"हे इतकं सरळ चित्र नाही.."; जरांगे पाटलांच्या आंदोलनावर राज ठाकरेंना वेगळीच शंका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 03:10 PM2023-11-16T15:10:13+5:302023-11-16T15:10:43+5:30

मी जेव्हा मनोज जरांगे पाटील यांना भेटलो होतो, तेव्हा अशाप्रकारे आरक्षण मिळणार नाही असं मी बोललो होतो असं राज यांनी सांगितले.

Raj Thackeray's reaction to Manoj Jarange Patil's Maratha reservation | "हे इतकं सरळ चित्र नाही.."; जरांगे पाटलांच्या आंदोलनावर राज ठाकरेंना वेगळीच शंका

"हे इतकं सरळ चित्र नाही.."; जरांगे पाटलांच्या आंदोलनावर राज ठाकरेंना वेगळीच शंका

ठाणे – राज्यात मराठा आरक्षणावरून वादंग पेटले आहे. मनोज जरांगे पाटील सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. सातत्याने जरांगे पाटील राज्य सरकारला २४ डिसेंबरच्या अल्टिमेटमची आठवण करून देत मराठा आरक्षणाची मागणी लावून धरतायेत. जरांगे पाटील यांचे आंदोलन राज्यात चर्चेचा विषय असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर वेगळीच शंका व्यक्त केली आहे.

राज ठाकरे म्हणाले की, मी जेव्हा मनोज जरांगे पाटील यांना भेटलो होतो, तेव्हा अशाप्रकारे आरक्षण मिळणार नाही असं मी बोललो होतो. परंतु आता जरांगे पाटील आहेत की त्यांच्यामागे कोण आहे? त्यातून महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करायचं असं आहे का? कारण निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी होतायेत. हे इतके सरळ चित्र दिसत नाही. त्यामुळे कालांतराने यामागे कोण आहे हे कळेलच असं त्यांनी म्हटलं. त्याशिवाय असे अनेक गोष्टी पुढे येतात, ज्यामुळे लोक ज्याने त्रस्त आहेत हे त्यांच्या डोक्यात येताच कामा नये. लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठीही मुद्दे काढले जातात असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

तसेच महाराष्ट्रात सध्या इतकी राजकीय संभ्रमावस्था आहे, जी आजपर्यंत मी कधीही पाहिली नाही. याचे एकमेव कारण म्हणजे लोक हसण्यावर घेतो. मूळात या सर्व गोष्टी मतदारांची प्रतारणा, अपमान आहे. या अपमानाचा राग जोवर येत नाही. उघडपणे मतदारांचा विचार करत नाहीत. मतदारांना मुर्ख समजतात, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मतदार काय भूमिका घेतात हे पाहायचे आहे. निवडणुकीत भलत्याच गोष्टींवर मतदान करणार असाल तर मतदारांची किंमत काय राहणार? राजकीय पक्षांना, नेत्यांना मतदाराची भीती वाटली पाहिजे. कायद्याला कुणी विचारत नाही, मतदाराला कुणी विचारत नाही. तुम्ही केवळ मतदान करा, त्यामुळे निर्ढावलेले आहे. नुसते सुशिक्षित असून चालणार नाही तर सुज्ञ असावे लागेल असं आवाहन राज ठाकरेंनी मतदारांना केले.

मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पुन्हा एकदा सुरू झालेल्या लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. मनोज जरांगे यांच्या सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी उत्साहात मनोज जरांगे यांचे स्वागत केले जात आहेत. २४ डिसेंबरनंतर एकही दिवस सरकारला मिळणार नाही. आता आम्हाला आरक्षण मिळेल याची खात्री आहे. अन्यथा २४ डिसेंबरनंतर पुढचे आंदोलन मुंबईत असणार आहे, अशी मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

Web Title: Raj Thackeray's reaction to Manoj Jarange Patil's Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.