"नशीब बलवत्तर म्हणूनच पहलगामला जाण्यासाठी घोडे उशिरा मिळाले अन् आम्ही २८ जण वाचलो"
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 09:30 IST2025-04-23T09:29:32+5:302025-04-23T09:30:18+5:30
घोड्यांची उपलब्धता वेळीच झाली असती, तर आमचे काय झाले असते, या विचारानेच सर्वांना धक्का बसला.

"नशीब बलवत्तर म्हणूनच पहलगामला जाण्यासाठी घोडे उशिरा मिळाले अन् आम्ही २८ जण वाचलो"
रियाज मोकाशी
कोल्हापूर - मंगळवार दुपारच्या तीन वाजताची वेळ. आम्ही घोडेस्वार होऊन दीड किमी अंतरावर गोळीबार सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचणारच होतो, तोवर ट्रॅव्हल्सच्या ड्रायव्हरने उधर फायरिंग शुरू हैं मत जाओ, असे सांगताच आम्हा सर्वांचे अवसानच गळाले. तेथे जाण्यासाठी घोडे मिळण्यास उशीर झाला. नशीब बलवत्तर म्हणूनच आमचा जीव वाचला, असा थरारक प्रसंग कोल्हापुरातून जम्मू-काश्मीरला पर्यटनासाठी गेलेल्या अनिल कुरणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर व इतर जिल्ह्यांतून २८ जण काश्मीरला पर्यटनासाठी गेले आहेत. मंगळवारी दुपारी पहलगाम पर्यटनासाठी हे सर्वजण जाण्यासाठी तयारी करत होते. ट्रॅव्हल्सने पहलगामपासून दोन किमी अंतराजवळ पोहोचले. त्यापुढे घोड्यावरून स्वार होऊन जायचे होते. २८ जण असल्याने सर्वांना एकाचवेळी घोडे उपलब्ध होत नव्हते. घोड्यांची उपलब्धता होताच सर्व घोड्यावर बसत होते. तोपर्यंत ट्रॅव्हल्सच्या ड्रायव्हरने पहलगाममध्ये गोळीबार सुरू असल्याची माहिती दिली. ड्रायव्हरचे हे बोलणे ऐकताच सर्वांना धक्का बसला. घोड्यांची उपलब्धता वेळीच झाली असती, तर आमचे काय झाले असते, या विचारानेच सर्वांना धक्का बसला. सर्वजण घोड्यावरून खाली उतरलो. या ग्रुपमध्ये लहान मुलेही आहेत. सर्वांच्या चेहऱ्यावर एकच भीती होती.