
![Now there is no telling how far this fire will go; The reaction of the Shinde group Sanjay Shirsat after the Uddhav Thackeray Devendra fadanvis meeting in the elevator vidhan sabha Adhiveshan | आता ही आग कुठपर्यंत जाईल, याचा काही नेम नाही; लिफ्टमधील भेटीनंतर शिंदे गटाची प्रतिक्रिया Now there is no telling how far this fire will go; The reaction of the Shinde group Sanjay Shirsat after the Uddhav Thackeray Devendra fadanvis meeting in the elevator vidhan sabha Adhiveshan | आता ही आग कुठपर्यंत जाईल, याचा काही नेम नाही; लिफ्टमधील भेटीनंतर शिंदे गटाची प्रतिक्रिया](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/shinde-fadnvis-thacektay5_2024061256628.jpg)
आता ही आग कुठपर्यंत जाईल, याचा काही नेम नाही; लिफ्टमधील भेटीनंतर शिंदे गटाची प्रतिक्रिया
उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनविण्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे. याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काही तयार होईल अशी शक्यता कमी असताना आज विधानभवनाच्या लिफ्टमध्ये एकाचवेळी फडणवीस आणि ठाकरे एकत्र आल्याने राज्यात नवीन समीकरणाची चर्चा सुरु झाली आहे. यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाविकास आघाडीमध्ये बिघाडीला सुरुवात झाली आहे. संजय राऊत यांनी त्यात काडी टाकली आहे. आता ही आग कुठपर्यंत जाईल, याचा काही नेम नाही. महाविकास आघाडी टिकणे शक्य नाही हे स्पष्ट झाले असून त्याची सुरुवात आजपासून झाली आहे, असे शिरसाट म्हणाले. ज्याप्रकारे सरकारसाठी शेवटचे अधिवेशन आहे, तसेच महाविकास आघाडीसाठी देखील एकत्र राहण्याचे शेवटचे अधिवेशन आहे. संजय राऊत यांना नेमका कोणाचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून हवा, हे आधी त्यांनी ठरवायला हवे. त्यांना उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून हवे असतील तर हा प्रस्ताव काँग्रेस स्वीकारेल, असे वाटत नाही, असे शिरसाट म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात वज्रमुठ सभा झाल्या. त्यात खुर्चीमधील बदल उद्धव ठाकरे यांना आवडत नव्हता. त्यामुळे एकवेळेला आघाडी तुटेल पण मुख्यमंत्र्यांचा चेहरा समोर येणार नाही, असे मत शिरसाट यांनी व्यक्त केले. काँग्रेस नेत्यांकडून याविषयी कोणतेही भाष्य केले जाणार नाही कारण आता राज्यात काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत आले आहेत. त्यांना स्वतंत्र लढायची खुमखूमी आली आहे.त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये राहील की नाही हेच पाहण्यासारखे आहे. महाविकास आघाडी लोकसभा निवडणूक शरद पवारांच्या नेतृत्वात लढली होती उद्धव ठाकरे यांच्या नाही. त्यांनी शरद पवारांचा चेहरा वापरला होता, असेही शिरसाट म्हणाले.
उद्धव ठाकरे व चंद्रकांत पाटील यांची भेट झाली याचा अर्थ आमचे काही वैयक्तिक भांडण नाही. उद्धव ठाकरे यांना संजय राऊत चुकीचे मार्गदर्शन करत असल्याचा प्रत्यय आला असेल. राजकीय भांडण वेगणे आणि व्यक्तिगत संबंध वेगळे. प्रत्येकाचे प्रत्येकाशी असतात आणि ते कधी तुटू नयेत. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे तुमचे पोटभेद असावेत मनभेद नसावेत. त्याचे उदाहरण आज पाहायला मिळाले. महाराष्ट्राची संस्कृती जपायचे काम अशा नेत्यांनी केले पाहिजे त्याचा चांगला संदेश समाजात जातो यात काही गैर वाटत नाही, असे मत शिरसाट यांनी व्यक्त केले.