अपेक्षांच्या ओझ्याखाली पालकही

By admin | Published: June 1, 2017 02:26 AM2017-06-01T02:26:01+5:302017-06-01T02:26:01+5:30

स्पर्धेच्या युगात आपला पाल्य मागे राहू नये, यासाठी मागेल त्या आधुनिक सुविधा पालकांकडून पाल्याला पुरविल्या जातात. त्यासाठी

Parents are also under the burden of expectations | अपेक्षांच्या ओझ्याखाली पालकही

अपेक्षांच्या ओझ्याखाली पालकही

Next

अनिल पवळ/ लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : स्पर्धेच्या युगात आपला पाल्य मागे राहू नये, यासाठी मागेल त्या आधुनिक सुविधा पालकांकडून पाल्याला पुरविल्या जातात. त्यासाठी लागेल तेवढा वेळ अन् पैसा देण्याची तयारी असते. त्याबदल्यात मात्र आपल्या पाल्यांकडून अव्वाच्या सवा अधिक मार्कांची अपेक्षा धरली जाते. मात्र, हाच पाल्य परीक्षेत नापास झाला अथवा कमी गुण मिळाले, तर पालकांचा अपेक्षाभंग होतो. या अपेक्षांच्या ओझ्याखाली आता विद्यार्थ्यांबरोबर पालकही भरडले जात आहेत.
बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी लागला. त्या वेळी पिंपरी येथील एका विद्यार्थ्यांला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने त्याच्या वडिलांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मेडिकलला जाण्यासाठी आपल्या मुलाने ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण
पाडले पाहिजेत, अशी अपेक्षा विश्वंभर पिल्ले यांनी बाळगली
होती. मात्र, त्यांच्या मुलाला ७१ टक्केच गुण मिळाले, याचे दु:ख झाल्याने विश्वंभर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेवरून कौैटुंबिक आणि
शैक्षणिक वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या.
नोकरीची शाश्वती न राहिलेल्या सध्याच्या परिस्थितीत आपल्या पाल्याने उत्तम शिक्षण घ्यावे. डॉक्टर अथवा वकील झाल्यानंतर चांगले पैैसे कमवता येतील, असाच अभ्यासक्रम निवडला पाहिजे. यासाठी दहावी, बारावीला वारेमाप गुणांची अपेक्षा पालकांकडून धरली जाते. त्यांना अभ्यासासाठी हवी ती साधने, गॅझेट दिली जातात. महागडे क्लासेस लावले जातात. त्यांच्या उठण्या-बसण्याच्या वेळाही ठरविल्या जातात. पाल्याकडून अपेक्षा असणे यात काहीच गैर नाही. मात्र, आपल्या पाल्याचा बौद्धिक क्षमता काय आहे, त्याचा कल कोणत्या अभ्यासक्रमाकडे आहे किंवा त्याची आवड-निवड काय आहे, याचाही विचार या अपेक्षा धरतेवेळी करणे अनिवार्य असते. मात्र, बहुतांश वेळा येणारा काळ किती कठीण आहे, हे मुलांच्या बुद्धीला काय समजणार किंवा करिअर कशात करायचे, हे मुलांना काय समजणार, अशी पालकांची धारणा असते.
आगामी आयुष्याबाबतचे धोरण ठरविताना पाल्याला विश्वासातच घेतले जात नाही. त्यामुळे तो पाल्य आई-वडिलांनी निवडलेल्या अभ्यासक्रमाच्या वाटेवर जातो खरा. मात्र, त्याला त्यात रसच राहत नाही. परिणामी, पाल्य आपल्या पालकांची गुणात्मक अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. मुलावर इतका खर्च केला. मात्र, मुलाने अभ्यास न करून आपला विश्वासघातच केला आहे, अशीच त्या पालकांची धारणा बनते आणि त्यातून स्वत:ला संपविण्याइतपत टोकाचे पाऊल पालकांकडून उचलले जाऊ लागले आहे.

गुणांची अपेक्षा धरताना पालकांनी आपल्या पाल्याची बौद्धिक क्षमताही विचारात घेणे आवश्यक आहे. तसेच आपल्या पाल्याला कोणत्या क्षेत्रात रस आहे, त्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी मुलांना प्रोत्साहन द्यावे. अनेकवेळा पाल्याचा हट्ट आणि पालकांची इच्छा यामुळे कुटुंबात खटके उडत असतात. अशा वेळी निर्णय लादण्यापेक्षा शैैक्षणिक समुपदेशकांशी चर्चा करावी. जेणेक रून प्रश्न जटील न होता तो सोडवता येईल.
-डॉ. किशोर गुजर, मनोविकृती चिकित्सक

पालक आपली अपूर्ण स्वप्न आपल्या मुलांमध्ये पहात असतात. त्यांना ज्या अडचणी आल्या त्या आपल्या मुलांना येऊ नयेत यासाठी त्यांनी चांगले गुण मिळवून करिअर घडवावे, असे पालकांना वाटत असते. मात्र, तरीही अमुक एवढेच गुण हवेत, हा अट्टाहास योग्य नाही. पाल्याला त्याच्या कुवतीप्रमाणे आगामी करिअरची दिशा ठरवू द्यावी. त्याला कुठे अडचण आली किंवा तो कुठे कमी पडला तर पालक म्हणून आपणच त्यांच्या पाठीशी उभे राहून प्रोत्साहन दिले पाहिजे.
- सुजाता व बाळासाहेब भोसले, पालक

करिअरचा विचार करण्याची क्षमता जरी आमच्याकडे नसली तरी आमचा रस कशात आहे, हे ओळखण्याची क्षमता पालकांमध्ये असते. त्यामुळे अनेक वेळा पालक आमच्या इच्छेनुसारच करिअर करण्याचा सल्ला देतात. परंतु, काही वेळा इतरांच्या मुलांकडे पाहून आपल्याही मुलांनी असेच केले पाहिजे ही तुलना आम्हा विद्यार्थ्यांसाठी घातक ठरू शकते. - अनुजा शिंदे, विद्यार्थिनी

टोकाचे पाऊल का?
१. तुलनेची वृत्ती घातक
२. पाल्याची बौद्धिक क्षमता महत्त्वाची
३. स्पर्धेच्या युगात पाल्य मागे राहण्याची भीती
४. पैसे खर्च करूनही नापास झाल्याने दु:ख
कलचाचणीची आवश्यकता
आपल्या बौद्धिक कुवतीनुसार किंवा अभिरुचीनुसार पाल्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी महाराष्ट्र शासनाकडून कलचाचणी घेतली जाते. शिक्षण विभागाकडून शिबिरे आयोजित केली जातात. मात्र, तरीही सुशिक्षित पालकांकडून गुणांचा अट्टाहास धरणे हे केवळ पाल्यासाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंंबासाठीच घातक आहे.

Web Title: Parents are also under the burden of expectations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.