प्रवाशांच्या नशिबी ‘भोग दिन’ !

By admin | Published: June 22, 2016 04:41 AM2016-06-22T04:41:14+5:302016-06-22T04:43:55+5:30

मुंबई व उपनगरांत सोमवारी रात्रीपासून पडलेल्या जेमतेम १०० मि.मी. पावसाचे निमित्त होऊन मुंबईची जीवनवाहिनी असलेली तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा मंगळवारी ऐन सकाळच्या

Passengers' day of 'indulgence'! | प्रवाशांच्या नशिबी ‘भोग दिन’ !

प्रवाशांच्या नशिबी ‘भोग दिन’ !

Next

मुंबई /डोंबिवली : मुंबई व उपनगरांत सोमवारी रात्रीपासून पडलेल्या जेमतेम १०० मि.मी. पावसाचे निमित्त होऊन मुंबईची जीवनवाहिनी असलेली तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा मंगळवारी ऐन सकाळच्या वेळी कोलमडल्याने मान्सूनच्या पहिल्याच पावसात रेल्वे प्रशासन नापास झाले. मध्य रेल्वेवर तासतासभर गाड्या येत नसल्याने दिवा स्थानकावर प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट झाला व हजारो प्रवासी
रुळांवर उतरल्याने रेल्वेच्या वेळापत्रकाचे तीनतेरा वाजले आणि लक्षावधी
प्रवाशांना तासन्तास लोकलमध्ये अडकून पडावे लागले. हा गोंधळ कमी होता
म्हणून की काय पारसिक बोगद्यापाशी असलेली भिंत खचल्याने दुपारनंतर जलद मार्गावरील वाहतूक सायंकाळपर्यंत दुरुस्तीकरिता बंद करावी लागली. मध्य रेल्वेच्या २५0 लोकल फेऱ्या रद्द झाल्या. या सर्व प्रकारामुळे प्रचंड हाल भोगावे लागल्याने मंगळवारचा योग दिन लाखो चाकरमान्यांसाठी भोग दिन ठरला.
पावसाळ््यापूर्वी रेल्वे व महापालिका प्रशासन रेल्वेमार्गालगतच्या गटारांची साफसफाई केल्याचे करीत असलेले
दावे किती भंपक आहेत, त्याची साक्ष मंगळवारी पहाटे झालेल्या पावसाने
पटली. कुलाबा येथे ११०.४ मि.मी. तर सांताक्रूझ येथे १०७. ३ मि.मी. पाऊस झाला. या पावसाला ‘मुसळधार’ ठरवत मध्य रेल्वेने आपल्या निष्क्रियतेचे खापर पावसावर फोडले. विशेष म्हणजे ज्यावेळी रेल्वे मुसळधार पावसामुळे वाहतूक रखडल्याचे रडगाणे गात होती, तेव्हा चक्क कडक ऊन पडले होते आणि फलाटावर खोळंबलेले व रेल्वे डब्यांत अडकलेले प्रवासी घाम पुसत होते. रेल्वेमार्गात साचलेल्या पाण्यामुळे सकाळपासून वाहतूक कूर्मगतीने सुरू होती. लक्षावधी प्रवासी त्या अवस्थेतही लटकून प्रवास करीत होते. (प्रतिनिधी)

रुळांवर साचले पाणी
माझगाव, विद्याविहार, विक्रोळी, भांडुप, ठाणे येथे रुळांवर पाणी साचल्याने मेन लाइनवरील अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक पहाटेपासून पूर्णपणे मंदावली. सकाळी ५.५२ ते सकाळी ७.0३ पर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकलची वाहतूक तर पूर्णपणे बंद करण्यात आली. ठिकठिकाणी पाणी साचल्याने धीम्या मार्गावरील वाहतुकीवरही परिणाम होऊ लागला होता. मात्र मध्य रेल्वेने जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळविल्याने दोन्ही मार्गांवरील लोकल सेवा पूर्णपणे कोलमडल्या.

