पुनर्वसनाने दिली नक्षलींच्या आत्मसमर्पण योजनेला गती
By admin | Published: October 13, 2015 02:54 AM2015-10-13T02:54:27+5:302015-10-13T02:54:27+5:30
जंगलातील नक्षली जीवनाला कंटाळून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होणाऱ्यांचे पुनर्वसन वेगवान पद्धतीने करण्यावर गडचिरोली पोलिसांनी भर दिल्याने
गडचिरोली : जंगलातील नक्षली जीवनाला कंटाळून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होणाऱ्यांचे पुनर्वसन वेगवान पद्धतीने करण्यावर गडचिरोली पोलिसांनी भर दिल्याने, अनेक आत्मसमर्पित नक्षलवादी आता भाजी दुकानदार, चहाविक्रेते, सायकल दुरुस्ती, नळ फिटिंग करण्याचा व्यवसाय करताना दिसत आहेत. पुनर्वसन योजनेमुळे त्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत.
२९ आॅगस्ट २००५पासून राज्यात नक्षल आत्मसमर्पण योजना लागू झाली. सुरुवातीला पुनर्वसन कार्यक्रम थंड बस्त्यात होता. त्यामुळे त्याकडे नक्षलवादी आकर्षित झाले नव्हते. गेल्या चार-पाच वर्षांत पुनर्वसन कार्यक्रमाला गती देण्यात आली व नक्षल आत्मसमर्पण योजनेचा चेहरामोहरा बदलला. आता आत्मसमर्पणासाठी मोठी यादीच पोलिसांकडे आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून, त्या माध्यमातून अनेक नक्षलवादी आत्मसमर्पणासाठी तयार झाले आहेत.
नक्षलवाद्यांविरुद्ध पोलीस सर्वच आघाड्यांवर लढत असल्याने नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. परिणामी, दलममधून आत्मसमर्पण करणाऱ्यांचा ओघ वाढत आहे. १० वर्षांत ४८३ नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलीस प्रशासनासमोर आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहाकडे वाटचाल केली आहे.
नक्षल चळवळीत भरकटलेला आदिवासी बांधव लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात येत आहे. दलम सदस्य व जहाल नक्षलवादी मदनअय्या उर्फ बालना बलय्या याने आत्मसमर्पण केल्यानंतर, आतापर्यंत एक स्टेट झोनल कमिटी सदस्य, सहा डिव्हिजनल कमिटी सदस्य, १६ कमांडर, २४ उपकमांडर, २१८ दलम सदस्य, ११० क्षेत्रीय/ग्रामरक्षक दल सदस्य, १२७ संगम सदस्य यांनी नवा मार्ग निवडला. २०१३मध्ये सर्वाधिक ११ नक्षल जोडप्यांनी आत्मसमर्पण केले.