चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणी राज ठाकरेंची मध्यस्थी; ११ पोलिसांचे निलंबन मागे, कलम ३०७ सुद्धा हटवणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 09:45 PM2022-12-12T21:45:35+5:302022-12-12T21:46:23+5:30

Raj Thackeray : राज ठाकरे यांनी एक प्रसिद्धी पत्रक ट्विट केले आहे. यामध्ये आपली भूमिका मांडली आहे.

Raj Thackeray's mediation over fir against who threw ink on Chandrakant Patil; The suspension of 11 policemen is back, Article 307 will also be deleted! | चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणी राज ठाकरेंची मध्यस्थी; ११ पोलिसांचे निलंबन मागे, कलम ३०७ सुद्धा हटवणार!

चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणी राज ठाकरेंची मध्यस्थी; ११ पोलिसांचे निलंबन मागे, कलम ३०७ सुद्धा हटवणार!

googlenewsNext

मुंबई : राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठणमधील एका कार्यक्रमात महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात जोरदार राजकारण तापले आहे. पिंपरी-चिंचवड येथे समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्याकडून शाई फेक झाल्यानंतर या कार्यकर्त्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यांवरून भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका होत आहे. अशातच आता पिंपरी चिंचवडच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन या प्रकरणात मध्यस्थी करावी अशी विनंती केली. यानंतर राज ठाकरे यांनी एक प्रसिद्धी पत्रक ट्विट केले आहे. यामध्ये आपली भूमिका मांडली आहे.

राज ठाकरे म्हणाले, " लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकली तर निषेध व्हायलाच हवा, आम्ही पण 'मनसे स्टाईल'ने अनेकवेळा निषेध नोंदवतो. पण हे करताना काही संकेत असतात. सध्या महाराष्ट्रात महापुरुषांवरून विधानं करून माथी भडकवण्याचे उद्योग सुरु आहेत आणि त्या वादांमधून मतं मिळवण्याची केविलवाणी धडपड सुरु आहे. त्यामुळे एखादं विधान आलं की त्याचे संदर्भ न तपासता कार्यकर्त्यांना भडकवून, स्वतः नामानिराळं राहण्याचे प्रकार महाराष्ट्रात वाढायला लागलेत. मग ह्यांचे कार्यकर्ते पण कसलाच विचार न करता, कसलीही खातरजमा न करता, वाट्टेल त्या मार्गाने निषेध करत सुटतात." 

असाच प्रकार, राज्यातील विद्यमान मंत्री, भाजपाचे राज्यातील ज्येष्ठ नेते आणि माझे मित्र श्री. चंद्रकांत पाटील ह्यांच्या बाबतीत घडला. एका कार्यक्रमात त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकण्यात आली. एक बरं झालं, की चंद्रकांत दादांच्या डोळ्याला कोणतीही इजा झाली नाही. हे झाल्यावर पोलीस आयुक्तांनी तिथे हजर असलेल्या ११ पोलिसांचं निलंबन केलं आणि आरोपींवर भारतीय दंडसंहितेच्या अंतर्गत अनेक कलमांच्या जोडीला, कलम ३०७ देखील लावलं. हे कलम सदोष मनुष्यवधाचं कलम आहे. हे सगळं जेंव्हा मला कळलं तेंव्हा मला सर्वप्रथम हळहळ वाटली ती माझ्या पोलीस बांधवांबद्दल. पोलिसांना हा प्रकार रोखता आला नाही हे मान्य, पण तरीही त्यांच्यावरची कारवाई मला तरी अनाठायी वाटली आणि त्यामुळे मी अस्वस्थ होतो, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. 

आज संध्याकाळी पिंपरी चिंचवड परिसरातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी ह्या पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि इतर काही नागरी संस्थांचे पदाधिकारी मला भेटून गेले आणि त्यांनी पोलिसांनी दाखल केलेली कलमं ही गंभीर आहेत अशी तक्रार केली. मुळात एखाद्याच्या जीवावर बेतेल अशा पद्धतीने निषेध नोंदवणं हे साफ बिनडोकपणाचं आहे, आणि माझ्या मते हा निषेध नाही तर तो स्टंट असतो. ह्याची जाणीव मी त्या प्रतिनिधींना करून दिली. पण असो, निषेधकर्त्यांच्या वतीने ह्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मला विनंती केली की, मी ह्या प्रकरणात मध्यस्थी करावी, कारण ही कलमं कायम राहिली तर ह्या कार्यकर्त्यांचं आयुष्य उध्वस्त होईल. म्हणून मी स्वतः चंद्रकांत दादांशी बोललो, त्यांच्या कानावर ह्या सगळ्यांचं म्हणणं घातलं. त्यावर त्यांनी माझ्या विनंतीचा मान ठेवत ३०७ सारखं कलम शिथिल करण्याची तयारी दाखवली, असल्याचे राज ठाकरे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 

याचबरोबर, "माझं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्याशी देखील बोलणं झालं. पोलिसांवरच निलंबन मागे घेऊन, त्यांना पुन्हा सेवेत घ्यावं अशी विनंती मी त्यांना केली, ज्याला त्यांनी तात्काळ होकार दिला. ह्यासाठी दोघांचे मनापासून आभार. पण माझी महाराष्ट्रातील तमाम राजकीय कार्यकर्त्यांना विनंती आहे की, निषेध जरूर नोंदवा पण सवंग प्रसिद्धीसाठी असं काहीही करू नका, जे एखाद्याच्या जीवावर बेतेल. ह्या प्रकरणातून इतका धडा जरी सगळ्यांनी घेतला तरी पुरेसं आहे. महाराष्ट्राची राजकीय परंपरा सुसंस्कृत आहे, त्याचा दाखला आज ह्या दोन नेत्यांनी दाखवला, आता इतरांनी पण तो कृतीतून दाखवावा हीच अपेक्षा.", असेही राज ठाकरे म्हणाले. 

Web Title: Raj Thackeray's mediation over fir against who threw ink on Chandrakant Patil; The suspension of 11 policemen is back, Article 307 will also be deleted!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.