प्रहार संघटनेने 10 हजार लिटर दूध ओतलं रस्त्यावर
By admin | Published: June 2, 2017 06:39 PM2017-06-02T18:39:17+5:302017-06-02T18:39:17+5:30
कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाप्रमाणे शेतमालास दीडपट हमीभाव व इतर विविध मागण्यांसाठी राज्यभर शेतक-यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला प्रहार संघटनेने पाठिंबा दर्शवला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
धाड(बुलडाणा), दि. 2 - कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाप्रमाणे शेतमालास दीडपट हमीभाव व इतर विविध मागण्यांसाठी राज्यभर शेतक-यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला प्रहार संघटनेने पाठिंबा दर्शवला आहे. प्रहार संघटनेनं शेतक-यांच्या आंदोलनात सहभागी होत अमर दूध संकलन केंद्राचे दुधाचे टँकर शिवाजी चौकात अडवून 10 हजार लिटर दूध रस्त्यावर ओतले. तसेच सरकारविरोधात रोषही व्यक्त केला.
धाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव मोहीते यांच्या नेतृत्वात शेतक-यांच्या आंदोलनाला समर्थन देत प्रहारच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधी घोषणा देत कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करणे व इतर मागण्यांसाठी रस्त्यावर येऊन अमर दूध संकलन केंद्राचे दुधाचे टँकर कार्यकर्त्यांनी अडवले व हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतले.
तर दुसरीकडे राज्यातील आणि केंद्रातील भाजपा सरकारने सत्तेसाठी शेतक-यांची फसवणूक केली, अशी खोचक टीका शेतक-यांच्या संपावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. शेतक-यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुंबईत शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी ते असेही म्हणाले की, भाजपा सरकार खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आले. त्यांनी शेतकरी आणि जनतेची फसवणूक केली आहे. तिकडे सीमेवर जवान आणि इकडे शेतकरी मरतायेत, मात्र भाजपावाले खुशाल आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला.
यापुढे ते म्हणाले की, शेतकऱ्यांचा राग मी समजू शकतो. मात्र, जे गिरणी कामगारांच्या बाबतीत झाले, ते शेतक-यांच्या बाबतीत होऊ नये. माझा शेतकऱ्यांच्या भावनेला माझा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांसोबत मी कायमच आहे. शेतक-यांच्या संपात अण्णा हजारे मध्यस्थी करत असतील, तर त्यांनी करावे, पण शेतक-यांचा प्रश्न सोडवावा. सर्वात ते महत्त्वाचं आहे, असेही यावेळी राज ठाकरे म्हणाले.
भाजपाने निवडणुकीआधी घोषणा दिल्या. सत्तेत आल्यानंतर घोषणा दिल्या. आता पैसे आहेत का यांच्याकडे? असा सवाल करत जोरदार टीका केली. तसेच, सरकार आता म्हणतं, कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, विरोधात असताना माहीत नव्हतं का? असेही राज ठाकरे म्हणाले.