लोकांनी निवडून दिलेले आमदार, खासदार म्हणजे कचरा व आम्ही तेवढे "शाणे"

By admin | Published: April 11, 2017 07:44 AM2017-04-11T07:44:20+5:302017-04-11T07:44:20+5:30

शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियातील अधिका-यांशी केलेल्या गैरवर्तणुकीचं सामनाच्या अग्रलेखातून समर्थन करण्यात आलं

The people elected by the people, the MP is the garbage and we "shine" | लोकांनी निवडून दिलेले आमदार, खासदार म्हणजे कचरा व आम्ही तेवढे "शाणे"

लोकांनी निवडून दिलेले आमदार, खासदार म्हणजे कचरा व आम्ही तेवढे "शाणे"

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 11 - शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियातील अधिका-यांशी केलेल्या गैरवर्तणुकीचं सामनाच्या अग्रलेखातून समर्थन करण्यात आलं आहे. लोकांनी निवडून दिलेले आमदार, खासदार म्हणजे कचरा व आम्ही तेवढे "शाणे" या स्वप्नरंजनातून नोकरशाही बाहेर पडेल तेवढे बरे, असं म्हणत सामनातून एअर इंडियालाच लक्ष्य करण्यात आलं आहे.

बेलगाम वर्तन सुधारण्याची सुरुवात स्वतःपासून करावी. गायकवाड चुकले असतील तर कायदा त्यांना शिक्षा करील, पण दोन-पाच लोकांची मनमानी म्हणजे कायद्याचे राज्य नसून ती अराजकाची सुरुवात आहे. नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा हे एक सज्जन गृहस्थ आहेत. त्यांच्या शिस्त पर्वाचे आम्ही स्वागत करीत आहोत, पण लोकांनी निवडून दिलेल्या नेत्यांची सोशल मीडियावर बदनामी करणे हे एअर इंडियाच्या शीएमडीचे वर्तन शिस्तीच्या कोणत्या चौकटीत बसते ? एअर इंडियाच्या शिस्तीची व्याख्या काय ?, असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.

झोपी गेलेला जागा झाला व जागा झाल्यावर त्याचा सैराट झाला असेच काहीसे आपल्या प्रिय एअर इंडियाच्या बाबतीत झालेले दिसते. विमानखात्याच्या राज्यमंत्र्यांनी आता असे बजावले आहे की, विमानांत बेलगाम वर्तन केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे


- केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री सिन्हा यांच्या इशाऱ्याचे आम्ही स्वागत करीत आहोत. पण शिस्तीच्या बाबतीत आमच्या प्रिय एअर इंडियास जाग आली आहे ती प्रा. रवींद्र गायकवाड प्रकरणानंतर. गायकवाड प्रकरणात नेमके काय घडले याची रेकॉर्ड वाजवण्यात अर्थ नाही.
- काश्मीर खोऱ्यात सुरू असलेला पाकड्यांचा दहशतवाद मागे पडावा अशी प्रसिद्धी या प्रकरणास देऊन मीडियाने जो तडका लावला तो सर्व प्रकार आश्चर्याचा धक्काच म्हणावा लागेल.
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आक्रोशाला आणि आत्महत्यांना प्रसिद्धी मिळाली असती तर कदाचित राज्यकर्त्यांचे मन द्रवले असते. एखाद्या राज्यात शेतकऱ्याने आत्महत्या केल्यास ते राज्य बरखास्त केले जाईल असा इशारा आतापर्यंत दिल्लीश्वरांनी का देऊ नये हा प्रश्न गेली अडीच वर्षे अधांतरीतच अडकून पडला आहे.
- विमानात बेलगाम वर्तन केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील हे बरोबरच. मग फक्त विमानातच कशाला, जमिनीवर का नाही ?
- दोन महिन्यांपूर्वी विजयवाडा विमानतळावर तेलुगू देसमच्या खासदाराने हंगामा केला. डय़ुटी मॅनेजरच्या थोबाडात मारून विमानोड्डाण रोखले. मग हा गायकवाडी बंदी प्रयोग या सन्माननीय खासदारांवर का झाला नाही?
- ज्या एअर इंडिया व्यवस्थापकीय संचालकांच्या कर्तृत्वाचे पवाडे आता भाट मंडळींकडून गायले जात आहेत त्यांनी तरी या प्रश्नाचे उत्तर द्यावे.
- विजयवाडाप्रकरणी हेच शीएमडी मूग गिळून बसतात. कपिल शर्माचा बेवडेबाज धिंगाणा सहन करतात आणि काल-परवा एका तृणमूल खासदाराने केलेले बेशिस्त वर्तनही गिळून टाकतात. गायकवाड प्रकरणात त्यांचे कर्तव्यदक्ष मन उसळ्या मारते व त्यांचे भाट सोशल मीडियावर जणू यासम हाच असा आव आणून बच्चे लोग ताली बजावचा प्रयोग रचतात.
- चप्पल मारणारा दोषी आहे, पण ज्याचे थोबाड त्या चपलेने फुटले तो तरी खरोखरच संत सज्जन आहे काय याचीही शहानिशा होऊ द्या. राजकारण्यांना एकांगी पद्धतीने झोडपणे ही आता फॅशन झाली आहे.
- एअर इंडियाचे शीएमडी महान असतील, त्यांनी वाळवंटात गुलाबाचा बगिचा फुलवला असेल, चंद्रावर जाऊन पाण्याचे झरे शोधले असतील अथवा समुद्राच्या तळाशी जाऊन शेतीचे विक्रमी पीक काढले असेल, पण गायकवाड प्रकरणात त्यांनी जी घिसाडघाई केली त्यावर आम्ही प्रश्न केला तर काय चुकले?
- विजयवाडा प्रकरणात तुमची हिंमत व एअर इंडिया कर्मचाऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे तुमचे धोरण कुठे पंक्चर होऊन पडले? की विमान वाहतूकमंत्री विजयवाड्याचे म्हणून तुमच्या टायरची हवा गेली? त्यामुळे तुमचे शीएमडी किती महान व गायकवाड कसे चुकले या वादाचा कीस काढण्यापेक्षा वादावर पडदा टाकून शिस्तीचे नवे पर्व सुरू करावे असेच आम्हाला वाटते.

Web Title: The people elected by the people, the MP is the garbage and we "shine"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.