भ्रष्टाचाराचे रॅकेट उघड करा - राज ठाकरे
By admin | Published: July 28, 2014 01:12 PM2014-07-28T13:12:36+5:302014-07-28T14:34:52+5:30
महामार्ग ते गल्लीबोळ्यातील रस्त्यांपर्यंतच्या कामामध्ये भ्रष्टाचार केला जात असून हा सर्व भ्रष्टाचार उघड करा असे आदेश राज ठाकरेंनी मनसे पदाधिका-यांना दिले आहेत.
Next
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २८ - महामार्ग ते गल्लीबोळ्यातील रस्त्यांपर्यंतच्या कामामध्ये भ्रष्टाचार केला जात आहे. नित्कृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे करदात्यांना खड्ड्यातून मार्ग काढावा लागतो. पदपथावरही फेरीवाल्यांना मोकळीक दिली जाते. हा सर्व भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणा असे आदेश मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिका-यांना दिले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विरोधकांवर टीकेची तोफ डागतील अशी चिन्हे आहेत. काम करणा-यांनाच पक्षात पद दिले जाईल असे खडे बोलही त्यांनी पदाधिका-यांना सुनावले आहेत.
सोमवारी मुंबईत राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिका-यांची बैठक बोलवली होती. यात राज ठाकरेंनी खड्ड्यांवरुन मुंबई महापालिकेवर टीका केली. 'रस्त्याच्या कामासाठी टेंडर काढायचे, सहा महिन्यांत खराब होईल असा रस्ता बांधायचा. त्या रस्त्यावरील खड्ड्यांसाठी संबंधित ठेकेदाराला जाब विचारायचा सोडून खड्डे भरण्यासाठी आणखी एक ठेकेदार नेमायचा' असे उद्योग मुंबई महापालिकेत सुरु असल्याची टीका त्यांनी केली. पादचा-यांसाठी बांधण्यात येणा-या पदपथावरही फेरीवाल्यांना मोकळीक दिली जाते. दादरमध्ये एका फेरीवाल्याने चक्क आयुक्त सीताराम कुंटे यांच्या नावानेच पावती फाडली. यावरुन भ्रष्टाचाराने यंत्रण किती पोखरली आहे हे दिसते. भ्रष्टाचाराचे असे सर्व रॅकेट उघड करा असे राज ठाकरेंनी पदाधिका-यांना सांगितले.
मनसेच्या रस्ते आस्थापना विभागाच्या कामकाजाविषयीही राज ठाकरेंनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. रस्ते, पदपथ हे महत्त्वाचे विषय असून यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असतो. पण तुम्ही भ्रष्टाचाराऐवजी भलतीकडेच लक्ष देता असे त्यांनी विभागातील पदाधिका-यांना सुनावले. 'तुम्ही चांगल काम कराल मी तुम्हाला पुढे आणीन' अशी ग्वाही देत त्यांनी पदाधिका-यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला.
बेळगावप्रश्नी केंद्र सरकार गप्प का? राज ठाकरेंचा सवाल
कर्नाटकमध्ये मराठी भाषिकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीप्रकरणी केंद्र सरकार गप्प का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेदरम्यान राज यांनी मारहाणीच्या घटनेचा निषेध करत भाजप-शिवसेनेला हा प्रश्न विचारला. तसेच सीमाप्रश्नासंबंधी मुख्यमंत्री गंभीर नाहीत असेही ते यावेळी म्हणाले. इतर राज्यातील नागरिक, राजकारणी त्यांच्या भाषेशी, अस्मितेशी १०० टक्के प्रामाणिक असतात, मात्र आपल्याच राज्यात असा प्रकार दिसत नाही असे सांगत इथले राजकारणी 'बिनकण्याचे' असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
येळ्ळूरच्या मराठी भाषिकांनी उभारलेला ‘महाराष्ट्र राज्य - येळ्ळूर’ फलक कर्नाटक पोलिसांनी जमीनदोस्त केला व या कारवाईला विरोध करण्यासाठी गेलेल्यांवर अमानुषपणे लाठीमार केला. तसेच अनेकांच्या घरात घुसून त्यांच्या वस्तूंची तोडफोड करत अनेक वाहनांचेही पोलिसांनी नुकसान केले.