'सोलापूरकर सारख्या लोकांना गोळ्या घालून मारलं पाहिजे'; खासदार उदयनराजे भोसले संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 16:08 IST2025-02-05T16:04:06+5:302025-02-05T16:08:13+5:30
खासदार उदयनराजे भोसले यांनी अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.

'सोलापूरकर सारख्या लोकांना गोळ्या घालून मारलं पाहिजे'; खासदार उदयनराजे भोसले संतापले
मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर ( Rahul Solapurkar ) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील सुटकेबाबत मोठं विधान केलं आहे. या विधानावरुन आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून सुटण्यासाठी 'पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं, छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परतले', असा दावा सोलापूरकर यांनी केला. यावर आता खासदार छत्रपती उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale ) यांनी प्रतिक्रिया दिली असून संताप व्यक्त केला आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या विधानाचा निषेध व्यक्त केला. यावेळी बोलताना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, सर्वधर्म समभाव भावनेतून ज्यांनी सर्व समाजाला एक केले. एकता हा त्यामागचा एक मंत्र होता, राज्यकाराभारात लोकांचा सहभाग व्हावा. ज्या लोकशाहीमध्ये आपण वावरतो त्या लोकशाहीचा पाया छत्रपती शिवाजी महाराज यांनी रचला. त्यांनी स्वत:चं कुटुंब कधी पाहिलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीच तडजोड केली नाही, त्यांच्याबद्दल गलिच्छ विधान केली जातात. दोन, तीन दिवसापूर्वी असंच एक विधान केले. या विधानामुळे अनेक शिवभक्तांना वेदना झाल्या. हा राहुल सोलापूरकर ( Rahul Solapurkar ) कोण आहे? अशी लोक काही लाच घेतात, त्यांनी लाचे पलिकडे काही समजत नाही. हे लोक बोलत असताना काहीही बोलतात. अशा लोकांच्या जिभा हासडल्या पाहिजेत. अशा लोकांना जनतेने दिसेल तिथे ठेचले पाहिजे, असा सांगत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale ) यांनी संताप व्यक्त केला.
अशा लोकांमुळे समाजात तेढ निर्माण होतो
"अशा विकृत लोकांमुळे समाजात तेढ निर्माण होतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मी या संदर्भात बोलणार आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांचीही भेट घेऊन अशी विधान करतात त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मी करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जपले नाही तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. विकृत विधान करतात त्यांच्यामुळे समाजात तेढ निर्माण होतात. अशा लोकांना त्याच ठिकाणी ठेचलं पाहिजे, चित्रपट इंडस्ट्रीतील लोकांनी अशा लोकांना थारा दिला नाही पाहिजे, असंही खासदार छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले.
खासदार उदयनराजे भोसले म्हणाले,"अशी विधान करणाऱ्या लोकांना गाडलं पाहिजे, यांना जर गाडलं नाही तर या देशाच्या अखंडतेचा प्रश्न आहे. मी त्यांचा निषेध करतो. मला असं वाटतं याला गोळ्या घालून मारलं पाहिजे. यालाच नाही तर अशी विधान करणाऱ्यांना गोळ्या घालून मारलं पाहिजे असं वाटतं, असंही उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale ) म्हणाले.