हार्बर, परेही विस्कळीत
हार्बरवरील लोकलही पावसामुळे उशिराने धावत होत्या. कुर्ला येथे रुळावर पाणी साचल्याने हार्बर मार्गावरील लोकलचा वेग मंदावला आणि लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावू लागल्या. पश्चिम रेल्वेवरही तीच परिस्थिती दिसून आली. पहाटेपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने लोकलचा वेग मंदावला. समोरचे काहीच दिसत नसल्याने मोटरमनकडून लोकलचा वेग
कमी करण्यात आला आणि त्याचा परिणाम वेगावर होऊ लागल्याने लोकल फेऱ्यांना १५ मिनिटांचा लेट मार्क लागला.

दिव्यात प्रवासी संतप्त
दिवा रेल्वे स्थानकात तब्बल दीड तास एकही धीम्या मार्गावरील लोकल आली नाही. त्यामुळे तेथील फलाट माणसांनी भरून वाहू लागले होते. त्यातच कुणाचा तरी धक्का लागून एक महिला फलाटावरून खाली पडल्याने दिवावासीयांच्या भावनांचा स्फोट झाला. त्यांनी आपला मोर्चा जलद मार्गावरून जाणाऱ्या गाड्यांकडे वळवला. या लोकल आणि बाहेर गावाहून मुंबईकडे येणाऱ्या गाड्या अडवून प्रवाशांनी त्यामध्ये गर्दी केली. साहजिकच अगोदरच मंदावलेली लोकल वाहतूक या आंदोलनामुळे ठप्प झाली.

पोलिसांचा लाठीमार
दिव्यात मागील वर्षी जानेवारी महिन्यात स्थानिकांनी धिंगाणा घातला होता. आता परिस्थिती तशीच हिंसक होणार, अशी शक्यता वाटत असताना पोलिसांची कुमक मोठ्या प्रमाणावर तेथे पोहोचली आणि रेल्वे गाड्या रोखणाऱ्या धटिंगांना त्यांनी किरकोळ लाठीमार करून पांगवले. मात्र तोपर्यंत दिव्यात दगडफेक सुरू झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्याने अडकलेले प्रवासी व या गोंधळाची दृश्ये टीव्हीवर पाहणारे त्यांचे नातलग यांचा जीव टांगणीला लागला होता.

लोकलमध्ये प्रसूती
थोड्याशा पावसाचा फटका
बसून मुंबईकरांची लाइफलाइन असलेली लोकल सेवा रखडल्याने मुंबईकरांना बराच मनस्ताप सहन करावा लागला आहे. अनेक प्रवासी गाडीत व स्टेशनवर अडकून पडले. मात्र त्यातही मुंबईकरांची मदतीची वृत्ती दिसून आली. रखडलेल्या लोकलमधील माल डब्यात पुरुषांनीच महिलेची प्रसूती केली. दिवा येथे राहणाऱ्या गुडिया प्रमोद गुप्ता (२५) या मंगळवारी सकाळी जे. जे. रुग्णालयात जात होत्या, मात्र त्यांनी भांडुप रेल्वे स्थानकात लोकलमध्येच एका गोंडस मुलीला जन्म दिला.


मंगळवारी सकाळी लोकलसेवा कोलमडल्याने कल्याणपासून छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत गाड्यांची अक्षरश: रांग लागली होती. लक्षावधी प्रवासी तासन्तास गर्दीने खच्चून भरलेल्या डब्यांत अडकले. रेल्वेच्या भिकार कारभाराला ते शिव्यांची लाखोली वाहत होते.

दुपारी दोन ते सायंकाळी पाचपर्यंत ब्लॉक - पारसिक बोगद्याच्या संरक्षक भिंतीचे काम. दोन ते तीन वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार
होता. त्यानंतर हा ब्लॉक पावणेचार वाजेपर्यंत वाढला. काम पूर्ण न झाल्याने ब्लॉक संध्याकाळी पाच वाजेपर्यंत घेण्यात आला.

Web Title: Passengers' day of 'indulgence'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.